जोशी-अभ्यंकर केसमधील आरोपीला भेटण्यासाठी नाना पाटेकर तुरूंगात गेले तेव्हा काय घडलं?

कलाकार जेव्हा प्रत्यक्ष जीवनातल्या एखाद्या माणसाची भुमिका साकारतो तेव्हा त्याच्यासाठी ते आव्हान म्हणावं लागेल. कारण प्रेक्षकांसमोर कलाकाराला त्या माणसाचं व्यक्तिमत्व दाखवायचं असतं.

नाना पाटेकरांच्या करियरचा सुरुवातीचा काळ. त्यावेळेस नानांच्याही वाट्याला अशाच एका माणसाची किंबहुना गुन्हेगाराची भुमिका साकारायचं आव्हान होतं.

हा गुन्हेगार म्हणजे पुण्यातल्या जोशी-अभ्यंकर खु न प्रकरणाचा मुख्य सुत्रधार राजेंद्र जक्कल.

आजही राजेंद्र जक्कल याचं नाव घेतलं की पुणेकरांना तो जुना काळ आठवत असेल. आता लाॅकडाऊनमुळे पुणेकर घरात असले तरीही १९७६ साली संध्याकाळचे साडेसहा-सात वाजले की पुणे शहर आपसुकच सामसुम व्हायचे. इतकी पुण्यावर एका अनामिक भितीची दहशत निर्माण झाली होती. याला कारणही असंच होतं.

देशात आणीबाणी लागु झाली होती. १९७६ साली वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सारसबागेजवळ असलेल्या ‘विश्व’ हाॅटेलच्या मालकांचा मुलगा प्रकाश हेगडे बेपत्ता झाला.

रोज काॅलेजला जाणारा हा मुलगा अचानक गायब कसा होतो, हा सर्वांनाच प्रश्न पडला.

पुढे काही दिवसातच प्रकाशचा मृ तदेह सापडला. प्रकाश अभिनव कला महाविद्यालयात शिकत असल्याने संपुर्ण काॅलेज हादरुन गेलं.

या धक्क्यातुन लोकं सावरतायत तोच पुण्यातल्या विजयानगर काॅलनीत राहणा-या अच्युत जोशी आणि त्यांच्या बायकोचा खु न झाला. यामुळे मात्र पुण्याला मोठा हादरा बसला.

आणि पुढच्या दोनच महिन्यांमध्ये पुण्यात प्रकांडपंडीत म्हणुन ओळखले जाणारे काशिनाथशास्त्री अभ्यंकरांचा खुन झाला.

यावेळेस त्यांची पत्नी, नातु, नात, घरातील मोलकरीण यांनाही गुन्हेगारांनी दया दाखवली नव्हती. त्यांचाही खुन करण्यात आला होता.

वर्षभरात पुण्यात दहा निष्पाप माणसांचा बळी घेण्यात आला होता. यामागे कोण होतं, हे कोणालाच ठाऊक नव्हतं. त्यावेळी पुणेकर भितीपोटी एकमेकांशी जास्त बोलायचे नाहीत. लवकरात लवकर घरी जाण्याकडे त्यांची घाई असायची.रात्र झाली की संपुर्ण शहर सुनसान व्हायचं. काही दिवसांनी पोलीसांनी आरोपींना पकडलं. 

हे आरोपी होते दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह आणि खुनाचा मुख्य सुत्रधार राजेंद्र जक्कल.

दिग्दर्शक राजदत्त यांनी याच प्रकरणावर आधारीत सिनेमा बनवायचा ठरवला.

सिनेमाचं नाव ‘माफीचा साक्षीदार’.

सिनेमात नाना पाटेकर, मोहन गोखले, अविनाश खर्शीकर हे कलाकार होते. नाना जक्कलची भुमिका साकारणार होते. त्यावेळेस नाना आणि मोहन गोखलेसह राजदत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगात जिथे या चौघांना डांबण्यात आलं होतं तिथे गेले.

तुरुंगात जक्कल आणि त्याच्या साथीदारांचं निरीक्षण करणं हे भुमिकेसाठी उपयोगी ठरेल, या हेतुने नाना आणि मोहन गोखलेंना दिग्दर्शक राजदत्त यांनी येरवड्यात आणलं होतं. कोणी ओळखु नये म्हणुन तिघांनीही सरकारी बांधकाम विभागाचे (PWD) कामगार असल्याचं नाटक केलं.

तिघे हळुहळु या चौघांच्या कोठडीजवळ आले.

जक्कल एकदम शांत होता. त्याच्या हातात देवीदेवतांच चित्र असलेलं कसलं तरी पुस्तक होतं. राजदत्त यांनी वाचताना पुरेसा उजेड आहे का दिवा मोठा करू असं विचारलं. तर जक्कलने हसून होकार दिला. त्याच्या पुढच्या कोठडीत बाकीचे होते.

त्यावेळेस नेमकं आरोपी शांताराम जगतापने मोहन गोखलेंना ओळखलं.

मोहन त्यावेळेस मराठी नाटकांमधले लोकप्रिय कलाकार होते. जगताप कोठडीत थोडा लांब उभा होता. त्याने नाटकात काम केलं असल्यामूळ त्याने मोहन गोखलेंना ओळखलं. त्यांना पाहताच लांब उभा असलेला जगताप चवताळुन अंगावर धावतच आला.

धिप्पाड जगतापच्या अशा वागण्याने मोहन गोखले किंचाळुन बाहेर निघुन गेले.

नाना या वेळात सर्वांचं नीट निरीक्षण करत होते. जक्कलच्या डोळ्यातले भाव नेमके कसे आहेत, याचा अंदाज बांधत होते. या चौघांमधला दिलीप सुतार हा अर्धमेलाच झाला होता. १९८३ साली या चौघांना फाशी देण्यात आली.

राजदत्त यांनी काही कारणास्तव दिग्दर्शन सोडले. पुढे व्ही. रविंद्र यांनी दिग्दर्शनाची सुत्र हाती घेतली. या प्रकरणावर सिनेमा येणार असल्याचे समजल्यावर मोठा वाद निर्माण झाला होता.

सिनेमा पुर्ण झाल्यानंतर सेन्साॅरने काही दृश्यांवर आक्षेप घेतला.

सिनेमाचे निर्माते हिरालाल शहा यांना खुप मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले. शेवटी दोन वर्ष सेन्साॅरमध्ये अडकल्यानंतर ‘माफीचा साक्षीदार’ १९८६ मध्ये प्रदर्शित झाला.

नाना पाटेकर, अरुण सरनाईक, मोहन गोखले, अविनाश खर्शीकर, उषा नाईक असे दिग्गच कलाकार होते. इतकं सगळं होऊनही सिनेमा तितका चालला नाही.

नानांनी सिनेमात जक्कलवर आधारीत राघवेंद्र हि भुमिका साकारली होती.

नानांच्या अभिनयाला मात्र प्रेक्षकांची दाद मिळाली. सिनेमा प्रेक्षकांना आवडला की नाही, हा पुढचा प्रश्न झाला. पण फक्त एखाद्या व्यक्तीच्या निरीक्षणातुन त्याचं व्यक्तिमत्व अभिनयाद्वारे जीवंत कसं उभं करावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे नानांनी साकारलेला राघवेंद्र.

पुढे २००३ साली अनुराग कश्यपने हिंदीत जोशी-अभ्यंकर प्रकरणावर ‘पाँच’ हा सिनेमा बनवला.

  • भिडू देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. महेश says

    ज्यावरून या सिनेमाचं नाव माफीचा साक्षीदार ठेवलं तो आरोपी म्हणजे चांडक…….त्याचं नाव तर आपण कुठंच लिहिलं नाही .
    ज्याच्या साक्षीमुळे या गुन्ह्यांचा तपास लागला त्याचा आपण या लेखात उल्लेख केला नाही .

  2. Gudi Pestanji says

    Jevha prakran gajat hote tevha mi vadadara yethe rahat hoto aai roj vartman patrat vachun baba shi bolat hote pudhe kay hoil vagere…nantar Nashik madhye rahat astana…nana cha he cinema pahun akshar:s hadarlo…nana tar abhinay karat hota ani tari hi …bheeti vatli hoti…

Leave A Reply

Your email address will not be published.