मोदींशी पंगा घेणारे नाना पटोले विधानसभेचे हेडमास्तर होणार?

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. देशात नुकताच जीएसटी लागू करण्यात आला होता. त्याबद्दल आपल्या पक्षातल्या खासदारांचं मत जाणून घेण्यासाठी मोदींनी दिल्लीत पंतप्रधान निवासमध्ये बैठक बोलावली. या बैठकीत मोदींनी जीएसटी बद्दल  आपलं म्हणण मांडलं. खासदारांना काही प्रश्न आहेत का विचारलं. एक हात वर आला. सगळ्यांनी आश्चर्याने बघितलं.

ते भाजपचे भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले होते.

मोदींनी त्यांना विचारा अशी खूण केली. नाना पटोले आपली शंका विचारू लागले. हा निर्णय कसा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही व याचा संपूर्ण देशभरात पक्षाला कसा फटका बसेल हे सांगत होते होते एवढ्यात त्यांच्या लक्षात आले की पंतप्रधानांना आपला प्रश्न आवडलेला नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते.

नानाचा प्रश्न संपल्यावर रागाने लालबुंद झालेल्या नरेंद्र मोदींनी त्यांना एकच वाक्य सुनावलं,

“आता तुम्ही मला शिकवणार का?’

त्यानंतर ही बैठकच गुंडाळण्यात आली. नरेंद्र मोदींनी उलट प्रश्न विचारायचा नाही हा भाजप मधला एक अलिखित नियम नाना पटोलेनी मोडलाय हे स्पष्ट होतं. त्यांनां त्याचे परिणाम भोगायला लागेल हे दिसत होतं. आपण त्यांच्या सोबत नाही हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील इतर खासदारदेखील त्यांच्या पासून दूर उभे राहिले.

नाना पटोले सांगतात त्या दिवशी वातावरणात एक तणाव होता. कोणीच नेता माझ्या जवळदेखील येत नव्हता. फक्त जेष्ठ नेते नितीनजी गडकरी आले आणि हळूच कानात फक्त इतकेच म्हणाले 

” इथे घरी बोलावले जाते आणि अपमान केला जातो. “

भाजपमध्ये मोदी आणि शहांची हुकुमशाही चालते याचा उच्चार करणारा पहिला भाजप नेता म्हणजे नाना पटोले. 

खर तर ते मुळचे भाजपचे नव्हतेच. ते मुळचे कॉंग्रेसचे. मुळगाव सुकळी, जिल्हा भंडारा. वडील कृषिखात्यात नोकरीला होते, राजकारणाचा अर्थाआर्थी कोणता संबंध नाही. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा माणूस जिल्हापरिषदेची निवडणूक जिंकून राजकारणात आला.

तरुणपणीचा उत्साह, जनतेत केलेलं काम, शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा यामुळे आपल्याला आमदारकीची संधी आहे याचा त्यांना विश्वास होता. पण पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. तरी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली.पहिल्यांदा पराभव झाला.

पण १९९९ साली कॉंग्रेसने या युवा नेत्याला संधी दिली आणि त्यांनी त्याच सोनं केलं. नाना पटोले आमदार झाले.

त्यानंतर २००४ ला देखील परत आमदारकी जिंकून आणली. विदर्भात शेतकऱ्यांचे व ओबीसींचे नेते म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख बनवली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वपक्षीय नेत्यांशी जरी भिडायला लागलं तरी नाना मागे पुढे पहायचे नाहीत. बऱ्याचदा कॉंग्रेस मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी ही त्यांची खडाजंगी व्हायची.

एकदा तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत नानांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मत देणार नाही म्हणून बंड पुकारले, तो उमेदवार पडला. 

विलासरावांच्या कोपाची तलवार आपल्यावर कोसळणार हे लक्षात आल्यावर नानांनी २००९ साली पक्ष सोडला आणि भाजप मध्ये गेले. भाजप मध्ये गेल्यावरही आमदारकी जिंकून दाखवली. इतकच नव्हे तर २०१४ साली राष्ट्रवादीचे केंद्रात वजन असलेले नेते प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा-गोंदिया मतदारसंघात प्रचंड मोठा पराभव केला.

जायंट किलर म्हणून संपूर्ण देशात त्यांची ओळख बनली.

भाजपची तेव्हा लाट होती. सगळा देश मोदी मोदी करण्यात व्यस्त होता. भाजपचे अर्ध्याहून अधिक खासदार थेट मान्य करत होते की मोदी होते म्हणून आपण निवडून आलो नाही तर आपल्या विजयाचे काहीच चान्सेस नव्हते. नाना पटोलेनां मात्र खात्री होती की विदर्भातील शेतकऱ्यानी आपल्याला जिंकून दिल आहे आणि आपण खरे उत्तरदायी त्यांनाच आहे. 

त्यामुळे भाजपमध्ये गेल्यावर ही त्यांची बंडखोरी कधी शांत झाली नाही.

कधी अन्याय होतोय असं वाटल तर ते पेटून उठू लागले. याचीच परिणीती मोदींसोबतच्या वादात आणि पर्यायाने भाजप सोडण्यात झाली. जेव्हा सगळ जग भाजपकडे आम्हाला पक्षात घ्या म्हणून नाक घासत होते तेव्हा नाना पटोले भाजप सोडून कॉंग्रेस कडे परतत होते.

त्यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या खासदारकीच्या जागी आघाडी धर्मानुसार राष्ट्रवादीचा नेता त्यांनी निवडून दिला. २०१९ साली पक्षाने त्यांना घरचा मतदारसंघ सोडून नागपूरसारख्या अवघड जागी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध खासदारकी लढण्याची जबाबदारी दिली. नानांनी हे शिवधनुष्य उचलल पण त्यांचा पराभव झाला.

काही जणांना वाटले की पटोले परत भाजपमध्ये येतील. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नानांनी मात्र संयम बाळगला.

विधानसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला आणि आता तर कॉंग्रेसने त्यांना विधानसभा अध्यक्षाची महत्वाची जबाबदारी त्यांना देऊ केली आहे. विधानसभा अध्यक्ष हे कायम जेष्ठ व अभ्यासू सदस्याला दिले जाणारे पद आहे. रोज उठून भांडणाऱ्या आमदारांना शिस्तीत आणायची जबाबदारी विधानसभा अध्यक्षावर असते.

आता तर तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार चालवताना विधानसभा अध्यक्षाला हेडमास्तर बनण्याशिवाय पर्याय नाही. 

विधानसभा अध्यक्ष हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो तर त्याने पक्ष हित बाजूला ठेवून सरकार व्यवस्थित कसे चालेल या कडे लक्ष देणे अपेक्षित असते.

गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सभागृहाचे  सभापती अशा जबाबदारीच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींवर ते सत्ताधारी पक्षांच्या बाजूने बोलतात असे आरोप केले जातात.

नाना पटोलेचा बंडखोरीचा इतिहास बघता ते निवडून आले तर पक्षहिताच्या ऐवजी शेतकरी हिताच्या बाजूने काम करतील व आमदारांना सत्ताधार्यांना, विरोधकांना बरोबर वठणीवर आणतील अशीच अपेक्षा त्यांच्या समर्थकांच्याकडून व्यक्त केली जात आहे.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.