घर-घर तिरंगा फडकवण्याचा अधिकार देणारे मोदी नव्हते तर काँग्रेसचा हा खासदार होता..
यंदाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन ! “आझादी का अमृतमहोत्सव” म्हणत जल्लोषाचं कारण असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा स्वातंत्र्य दिवस जंगी साजरा करण्याचं आवाहन अक्ख्या भारताच्या जनतेला केलंय.
‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या अंतर्गत तयारी सुरु झाली असून देशभरातील नागरिकांना राष्ट्रध्वज वितरणाची सुरुवात झाली आहे. म्हणजेच या मोहिमेच्या अंतर्गत प्रत्येक नागरिक मोठ्या अभिमानाने आपल्या घरावर तिरंगा फडकविणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकवण्याची आवाहन केलं आहे.
पण असं घरावर तिरंगा फडकवण्याचा अधिकार आपल्याला याआधी नव्हताच. मग स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनच नाही तर इतर कोणत्याही दिवशी, घरांमध्ये किंवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार नव्हता. जवजवळ दोन दशकांपूर्वी देशवासियांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचा अधिकार मिळाला आहे.
हा अधीकार मिळण्यासाठी भारतातही एका व्यक्तीने भला मोठा कायदेशीर लढा दिलाय.
त्यांचं नाव नवीन जिंदाल !!!
नामांकित उद्योगपती आणि माजी खासदार नवीन जिंदाल यांच्याबद्दल माहिती असणं महत्वाचं आहे.
काँग्रेसच्या प्रमुख युवा नेत्यांपैकी एक नवीन जिंदाल यांचा जन्म १९७० चा हरियाणातील हिसार येथे झाला. ते हरियाणाच्या कुरुक्षेत्र प्रदेशाचे प्रतिनिधित्व करत असत.
२००४ मध्ये ते लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. ऑगस्ट २००४ रोजी त्यांना गृह व्यवहार समितीचे सदस्य बनवण्यात आले. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते दुसऱ्यांदा निवडून आले. या कार्यकाळात, त्यांना गृह व्यवहार समिती आणि संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य बनवण्यात आले.
मे २०१० मध्ये त्यांना रस्ते आणि वाहतूक मंत्रालय आणि सार्वजनिक लेखा समितीचे सदस्य देखील बनवण्यात आले.
तसेच ते नेमबाजीचे राष्ट्रीय चॅम्पियनही राहिलेत. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. याशिवाय नवीन हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत, ते जिंदाल स्टील आणि पॉवर इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत.
तर वळूया आपल्या विषयावर तो म्हणजे, नवीन जिंदाल यांच्या तिरंगा प्रेमाची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.
नवीन जिंदाल यांना राष्ट्रध्वजाची आवड अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात शिकत असताना झालेली. १९९२ मध्ये त्यांनी आपलं अमेरिकेतलं शिक्षण पूर्ण केलं आणि भारतात परतले.
भारतात परतल्यानंतर नवीन जिंदाल यांनी आपल्या कारखान्यात दररोज तिरंगा फडकवण्यास सुरुवात केली.
पण नेमकं आलं असं की, जिल्हा प्रशासनाने तसे करण्यास मनाई केली. सोबतच शिक्षेचा इशाराही केलेला. प्रशासनाच्या या कारवाईचा नवीन जिंदाल यांना याचा धक्का बसला.
देशाच्या अभिमानापोटी, प्रेमापोटी आपल्या भारताचा तिरंगा फडकावला तर त्यात गुन्हा काय ? जिल्हा प्रशासनाच्या शिक्षेच्या इशाऱ्यावरून हा साधासा प्रश्न त्यांना सतावू लागला.
भारतातील नागरिकांना देखील आपला राष्ट्रध्वज आपल्या खाजगी घरावर, ऑफिसवर फडकवण्याच्या अधिकार मिळावा याबाबत जिंदाल यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
हि कायदेशीर लढाई काय थोड्या महिन्यात आटोपली नाही तर त्यांच्या लढाईला यश मिळायला तब्बल ७ वर्षे लागले.
७ वर्षांनंतर शेवटी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. नवीन जिंदाल यांनी लढलेल्या सात वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की, देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रध्वज सन्मानाने, अभिमानाने फडकवण्याचा अधिकार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर प्रत्येक नागरिकाचा आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून निर्माण झाला.
या निर्णयानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने ध्वज संहितेत सुधारणा केली.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निकाल तर दिलाच शिवाय कोर्टाने हे प्रकरण तत्कालीन केंद्र सरकारला गांभीर्याने घेण्याचे आदेश दिले आणि ‘ध्वज संहिता’मध्येही सुधारणा करण्याचे आदेश दिले.
त्या आदेशानुसार, २६ जानेवारी २००२ पासून, भारत सरकारने ध्वज संहितेत सुधारणा करून, भारतातीलसर्वसामान्य नागरिकांना कधीही कुठेही राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवण्याची संधी मिळाली. हा अधिकार मिळाल्यानंतर नागरिक आपल्या घरी, कार्यालयात, कारखान्यांमध्ये अभिमानाने ध्वज फडकवण्यास मोकळे आहेत..
म्हणूनच देशाच्या इतिहासात २६ जानेवारी २००२ या दिवसाचं विशेष स्थान आहे.
पण या अधिकारांसोबतच काही कर्तव्य देखील बहाल केली. राष्ट्रध्वज फडकवताना, राष्ट्राचे प्रतीक म्हणून राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा टिकली पाहिजे तसेच कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अनादर होता कामा नये. जर का तिरंग्याचा अनादर झाल्यास, तुम्ही शिक्षेस पात्र असाल. या अटींशर्तींसहित राष्ट्रध्वज फडकावण्याचा अधिकार कोर्टाने बहाल केला.
बरं ही कायदेशीर लढाई जिंकल्यानंतरही नवीन जिंदाल थांबले नाहीत तर,
त्यांनी २००९ मध्ये गृहमंत्रालयाला पत्र लिहून रात्रीच्या वेळी देखील तिरंगा फडकवण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मांडला होता.
गृहमंत्रालयाने त्यांचा प्रस्ताव पूर्णपणे वाचून समजून घेतल्यानंतर त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र यासोबतच एक अट देखील गृह मंत्रालयाने लागू केली ती म्हणजे, भारतीय नागरिक रात्रीच्या वेळीही तिरंगा फडकवू शकतात. मात्र यासाठी ध्वजाचा खांब उंच असावा. रंगीबेरंगी, फाटलेला ध्वज फडकावल्याबद्दल तुम्ही शिक्षेस पात्र असाल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापासून प्रेरणा घेऊन नवीन जिंदाल यांनी ‘फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया’ची स्थापना केली ज्याद्वारे त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला तिरंग्याशी जोडण्याचा आणि भारतीयांमध्ये तिरंग्याबाबतचा आदर, प्रेम आणि राष्ट्रभक्ती रुजवण्याचा प्रयत्न केला.
जिंदाल यांनी आपले स्वप्न पूर्ण करत देशाचा सर्वोच्च तिरंगा फडकवण्याची इच्छाही पूर्ण केली.
हे ही वाच भिडू :
- हर घर तिरंगा : पण १७ लाख लोकांकडे तिरंगा लावण्यासाठी घरच नाहीए..
- “हर घर तिरंगा” पण मेड इन चायना..? खरंच की काय..?