किसान मोर्चा अडचणीत यावा म्हणून निहंग शीख हत्याकांड करत आहेत का?
आजचीच घटना, सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन चालू होतं आणि तेवढ्यात इथे एक मृतदेह सापडला. शेतकऱ्यांचे जे आंदोलन चालू होते त्याच्या मेन पॉईंटजवळ एका ३५ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह बॅरिकेड्सवर लटकलेला आढळला. हि हत्या इतकी निर्घृणपणे करण्यात आली कि, त्याचे हात कापले गेले.. त्या व्यक्तीचा हात कापला आणि मग त्याचा जीव घेतला. या हत्येमागे निहंग शिखांचा हात असल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. पण त्याचबरोबर पोलिसांचे म्हणणे आहे की, हा तपासाचा विषय आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नेमकं काय काय झालं पाहूया..
सिंघु बॉर्डर म्हणजे दिल्ली आणि हरियाणाची सीमा. केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी येथे आंदोलन करत आहेत. आणि हा मृतदेह इथेच सापडला आहे. काही वृत्तांनुसार सुरुवातीला आंदोलक पोलिसांना मुख्य स्टेजजवळ जाऊ देत नव्हते. मात्र, नंतर कुंडली पोलीस स्टेशनने मृतदेह खाली आणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणला. ३५ वर्षीय व्यक्तीच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणा सापडल्या आहेत. त्याचा हात मनगटापासून तोडण्यात आला आहे.
तर किसान मोर्चाचे काय म्हणणे आहे कि,
निहंग शीख सुरुवातीपासूनच किसान मोर्च्यासमोर काही ना काही अडचणी निर्माण करत आले आहेत. आणि आत्ताच्या या हत्येच्या घटनेमागे देखील निहंग शीखच आहेत असा दावा आंदोलकांनी केला आहे.
संयुक्त किसान मोर्चा मात्र स्वतःला या घटनेपासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांनी या हत्येचा आरोपी सापडेपर्यंत आम्ही हरियाणा सरकारला हवी ती मदत आणि सहकार्य करू अशी खात्री त्यांनी दिली आहे.
या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यात काही निहंग मृताच्या आजूबाजूला उभे असलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ कुणी बनवला आणि त्यातले दोषी कोण आहेत याचा तपास केला जात आहे. पण या हत्याकांडमुळे जे निहंग शीख चर्चेत आलेत ते कोण आहेत? आणि ते किसान मोर्चाच्या आंदोलकांच्या म्हणण्यानुसार आंदोलनात ते अडचणी का निर्माण करीत आहेत ते पाहूया…
पण मागे झालेल्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाला जेंव्हा हिंसक वळण लागले होते. तेंव्हा आंदोलक शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर घेऊन बॅरिकेड्स तोडले आणि दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न केला.
या शेतकरी आंदोलनाच्या ट्रॅक्टर परेडच्या वेळी त्यांच्या सोबत निळ्या वेशातले काही शीख योद्धे घोड्यावर बसून त्यांना संरक्षण देत असलेले दिसले.
कोण आहेत हे निहंग शीख ? काय आहे या निहंग शिखांचा इतिहास ? ते इतर शिखांच्या पासून वेगळे कसे?
निळा वेष, वाढवलेली दाढी, हातात शस्त्र, डोक्यावर निळी पगडी, त्यावर लावलेली पारंपरिक आभूषणे, हातात ससाणा पक्षी असलेले हे शीख योद्धे कोण हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या शीख योद्ध्यांना निहंग शीख असे म्हणतात .
निहंग या फारसी शब्दाचा अर्थ होतो मगरमच्छ. मगरीप्रमाणे आक्रमक व निर्दयी समजल्या जाणाऱ्या या शीख योद्ध्यांना मुघल सैनिकांनी निहंग हे नाव दिलं. शिखांचे नववे गुरु हरगोविंद सिंग यांच्या काळात पश्चिमेकडून होणाऱ्या परकीय आक्रमणाविरोधात अकाली फौज स्थापन झाली. पुढे शीख समुदायाचे धावे गुरु गुरु गोबिंद सिंग यांनी आपल्या अनुयायांना बलिदानाची शपथ देऊन खालसा पंथाची स्थापना केली.
आपल्या विरुद्ध होणाऱ्या हल्ल्याचे प्रत्यत्तर दिले नाही तर आपण संपून जाऊ ही भावना या काळात शिखांच्यामध्ये तीव्र झाली होती. मुघल बादशाह औरंगजेबाची जुलमी धोरणे यासाठी कारणीभूत ठरत होती. मुघलांशी लढताना गुरु गोबिंद सिंगांचे दोन्ही लहानगे पुत्र साहबज़ादे झोरावर सिंग आणि फतेहसिंग शत्रूच्या हाती लागले. या दोन्ही बालकांना सरहिंदच्या नवाबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आदेश दिला. मात्र दोन्ही चिमुकल्यांनी मोठ्या निर्भीडपणे आपला धर्म सोडण्यास नकार दिला.
यामुळे संतप्त झालेल्या नवाबाने ९ वर्षांच्या झोरावर सिंग आणि ६ वर्षांच्या फतेह सिंग यांना भिंतीत जिवंत चिणून ठार करण्याची शिक्षा दिली. मात्र तरीही दोन्ही मुलांनी आपला शीख धर्म सोडला नाही. २७ डिसेंबर १७०४ रोजी दोन्ही साहबज़ाद्यांना भिंतीत जिवंत पुरलं.
शीख धर्मातील हे सर्वात मोठे बलिदान मानले गेले.
असं मानतात कि गुरु गोबिंद सिंह यांचे सर्वात धाकटे सुपुत्र फत्तेसिंग यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेत निहंग या पंथाची स्थापना करण्यात आली.
त्यांच्याप्रमाणेच निळा वेष हे निहंग शीख परिधान करू लागले. त्यांनी अनेक युद्धांमध्ये भाग घेतला. अतिशय कमी संख्या असली तरी शत्रूचा पराभव करण्यासाठी हे योद्धे युद्ध भूमीवर अतिशय क्रूर व निर्दयीपणे लढताना दिसायचे.
चिड़िया नाल मैं बाज लडावांगीदडां नू मैं शेर बनावांसवा लख नाल इक लडावांतां गोविंद सिंह नाम धरावां
आजही निहंग शीख या उक्तीप्रमाणे वागताना दिसतात. त्यांनी कठोर ब्रम्हचर्याची शपथ घेतलेली असते. यात काही पंथ आहेत जे गृहस्थ धर्माचा आचरण करतात मात्र त्यांच्या पत्नीला देखील निहंग पंथाची दीक्षा घ्यावी लागते. या महिला देखील निळ्या वेषभुषेत असतात.
निहंग शिखांचे धार्मिक चिन्ह, पगडी, आभूषणे देखील इतर शिखांपेक्षा अधिक मोठे आणि ठसठशीत असते. शीख परंपरेचे ते पालन कठोरपणे करताना दिसतात.
गुरु गोबिंद सिंग यांची आठवण म्हणून ते आपल्या सोबत बाज म्हणजेच ससाणा पक्षी बाळगत असतात.
त्यांनी शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेलं असतं. सर्व दीनदुबळ्यांचे संरक्षण करण्याची शपथ त्यांनी घेतलेली असते. गुरु ग्रंथसाहिब बरोबरच दशम ग्रन्थ साहिब आणि सरबलोह ग्रन्थचे ते वाचन व पालन करत असतात. या ग्रंथामध्ये भक्तिरसाबरोबरच वीर रस देखील आहे असे त्यांचे म्हणणे असते.
हे निहंग शीख छोट्या छोट्या गटात राहतात. वेगवेगळ्या शीख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी घोड्यावरून ते चक्कर मारत असतात. यांचे तीन दल आहेत तरना दल, बिधि चंद दल, आणि बुड्ढा दल. त्यांचे वेगवेगळे प्रमुख असतात त्यांना जत्थेदार असं ओळखलं जातं.
एकेकाळी निहंगशिखांना भारतातील सर्वात खतरनाक सैन्य शक्ती मानलं जात असे. आज हे योद्धे देशभरातील गुरुद्वारांमध्ये गुरुबानीचा पाठ करताना दिसत असले तरी त्यांच्या तील जिद्द आणि वृत्ती लढाऊच आहे. अन्याय घडत असेल तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी ते हातात शस्त्र घेऊन दाखल होतात.
या निहंग शीखांचे अयोध्येच्या राम मंदिराशी देखील जुने नाते आहे.
दीडशे वर्षांपूवी बाबरी मशिदी पहिल्यांदा राममूर्तीची स्थापना करणारे आणि तिथे हवन करणारे निहंग शीख साधूच होते.
असे हे तडफदार शीख योद्धे पंजाबच्या शेतकरी आंदोलनापासून दूर कसे राहतील. गरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी म्हणूनच गेले काही दिवस सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात ते सहभागी झाले. आज ट्रॅक्टर मोर्चा निघाल्यावर त्यांना संरक्षण देताना घोड्यावर बसलेले हे निहंग साधू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
हे हि वाच भिडू :
- युपीच्या लखीमपूर खेरीमध्ये शीख समुदाय कुठून आला ?
- अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला शीख पोलिसाचे नाव, ट्रम्प देखील त्यांच्या भाषणात उल्लेख करायचे.
- पुण्याच्या विकासात शीख समाजाचं मोठ्ठ योगदान आहे