स्वतःच करियर मागं पडलं पण तुपरोटी खाऊन जाड झालेल्या पोराच्या हातात भाला सोपवला..
हरियाणातील खांदरा गावाचा तो रहिवासी. हे पानिपत मधलं गाव. इतिहासातील तीन ऐतिहासिक लढाया झाल्या ते पानिपत. त्या मातीने युध्दातली धुमश्चक्री अनुभवलेली. घोडदळ, पायदळ, हत्तीदळ यांच्या पायदळी तुडवलेली ती भूमी. तलवार आणि भाला ही त्या युद्धात वापरण्यात आलेली प्रमुख अस्त्रे. या अस्त्राचा प्रभावी वापर कालांतराने इतिहासाच्या स्मृतीत पानांमध्ये बंदिस्त झाला.
ती कला वातावरणात वावरते, पानिपतच्या मातीला त्याचा गंध आहे. त्याच मातीत त्या आयुधांचा किंबहुना भाल्याचा वापर प्रभावी करणारा एक युवक जन्माला आला.
खोडकर, खादाड आज्जीचा लाडका, गावात मित्रांची कायम भांडायचा, मारामारी करायचा. झाडावरच्या मधमाशांची पोळी काढायचा फोडायचा. आंब्याचा झाडावरचे आंबे सोडायचा नाही. मोठे दगड फेकून आंबे पाडणे म्हणजे हातचा मळ.
आजीच्या हातची तूप-रोटी चुरमा लाडू मिठाई खाऊन तब्येत चांगलीच कमावलेली. खोड्या वाढल्या आणि वजन वाढल्यावर मात्र घरच्यांनी त्याला जिम्नॅशियममध्ये सक्तीने पाठवलं.
भारताला ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा प्रवास तेथून सुरू झाला.
नीरजच वजन वयाच्या मानाने जास्त होते.
ते वर्ष होत 2010 च. तो हिवाळ्यात सकाळी जॉगिंगला गेला असताना जय चौधरी भालाफेकपटू च्या नजरेला पडला. हरियाणा ही गोळाफेक भालाफेक थाळीफेक स्पर्धेत नाम कमावणाऱ्या खेळाडूंची कर्मभूमी. हा जय चौधरी देखील असाच होतकरू भालाफेक पटू होता. त्याने नीरजला आपल्या हातातील भाला दिला आणि फेकायला सांगितलं.
नीरजने याआधी कधीच भाला फेकला नव्हता. त्याने फेकलेला भाला 35 ते 40 मीटर वर जाऊन पडला. जयला आश्चर्य वाटलं. जय नेत्याला भाला कसा पकडायचा आणि कसा फेकायचा ते शिकवलं.
जयने नीरजच्या घरच्यांना सांगितलं की याला भालाफेक या खेळात करिअर करता येईल.
मात्र साध्या सरावाच्या भाल्याची किंमत पंधरा ते वीस हजार रुपये होती. सरावासाठी घालायचा बुट दहा हजार रुपये खर्च व्हायचे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा भाला तर लाख लाख रुपयांना मिळतो. एवढे पैसे कुठून आणणार?
नीरजच्या वडिलांचे काही भाऊ एकत्र राहायचे. त्यांच्या एकत्र कुटुंबामध्ये 16 सदस्य होते. दोन म्हशी तीन गायी होत्या. दूध भरपूर यायचे मात्र वडिलोपार्जित घर मोडकळीस आले होते. त्या घरच्या डागडुजीसाठी साठवलेले पैसे नीरजच्या प्रशिक्षणावर खर्च करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. आणि तेथूनच आज शनिवारी टोकिओला गवसलेला भालाफेक सुवर्णपदकाचा प्रवास सुरू झाला.
जय चौधरीचे भालाफेकीत करिअर होऊ शकलं नाही. दुखापतीमुळे तो पुढे जाऊ शकला नाही. मात्र जय चौधरीने नीरजला सर्वतोपरी मदत केली.
त्याने नीरजला पानिपतहुन दिल्लीला पंचकूला ॲथलेटिक्स नर्सरीत नेले. तिथे नसीम अहमद यांनी नीरजला मार्गदर्शन केलं. आणि नीरजचा युवा स्पर्धां पासून झालेला प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. विश्वअजिंक्यपद स्पर्धेत 20 वर्षाखालील स्पर्धेत त्याने पोलंडमध्ये 86.48 मीटर वर भाला फेकून चॅम्पियनशिप रेकॉर्ड केला.
गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत 86.47 मीटर अंतरावर भाला फेकला. हे अंतर त्याने रियो ऑलिम्पिक मध्ये नोंदवलं असतं तर नीरजला त्यावेळेस रौप्यपदक मिळाले असते. त्यानंतरच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नीरज सुवर्णपदक पटकावून विक्रम करीत होता.
2019 हे वर्ष त्याच्या कोपरा वरील शस्त्रक्रियेमुळे वाया गेलं. मात्र टोकियो ऑलिम्पिक लांबणीवर पडल्याचा त्याला फायदा झाला. पुन्हा तो ट्रॅकवर आला.
जय चौधरीने मदतीचा हात दिल्यानंतर त्याच वेळी 2016 मध्ये भारतीय लष्कराने गुणवान युवा खेळाडूंना हुडकून प्रशिक्षित करण्याची त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना आखली. त्यांनी युवकांना चांगले प्रशिक्षक आणि आर्मीत नोकरी दिली. गुणवत्तेला शिस्तीची चौकट लाभली. निरज विशीतच राजपुताना रायफल मध्ये नायब सुभेदार बनला. त्याच्या प्रत्येक यशानंतर त्याला लष्करात बढती मिळत गेली. आज शनिवारी टोकियोतील त्याची कामगिरी भारतीय ॲथलेटिक्स मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.
- विनायक दळवी
हे ही वाच भिडू.
- वडिलांनी केलेली मेहनत आज ऑलिम्पिक गाजवणाऱ्या रविकुमारच्या कामी आलीय.
- खेळातल्या राजकारणाला वैतागली होती, थाळीफेक सोडून क्रिकेटमध्ये करियर करायचं ठरवलेलं.
- लोव्हलीनाला घरी मुलगा नसल्याचं शल्य कायमचं खोडून काढायचं होतं..