आर्यन खान सारखे सेलिब्रिटी लेकरं शिकली त्या अंबानी शाळेचा इतिहास सुद्धा जाणून घेतला पाहिजे
रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांना आज कुठल्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये होणाऱ्या इव्हेंट्स असो किंवा ipl मधला ग्लॅमर नीता अंबानी तिथं आपल्याला कायम दिसून येतात. आपल्या उपस्थितीने तिथं त्यांचं एक वेगळंच वलय निर्माण होतं. पण अशा वेगवेगळ्या अंदाजाप्रमाणे एक किस्सा आहे नीता अंबानी यांचा. तर जाणून घेऊया नक्की काय किस्सा होता तो.
नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा धीरूभाई अंबानी शाळेचे ऍडमिशन त्या करत असतात तेव्हा त्या स्वतःचा फोन स्विच ऑफ करून टाकतात. यावर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला होता आणि कारण जाणून घेण्यासाठी उत्तर मागितलं होतं. नीता अंबानी यांचं म्हणणं आहे की शाळेच्या गुणवत्तेबद्दल त्या काहीच तडजोड करत नाही. चांगलं शिक्षण मुलांना कसं मिळेल याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं. या काळात ऍडमिशनच्या वेळी ते कुणाचीही शिफारस ऐकून घेत नाही. कारण वशिलेबाजी करून ऍडमिशन देण्याचं त्यांच्या इथिक्स मध्ये बसत नसल्याचं त्या सांगतात.
मुकेश आणि नीता अंबानी हे सुरवातीला एका मध्यमवर्गीय कुटूंबातून पुढे आलेले आहेत. नीता अंबानी सांगतात की त्या आपल्या भूतकाळाला कायम लक्षात ठेवून वाटचाल करत असतात. हेच कारण आहे की बॉलिवूड, आयपीएल , उद्योग यांपासून वेगळी अशी दुनिया नीता अंबानी यांनी वसवलेली आहे. यातच येतं आपल्या सासऱ्याच्या स्मरणार्थ त्यांनी उभारलेलं धीरूभाई अंबानी स्कुल.
नीता अंबानी यांची वकील बनायची फार इच्छा होती. पण त्यांना धीरूभाई अंबानी यांच्या आजारपणामुळे एलएलबीचं शिक्षण अर्धवटच घेता आलं आणि मधूनच शिक्षण सोडावं लागलं. याच काळात त्यांनी निरीक्षण नोंदवलं की मुंबईचे लोकं आपल्या मुलांना उच्चशिक्षणासाठी आणि चांगल शिक्षण मिळण्यासाठी भारतातून परदेशात पाठवत आहे. तेव्हा त्यांना हे जरा खटकलं आणि भारतातील मुलं भारतातच शिकावी म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला की आपण अशी शाळा बनवूया त्यामधून हुशार मुलं बाहेर पडतील आणि देश पुढे नेतील.
यानंतर धीरूभाई अंबानी स्कुलची मुहूर्तमेढ रोवली गेली. नीता अंबानी यांच्या मते त्यांना शाळेबद्दल असे उत्तम विचार तेव्हाच येऊ लागले होते जेव्हा मुकेश अंबानी हे पाताळ गंगा प्लांट वर काम करत होते. तेव्हा त्यांनी एका ग्रामीण परिसरात एक शाळा सुरू केली. त्यांना लहान मुलांची विलक्षण आवड होती. त्याच वेळी त्यांना जाणवलं की शिक्षण हे असं क्षेत्र आहे ज्यातून आपण नवीन लोकं घडवू शकतो आणि हेच आपल्या जीवनाचं ध्येय मानून आपण एखाद्या मिशनप्रमाणे यात काम करू शकतो.
पाताळ गंगा नंतर त्यांनी जामनगर स्कुलची स्थापना केली. यानंतर अनेक गोष्टी जुळत गेल्या, नवीन नवीन लोकं भेटत गेली आणि त्यातून उभं राहिलं धीरूभाई अंबानी स्कुलचं स्ट्रक्चर. नीता अंबानी यांचं म्हणणं आहे की त्या या गोष्टीवर कधीच जोर देत नाही की मुलांना शिक्षणामधील किती गोष्टी आठवतात पण हे नक्की शिकवतात की आयुष्यात पुढे कसं गेलं पाहिजे. नीता अंबानी तिथल्या शिक्षकांना आपले अनुभव सांगतात की त्यांना स्वतःलाच माहिती नाही की त्या शाळेत काय शिकल्या पण त्यांना हे ठामपणे माहिती आहे की जीवनाच्या कठीण प्रसंगी काय करायचं ,कस वागायचं असं सगळं त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं होतं.
नीता अंबानी म्हणतात की शिक्षणावाचून कुठलाच देश प्रगती करू शकत नाही. सगळ्यांना शिक्षण घेण्याचा समान हक्क मिळावा यासाठी आपण कायम प्रयत्नशील असल्याचं त्या सांगतात. आज घडीला नीता अंबानी यांचे पती मुकेश अंबानी हे जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील आहेत. त्यांचा एक वेगळाच सामाजिक बांधिलकीचा अंदाज आहे पण जेव्हा जेव्हा धीरूभाई अंबानी शाळेचे ऍडमिशन सुरू असतात तेव्हा नीता अंबानी वशिलेबाजी होऊ नये म्हणून आपला फोन स्विच ऑफ करून ठेवतात.
नीता अंबानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की ऍडमिशन सुरू झाल्यावर अनेक शिफारशी करण्याचे फोन त्यांना यायचे म्हणून मी फोन बंद करून ठेवायचे. धीरूभाई अंबानी स्कुल भारतातल्या टॉप शाळांपैकी एक आहे.
हे ही वाच भिडू :
- खोटी बातमी लावली म्हणून एकदा मनमोहनसिंगांनी NDTV ची शाळा घेतली होती.
- शाळाबाह्य मुलांना परत आणण्यासाठी टाटांचं बालरक्षक ॲप मदत करणार आहे..!
- देशातील अनेक राज्यांत शाळा सुरु झाल्या, पण महाराष्ट्रात कधी सुरु होणार?
- महाराष्ट्रात मागच्या वर्षभरापासून एक लाखाहून जास्त मुलं शाळाबाह्य झाली आहेत…