कोणतीही साथ आली तर त्याचे व्हायरस भारतभरातून पुण्याला पाठवले जातात, कारण..

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी धोरणामुळे राष्ट्रीय विकास हे वैज्ञानिक संशोधनाचे एक महत्त्वाचे लक्ष्य बनले. या कार्याचा एक भाग म्हणून उद्योगधंदे व आर्थिक योजना यांकरिता सामान्यपणे उपयुक्त किंवा सुसंबद्ध असे संशोधन करण्याकरिता योग्य अशा संघटना स्थापन करण्यात आल्या आणि त्याकरिता प्रोत्साहन पण दिले गेले.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून विद्यापीठे, संशोधन संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा व उच्च तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था यांच्या संख्येत खूप वाढ करण्यात आली.

यातच होती पुण्याची इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या सरकारी संस्थेने व्हायरल रिसर्च साठी संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यांना रॉकफेलर फाउंडेशन या अमेरिकेतील एनजीओची मदत मिळाली.

अमेरिकेतील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉकफेलर कुटूंबाने स्थापन केलेले हे रॉकफेलर फाउंडेशन.

जगभरात अनेक समाजोपयोगी कामे त्यांच्या तर्फे केली जातात. याचाच भाग म्हणून आर्थ्रोपॉड बोर्न व्हायरस वर त्यांनी संशोधन सुरू केलं होतं.

आर्थ्रोपॉड व्हायरस म्हणजे ज्या व्हायरसना पसरायला डास, माश्या, किडे हे माध्यम लागतात लागतात असे व्हायरस.

याच्या भारतातील संशोधनासाठी रॉकफेलर आणि आयसीएमआर यांनी पुण्यातील कॅम्प भागात व्हायरस रिसर्च सेंटर स्थापन केले. ते साल होते 1952.

पुढे काही वर्षांनी रॉकफेलरनी यातील सहभाग कमी केला. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने जिद्दीने हे संशोधन चालू ठेवले. 1967 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्यांना मदत केली. संस्थेतील संशोधनाचा आवाका वाढवण्यात आला.

1978 साली सायंटिफिक अडव्हायजरी कमिटीच्या शिफारसी नंतर व्हायरल रिसर्च सेंटरने आपला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असल्याचा दर्जा मिळविला आणि त्याचे नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) असे ठेवले गेले.

आज या संस्थेत एड्स पासून ते हेपाटट्स ए, चिकणगुणिया, झिका, रोटा व्हायरस अशा अनेक प्रकारच्या व्हायरस वर संशोधन होतं. शिवाय मेडिकल झुलॉजी अँड एन्टमोलॉजी, टिश्यूकल्चर, सेल बायोलॉजी या विषयातही इथे संशोधन होत आहे.

गेली अनेक वर्षे पुण्यात एनआयव्ही जागतिक आरोग्य संघटनेसोबत काम करत आहे. आर्बोव्हायरस, हिमोरजिक टॅप यांच्या संदर्भातील संशोधनासाठी जागतिक दर्जाची संस्था म्हणून एनआयव्हीची ओळख बनली आहे.

या संस्थेत शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, इंजिनियर आणि इतर कर्मचारी मिळून सुमारे 350 लोक काम करतात. इथल्या प्रयोगशाळा अद्यावत सुविधांनी सुसज्ज आहेत.

आजही भारतात कोणताही साथीचा रोग आला तर त्याचे विषाणू सर्वप्रथम याच संस्थेत पाठवले जातात.

म्हणूनच मागे आलेला स्वाइन फ्लू असो की आता थैमान घालत असलेला कोरोना त्याच्याशी लढा देण्यासाठी त्यांचे व्हायरस पुण्यातच पाठवण्यात आले आहेत.

त्या रोगाचा प्रतिकार कसा करावा याची माहिती देणे, त्याचे निदान करण्यासाठी सामग्री पुरवणे, रोग पसरू नये यासाठी योजना आखून त्या देशभरात राबवणे या साऱ्या गोष्टी भारतातील शिखर संस्था म्हणून एनआयव्ही पुणे च्या अखत्यारीत येतात.

इतकंच नाही तर अत्यंत घातक रोगजंतू सुरक्षितपणे हाताळता यावेत यासाठी पाषाण जवळ एनआयव्हीच मायक्रोबियल कंटेनमेंट सेंटर उभं राहिलं आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.