अध्यक्षमहोदय, आम्हाला संसदेत झोपण्याची परवानगी मिळावी.
भिडू संसद माहित आहे ना? भारताच्या लोकशाहीतील सर्वात पवित्र स्थान. इथ म्हणे देशाच्या भवितव्याचे निर्णय घेतले जातात. भारताचे सध्याचे पंतप्रधान तर पहिल्या एन्ट्रीला संसदेच्या उबरयात डोक टेकवून मगच आत घुसले होते. पण आत मध्ये गेल्यावर काय काय बघायला लागणार आहे याची त्यांना कल्पना नसावी.
ही सोळावी लोकसभा होती. याचे पाच वर्षाचे टर्म आता काही दिवसात पूर्ण होईल. या दरम्यानच्या काळात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांनी फक्त हाणामारी करायची बाकी ठेवली. वेगवेगळ्या घटनानियमांची कायद्याच्या प्रांगणात पायमल्ली झाली. कोणी घोषणा दिल्या, कोणी डोळे मारले, कोणी त्यांची नक्कल केली, कोण बॅकबेंचर चावट मुलांप्रमाणे डब्बा काढून खाऊ खाल्ला. या सभागृहाच्या हेडमास्तर म्हणजेच सभापतीनी या नाठाळ पोरांना आवरण्याचा प्रयत्न केला पण ते काही यशस्वी ठरले नाहीत.
पण या सगळ्या गोंधळात काही महापुरुष असे ही होते जे स्थितप्रज्ञाप्रमाणे येऊन झोपा काढून जायचे.
ही झाली आत्ताची गोष्ट. पण आम्ही तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ती आहे सत्तर वर्षापूर्वीची.
१९४६ मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याचे जेव्हा ब्रिटिशांनी मान्य केलं. या स्वतंत्र भारताचे प्रजासत्ताक कसे असावे यासाठी याच संसद भवनामध्ये संविधान सभा भरली होती. संपूर्ण देशभरातून निवडणूक जिंकलेले जवळपास २०७ सदस्य या संविधान सभेमध्ये होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर याच संविधान सभेचे रुपांतर तात्पुरत्या लोकसभेमध्ये करण्यात आले.
संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉ.राजेंद्र प्रसाद.
संसदेच्या इतिहासात सर्वात जास्त सिरीयस डिस्कशन या सभेमध्ये झाले. घटनेच्या प्रत्येक कलमावर त्यातल्या प्रत्येक शब्दावर उहापोह झाले. आता एखाद्या वर्गात होते त्याप्रमाणे हुशार आणि बडबडी मूले बाकीच्यांना बोलू देत नाहीत तशीच काहीशी परिस्थिती या संविधान सभेत देखील व्हायची. काही सभासद जे बोलण्यात इतके पारंगत नव्हते किंवा नेहरूंसारखी इंग्लिश हिंदीवर प्रभुत्व राखून नव्हते ते या चर्चेत मागे पडायचे.
अशातच एक दिवस संविधानसभेचे एक सदस्य श्री. गोपाल नरेन सक्सेना यांनी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांच्याकडे एक मागणी केली. ही मागणी ऐकून राजेंद्रप्रसाद यांना धक्का बसला. मागणी होती
“मला संसदेमध्ये झोपण्याची परवानगी द्यावी.”
गोपाल नरेन सक्सेना हे समाजवादी कॉंग्रेसचे उत्तरप्रदेशमधले एक प्रसिद्ध नेता होते. पुढे जाऊन जयप्रकाश नारायण यांच्या प्रजासमाजवादी पार्टीचे ते अध्यक्ष ही बनले. गंभीर चर्चा सुरु असताना अशा जेष्ठ सदस्याने ही विचित्र मागणी केल्यामुळे संपूर्ण सभागृह काही काळ शांत झाले. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. राजेंद्रप्रसादांनी गोपाल नरेन यांना झोपू देण्याचं कारण विचारलं.
ते म्हणाले,
“मी या सभे’मध्ये गेली कित्येक दिवस नुसता बसून आहे. सकाळी चर्चा सुरु झाल्यापासून संध्याकाळी चर्चा संपेपर्यंत मी बसूनच असतो. आता माझी सहनशक्ती संपत आली आहे. आपल्या सभागृहाचे काही सदस्य प्रत्येक मुद्द्यावर, प्रत्येक कलमावर, प्रत्येक दुरुस्तीवर स्वतःच तासनतास बोल्ट राहतात. इतरांना संधीच मिळू देत नाहीत. एकत्र त्यांना फक्त दोन तीन मिनिटात आपले म्हणणे आवरते घेण्यास सांगा अथवा मला येथील खुर्ची मध्ये झोपू द्या.”
गोपाल नरेन सक्सेना यांचा सात्विक संताप राजेंद्रप्रसाद यांच्या लक्षात आला. पण सभागृहाच्या नियमानुसार त्यांना यावर काही करता येत नव्हते. त्यांचे हात बांधील होते. त्यांनी तसे गोपाल नरेन यांना समजावून सांगितले. जुन्याजाणत्या सदस्यांनी कसंबस त्यांचा राग शांत केला.
त्यानंतर गोपाल नरेन सक्सेना यांना त्यादिवशीच्या चर्चेत बोलायला दिल गेलं, सगळ्यांनी ते शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांनी मांडलेला मुद्दा एकमताने पास झाला.
हे ही वाच भिडू.
- भाजपचे हे दोन राम विधानसभेतून गेल्यानंतर शरद पवार म्हणाले, आम्ही सुटलो.
- खरंच कर्नाटक जिंकणारा पक्ष लोकसभा निवडणुकीत पराभूत होतो का?
- वाजपेयी यांच्या एका शब्दानं नरेंद्र मोदींचं अख्खं आयुष्य पालटलं.