आडनावाला जागलेला एकमेव माणूस म्हणजे पंकज “उदास”.
जगात खूप कमी माणसं असतील जी आपल्या आडनावाला जागतात. पंकज उदास देखील असाच माणूस आडनावाला जागणारा. समोर पंचपक्वान वाढलेलं असलं आणि त्यात मीठ ऩसेल तर कस वाटेल. गाण्याच्या बाजारातल अस मीठ म्हणजे पंकज उदास. प्रेमाच्या गुलाबी हिंदोळ्यातनं माणूस रिकामा झाला की त्याला पंकज उदास आठवणार. तसा पंकज उदास म्हणजेच आयुष्य म्हणणारी माणसं खूप कमी भेटतील. पण पंकज उदास चा दौर आयुष्यात कधी आलाच नाही म्हणणारा एकही भारतीय भेटणार नाही. आयुष्यात दर्द लागतोच आणि दर्दला पंकज उदास लागतोच.
पंकज उदास आठवला की एक पोरगी, एक पोरगा, दोघे चिकणे, मागे window’s चा वॉलपेपर वाटावा असा सीन आणि एकत्र येणं, दूरावणं या धर्तीवर पंकज उदासचं स्लो पॉइजन. या पलिकडे तस त्याच्या गाण्याच विशेष काही जाणवलं नाही, तरिही पंकज उदासची गाणी प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये असतातच मग भले तो GOT बघणाऱ्या कॅटेगरीतला का असेना.
बर अस नाही की या माणसाने फक्त दर्दी गाणी म्हणली असतील. उलट याने प्रेमाची लय भारी भारी गाणी म्हणली. पण पोरगीच कौतुक करताना देखील एक सभ्यता लागते ती या माणसाकडे होती. ना कजरे की धार ना मोतियों के हार ना कोई किया शृगांर म्हणतात तितकीच MM टाईप मुलगी डोळ्यापुढे येते हेच त्याचा गाण्याच भारी असत.
असो, तर अशा पंकज उदासचा आज वाढदिवस म्हणून या म्हणलं भिडू लोकांना पंकज उदासचे काही खास किस्से सांगावे.
पहिला किस्सा त्याच्याच लग्नाचा.
पंकज उदास याच प्रेम फरिदा. फरिदा पारसी होती. पंकज उदासची शेजारणी. दोघांची घरे शेजारी होते. दोघं तरुण होते. प्रेमात पडायला एवढी गोष्ट बास होती. पंकज तेव्हा ग्रॅज्युएट करत होते तर फरिदा एअर होस्टेस होती. दोघांनी प्रेमाचा गाडा पुढे घेवून जायचा निर्णय घेतला. पण काहीही झालं तर घरातल्यांची परवानगी घेवूनच. पंकज उदासने आपलं प्रकरण घरी सांगितलं.
पंकज उदासच्या घरातून काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण फरिदा च्या घरातून या गोष्टीला परवानगी नव्हती. किती झालं तरी ती एक पारशी असल्याने तीनं एका पारशी मुलासोबतच लग्न करावी अस घरातल्यांना वाटत होतं. अशा वेळी काहीही करुन घरची परवानगी घेवूनच लग्न करायचा निर्णय त्याने घेतला. तो इकडे नाव कमवू लागला. लोकांना उदास करत करत त्याने चांगल नाव कमावलं. मग तो फरिदाच्या वडिलांना भेटायला गेला.
फरिदाच्या वडिलांना अत्यंत सभ्य माणसासारखं त्यान सगळं समजावून सांगितल मग फरिदाचे वडिल अमरिश पुरीप्रमाणे ज्या सिमरन जा म्हणाले आणि पंकज उदास यांच जुळलं.
राहून राहून एका गोष्टीची भिती वाटते. या माणसाचं प्रेम सक्सेसफुल झालं तरी अस आहे. समजा यांचा प्रेमात टप्पा पडला असता तर आपल्या सगळ्यांना यांनी सार्वजनिक आत्महत्या करायला भाग पाडलं असतं.
पंकज उदास याचा दूसरा किस्सा,
साल होतं १९८६. नाम सिनेमा बनत होता. दिग्दर्शक महेश भट्ट हा सिनेमा बनवत होते. सिनेमा लिहिला होता तेव्हाचे स्टार स्क्रिप्टरायटर सलीम खान यांनी. सिनेमाचा प्रोड्युसर होता कुमार गौरव. तोच या सिनेमाचा हिरो देखील होता.
लव्ह स्टोरी या पहिल्याच सिनेमाच्या अपयशानंतर त्याचे सलग सगळे सिनेमे फ्लॉप झालेले होते. या सिनेमामध्ये कुमार गौरवचा मेहुणा संजय दत्तसुद्धा होता. त्याचे सुद्धा रॉकी नंतरचे सिनेमे पडले होते. आपल्या पोरांच डूबत करीयर सावराव म्हणूनच हा सिनेमा बनवायचा घाट कुमार गौरवचे वडील ज्युबलीस्टार राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त यांनी घातला होता. त्यांचा हा घरचा सिनेमा होता.
एकदा शोमन राज कपूर डिनर साठी म्हणून राजेंद्र कुमार यांच्या घरी आले होते. तेव्हा तिथे नाम चं एडिटिंग चालू होतं. एडिटर होते पुढे जाऊन मोठे दिग्दर्शक म्हणून नाव कमावलेले डेव्हिड धवन. जेवण झाल्यावर राज कपूर आणि राजेंद्र कुमारमध्ये सिनेमाबद्दलच्या गप्पा सुरु होत्या. राज कपूरनी सहज विचारलं,
“भाई तुमने इंडस्ट्री के सारे दिग्गज कलाकार इस मुव्ही बनाने के लिये ले लिये मगर म्युजिक का क्या? सिनेमा का म्युजिक हिट तो फिल्म हिट. “
राजेंद्र कुमार काही बोलले नाहीत. ते राज कपूरना सरळ एडिटिंग रूम मध्ये घेऊन गेले. डेव्हिड धवनना एक गाण लावायला सांगितल. राज कपूरनी ते बघितलं आणि झरझर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते गाण होत पंकज उधास यांनी गायलेलं
“चिठ्ठी आयी है.”
हे गाण त्यांच्यावरच चित्रित झालेलं. सिनेमा रिलीज झाला. पहिल्या दिवसापासून या सिनेमाने तिकीटखिडकीवर तुफान कामगिरी केली. या सिनेमाच्या यशाचं मेन कारण होतं चिठ्ठी आयी है. गाण लागल्यावर थिएटर मध्ये लोक ढसाढसा रडत होते. त्याकाळात मिडलइस्टला जाणाऱ्यांच प्रमाणही खूप होतं. ही मंडळी रोज संध्याकाळी घरच्यांच्या आठवणीत हे गाण लावून डुंबत होती.
पंकज उदास यांचं करीयर या गाण्याने बदलून गेलं. सगळ्या भारतात त्यांना गझलसम्राट ही ओळख मिळाली. तलम रेशमासारखा मऊसूत आवाज, गाताना कोणतीही गडबड नाही. वेळ घेऊन अगदी आतून हृद्य पिळवटून गाणारे पंकज उधास अनेक भारतीयांचे रात्रीचे सोबती झाले होते. नव्वदच्या दशकात ब्रेक अप झालेला प्रत्येकजण पंकज उदास यांचीच गाणी ऐकून दुख्खः विसरण्याचा प्रयत्न केलंय.
अनेक त्यांची गाणी गाजली. भारतात एम टीव्ही वगैरे आल्यावर अल्बम कल्चर आलं. त्यातही पंकज उदास फिट बसले. सध्याचा मोठा स्टार जॉन अब्राहमचा पहिला ब्रेक पंकज उधास यांच्याच अल्बम मध्ये मिळाला होता. तो आजही त्यांना आपला गुरु मानतो.
तर आत्ता घ्या ग्लास आणि करा सुरू पंकज उदास.
१. चिठ्ठी आयी है
२. ना कजरे की धार (मोहरा )
३.जिये तो जिये कैसे? (साजन )
४. आहिस्ता आहिस्ता
५.चांदी जैसा रंग है तेरा
हे ही वाच भिडू.
- आज ज्यांचा प्रपोज गंडला त्यांच्यासोबत जगजीतसिंह आयुष्यभर राहिल
- सुरेश भटांनी लिहिलेलं मराठी अभिमान गीत गाण्यासाठी तब्बल ४५० गायक पुढे आले होते
- एकेकाळी बार मध्ये गाणाऱ्या सानूला जे काही मिळालं ते मुंबई मुळे मिळालं !