पारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..?

पारशी लोकांची आपल्याला दोन गोष्टींमुळं जास्त ओळख आहे, पिच्चरमधली कंजूस म्हातारी माणसं आणि बडबडे पैशावाले उद्योगपती..!

मुन्नाभाईमधला कॅरम खेळणारा म्हातारा असो की रेसकोर्सला बसणारी टोपीधारी लोकं की बोहेमियन ऱ्हाप्सोडी मधला फारुख बुलसारा उर्फ फ्रेडी मर्क्युरी. ही माणसं सगळ्यांची लाडकी आहेत.

त्यातही या लोकांच्या भरमसाठ उद्योग आणि कारखान्यांमुळं ही माणसे कौतुकाचा विषय आहेत.

त्यांच्या अग्निपूजक धर्माप्रमाणेच त्यांची जाणवणारी वेगळी बाब म्हणजे त्यांची आडनावे.

पुनावाला, बाटलीवाला, लोखंडवाला तिथून ते टाटा, शापूर्जी, बंदूकवाला अशी नादखुळा आडनावं असणारी ही माणसं.

पण यांना हि आडनावं कुठून घावली?

यासाठी आपल्याला या लोकांच्या इतिहासात जावं लागेल. आताचा इराण म्हणजे तेव्हाचा पर्शिया. (आपल्या मराठी भाषेला समृद्ध करणारी फार्सी भाषा इथलीच.) तेव्हा इस्लामच्या वाढत्या प्रभावामुळं इतर धर्मीय लोकांची संख्या कमी होत होती.

इसवी सनाच्या ६३६ ते ६५१ मध्ये पर्शियाचा ताबा मुस्लिमांच्या ताब्यात गेला. तेव्हा ह्या लोकांनी दूरच्या देशांत जाऊन वसण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून त्यांनी भारताकडं प्रयाण केलं. भारतातल्या विविध बंदरांवर येऊन समुद्रमार्गाने हे प्रवासी उतरले.

त्यांच्यातील एक जथ्था गुजरातला बडोद्याच्या जवळ एका बंदरात उतरला. ह्या दूरदेशीच्या लोकांची भाषा कुणालाही समजत नव्हती.

त्यांनी भारताच्या दिशेने प्रयाण केले.

त्यानिमित्ताने एक गोष्ट दंतकथेच्या रुपात सांगितली जाते की,

भाषा भाषा कळत नसल्यामुळे या लोकांशी संवाद साधणे देखील अवघड जात होते तेव्हा बडोद्याच्या महाराजांनी आपल्याकडे जागा नाही व या राज्यांमध्ये आधीच खूप मोठ्या प्रमाणात लोके आहेत हे सांगण्यासाठी दुधाने काठोकाठ भरलेले भांडे त्या लोकांच्या समोर ठेवले.

त्यावेळी पारशी धर्मगुरूंनी त्या दुधाच्या भांड्यात साखर टाकून आपण इथे साखरेप्रमाणे राहू हे दाखवून दिले. राजाला ही गोष्ट पसंत आली आणि त्याने पारशी लोकांना आपल्या राज्यांमध्ये राहण्यासाठी परवानगी दिली.

किस्सा-ई-संजान या पारशी स्थलांतराच्या ६० वर्षानंतर ग्रंथात ही बाब मांडली आहे.

स्थानिक राजाने त्यांना गुजराती भाषा आणि स्त्रियांसाठी पोशाख म्हणून साडी स्वीकारावी अशी अट घातली आणि पारशी लोकांनीही ती मान्य केली. जादि राणा या त्यांच्या म्होरक्याच्या नेतृत्वाखाली ही लोकं इथं नांदली.

सुरत शहरात ही माणसं आपलं बस्तान बसवून राहिली.

नंतरच्या काळात ब्रिटिश आल्यानंतरही हे लोक राजसत्तेशी येथील स्थानिक लोकांची गुण्यागोविंदाने व संवादाने राहिले आणि त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये राहिल तेथे आपल्या गुणांच्या आणि शांततेच्या जोरावर स्थानिक लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित केले.

किनारी भागात कराची, मुंबई, गुजरात इथपासून ते शहरांपर्यंत या लोकांची वसाहत होती. भारताच्या बदललेल्या वातावरणामध्ये या लोकांच्या संपत्ती तसेच मालमत्तेवर आणि धर्मावरती कधीही टाच आली नाही.

ब्रिटिशांच्या काळात या लोकांना नव्याने सुरू झालेल्या औद्योगिकरणाचे शिक्षण मिळाले आणि ही लोक व्यवसायामध्ये हळूहळू उतरु लागले.

यावेळी त्यांच्याशी व्यवहार करताना ब्रिटीशांना त्यांच्या काळानुसार व परिवारानुसार ओळखण्याची आवश्यकता भासू लागली. मात्र मुलाचे नाव ठेवण्याची किंवा आडनाव ठेवण्याची ही पद्धत फारशी लोकांमध्ये नव्हती.

त्यामुळे या लोकांना आपल्या व्यवसायानुसार तसेच एखाद्या गोष्टीवरून वेगवेगळी आडनावे ठेवण्यात आली.

बहुतांश लोक या प्रकारचा व्यवसाय करत त्या व्यवसायाचा मालक या अर्थाने ती वस्तू आणि पुढे वाला प्रत्यय जोडून ही नावे तयार करण्यात आली. यामुळे बंदूक विकणाऱ्या माणसाला बंदूकवाला, पुण्यात राहणाऱ्या माणसाला पूनावाला, दारू विकणार्‍या माणसाला दारूवाला अशी आडनावे आपोआप भेटत गेली.

सुरतमधलं एक कुटुंब लज्जतदार जेवण बनवायचं पण ह्या जेवणाला जबरदस्त वास होता म्हणून त्यांचं आडनाव पडलं वासीकुसी- म्हणजे वास येणारं जेवण. बोंबील माशाच्या व्यवसाय करणाऱ्यांना बुमला नाव पडलेलं आहेच.

पापडखाओ नावाची पारशी माणसं मुंबईत फेमस हायती. खाओ वरून भाजीखाऊ, काकडीखाओ अशीही आडनावं आहेत.  एक कुटुंब तर काकडीचोर आडनावाचे सुद्धा आहे.
सोडावॉटरबॉटलओपनरवाला या नावानं मुंबई येथे अनेक इमारती, कॉम्प्लेक्स आहेत. मसालावाला, नारीयलवाला, पाववाला, आइसवाला (ह्यांनी मुंबईत पहिली बर्फाची फॅक्टरी टाकली होती), केकवाला, कँटीनवाला अशी नावं चर्चेत असतात.
कमिशन व्यवसाय करणाऱ्यांना कमिशनराईत, साखरेचं कन्फेक्शन बनवणाऱ्यांना कन्फेक्शनर, मुख्य शेफच्या हाताखाली काम करणाऱ्यांना मेसमन अशी नावं सुद्धा आहेत.

पण आपला सगळ्यात आवडता किस्साय तो टाटाचा..!

यापैकी गुजरातमधील बडोदा राज्यांमध्ये उतरलेला सुरुवातीचा गट हा प्रामुख्याने धार्मिक शिक्षण देणाऱ्या लोकांचा व पारशी धर्मगुरूंचा होता. त्यामुळे या लोकांनी आपल्या वसाहतीमध्ये तरुण मुलांना झोराष्ट्रीयन धर्माचे धार्मिक शिक्षण देण्यासाठी सुरुवात केली त्यांनी आपल्या गावाचे नाव इराणमधील आपल्या सारी या सोडून आलेल्या प्रांतातील शहरानुसार ठेवले.
सध्या वसवत असलेले गाव हा जुन्या सारीचा नवा भाग असल्याचे दाखवून त्यांनी या जागेचे नाव नवसारी असे ठेवले. येथे पारशी धर्माचे धर्म पीठ स्थापन झाले या धर्मपिठाचा कारभार पाहणारे व लोकांना धार्मिक शिक्षण देणारे पारशी धर्मगुरू यांना स्थानिक गुजराती लोकांमध्ये मोठी मान्यता मिळाली व इतरही लोक त्यांच्याकडे त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन सल्ला मागण्यासाठी जात होते.

बुजुर्ग असणाऱ्या व तसेच अनुभवाने मोठ्या असणार्‍या या माणसांना स्थानिक गुजराती लोक संस्कृत भाषेत “तात” म्हणजे मोठा माणूस किंवा वडीलधारा माणूस या अर्थाने हाक मारत.

तेव्हा या धर्मगुरूंना तात हे विशेषण कायमचे चिकटले. या कुटुंबातील एक मुलगा शिकण्यासाठी मुंबईला आला व त्याने व्यवसायात उतरण्यासाठी पुढाकार घेतला व आपल्या मित्रांसोबत अनेक देशांमध्ये गुंतवणूक सुरू करून इंग्रजांच्या बरोबर काही व्यवहार करण्यास सुरूवात केली.

तेव्हा त्यांचे नाव नोंदवताना ब्रिटिशांनी तात याचा इंग्रजी अपभ्रंश टाटा असा केला व हेच नाव पुढे त्यांना व त्यांच्या कुटुंबासाठी रूढ झाले हा मुलगा होता जमशेदजी टाटा.

पण आता काही नावांचा व्यवसायाशी काही संबंध नव्हता. म्हणजे मुंबईत काजू बदाम नसताना काहींची नावं काजूवाला, बदामवाला आहेत. पण या लोकांचं खाद्यपदार्थ आणि दारुवरच्या प्रेमाखातर त्यांची नावं पडली असतील कारण मुंबईत पिठारोडवर वाईनमर्चंट नावाची वस्तीच आहे.

रमवाला, ताडीवला अशी अनेक नावं या लोकांनी बिनदिक्कत स्वीकारली आहेत.

१९३९ साली गांधीजींनी जेव्हा पहिल्या निवडणुकीत मुंबईच्या नवनिर्वाचित सरकारला खिश्यात घालून दारूबंदी करायला लावली होती तेव्हा त्यांचे अनेक पारशी मित्र त्यांच्यावर नाराज झाले होते . त्यांच्याकडं पारशी दोस्तांच्या पत्रांचा ढीग लागला होता. एकानं तर त्यांच्यावर हल्ला करायची धमकी दिली होती.

अन जाताजाता किस्सा खतम करू काय,

ही दारूबंदी करायची मोहीम जो माणूस पार पाडत होता तोही एक पारशीच होताय त्याचं नाव होतं एमएमडी गिल्डर. यांचे पूर्वज नेदरलँडमध्ये उद्योग करून तिकडलं चलन – गिल्डर पैसे भारतात आणायचे म्हणून त्यांना हे नाव पडलं होतं..

हे ही वाच भिडू 

 

2 Comments
  1. Vinesh Gondane says

    Useful information

  2. भास्कर देवस्थळे says

    पारशी lokanche व्यवहार साचोटीचे असतात, त्यांच्या उत्पादनांची, मग ती पारसी डेरी फार्म मधली मिठाई असो किंवा टाटा चा मोती साबण असो किंवा गोदरेज नवताल असो, गुणवत्ता अप्रतिम असते – कुठे फसवा फसवी नाही!

Leave A Reply

Your email address will not be published.