गोपीनाथ मुंडेंचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः पतंगराव कदम हेलिकॉप्टरने औरंगाबादला आले
विरोधी पक्षनेता कसा असावा ??? आणि विरोधी नेत्यांना देखील कसं हाताळावं ? या प्रश्नाचं उत्तर आजच्या किस्स्यात आहे…
सभागृहासोबतच सभागृहाबाहेर देखील विरोधी पक्ष नेता कसा असतो हे ९० च्या दशकात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलं होतं. याचं एक उदाहरण महाराष्ट्राचा इतिहास कधीही विसरू शकत नाही. ते उदाहरण म्हणजे १९९४ साली काढलेली त्यांनी काढलेली संघर्ष यात्रा काँग्रेसचं सरकार पडण्याचं एक महत्वाचं कारण बनली होती. तेंव्हा स्व.गोपीनाथ मुंडे तेव्हा राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. विधिमंडळाच्या सभागृहात आणि सभागृहाबाहेर त्यांची तोफ नेहमी धडधडत असायची.
ते नेहेमी म्हणत राजकारण करायचं असेल तर लोकांच्यात मिसळायला हवं, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हवेत. समाजातल्या प्रत्येक वर्गाचे प्रश्न, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. आणि त्या मागण्यांना आपण लावून धरलं पाहिजे अशा विचारांचे होते गोपीनाथ मुंडे !
आता ९० च्या दशकातील उदाहरणे सोडली तर अगदी काहीच वर्षांपूर्वीचं उदाहरण बघूयात…२०१३ च्या एप्रिल महिन्यातील गोष्ट आहे. लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी शिरपूर पॅटर्न ची मागणी लावून धरली होती आणि त्यासाठी त्यांनी बेमुदत उपोषण देखील केलेलं.
त्यांचं उपोषण थांबवण्यासाठी पतंगराव कदमांना हेलिकॉप्टरने औरंगाबादेत यायला लागलं होतं.
आपल्या राज्यातील निसर्गराजा अनेकदा सुक्या आणि ओल्या दुष्काळामुळे रौद्ररुप धारण करताना दिसतो. गेली अनेक वर्षे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश गावांनी आणि पर्यायाने शेतकर्यांनी या दुष्काळाची झळ सहन केली आहे आणि करीत आहेत.या दुष्काळात पोळलेल्या, पाण्यासाठी आसुसलेल्या खेड्यां-पाड्यातील कुटुंबांना थोडासा आल्हाददायक ओलावा देण्याचा ध्यासच गोपीनाथ मुंडे यांनी घेतलेला आणि बेमुदत उपोषण केले होते.
सोमवारी त्यांनी हे बेमुदत उपोषण सुरु केले होते. आणि तेंव्हा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. आणि मदत व पुनर्वसनमंत्री होते पतंगराव कदम.
मुंडे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर सरकारच्या पातळीवरील हालचालींना वेग आला होता. मंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका मुंडे यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांच्याशी पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मंत्र्यांनी संपर्क साधला.
तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुंडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पतंगराव कदम यांना तात्काळ चर्चेसाठी औरंगाबादला पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासमवेत राज्यमंत्री रणजित कांबळे, विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर होते.
हालचालींना इतका वेग आलेला की, पतंगराव कदम यांनी थेट हेलिकॉप्टरने औरंगाबादेत गाठलं होतं. ते थेट विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या मुंडे यांच्याकडे गेले. सरकार दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी तेथे सांगितले.
दोन्ही नेत्यांमध्ये सुभेदारी विश्रामगृहाच्या दालनात चर्चा झाली. पतंगराव कदम यांनी मुंडे यांना म्हणाले, “मी मदत व पुनर्वसनमंत्री म्हणून शब्द देतो कि, दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकारला मी ताबडतोब निर्णय घ्यायला लावतो पण हे बेमुदत उपोषण मागे घ्या”.आणि तेंव्हा कुठे पतंगराव कदम यांच्याशी एक तासाच्या चर्चेनंतर मुंडे यांनी उपोषण मागे घेण्याचे मान्य केले.
एका तासाच्या चर्चेनंतर कदम यांनी मुंडे यांना सरबत देऊन उपोषण सोडविले.
आणि मुंडे यांच्याचमुळे शिरपूर पॅटर्ननुसार जलसंधारणाची मागणी मान्य झाली होती.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी सांगितले होतं की, “मराठवाड्यात शिरपूर पॅटर्ननुसार जलसंधारणाची कामे करण्याची मागणी मान्य करण्यात आली. दुष्काळी ३८ तालुक्यांत जलसंधारणाची कामे करावीत. ‘एमआयईजीएस’मधून रेल्वेचे मातीकाम करावे, पैसेवारीची अट टँकर व जनावरांच्या छावण्यांसाठी लागू करू नये, या मागण्या मान्य झाल्या आहेत”.
पण यानंतरही ते काय शांत झाले नाही त्याच्या २ च दिवसानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिराळच्या छावणीत मुक्काम ठोकला होता. याच ठिकाणी रात्री दहा वाजता मुंडे यांनी दुष्काळी परिषद घेतली होती. यावेळी आष्टी, पाटोदा तालुक्यात तेंव्हापर्यंत पाण्यासाठी कोट्यावधी निधी सताधारी मंडळींनी खर्च केला होता. तरीही पाण्याचा प्रश्न सुटला नव्हता.
रात्रीच्या दहा वाजता त्यांनी दुष्काळी परिषद घेतली होती.
“दुख, वेदना ऐकून घेतल्याने कमी होतात त्यामुळे आपण दुष्काळी जनतेचे, शेतकऱ्यांच्या भावना, ऐकून घेण्यासाठी मुक्कामाला आलो आहोत. दुष्काळासारखी आपत्ती ओढवली असताना सरकारमधील मंत्रीगण मात्र दुष्काळग्रस्त जनतेला आधार देत नाहीत.
उलट दुष्काळग्रस्तच्या जखमेवर मीठ चोळत अहेत. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचार आणि नियोजनशून्य कारभारामुळे दुष्काळाची तीव्रता वाढल्याचा आरोपही मुंडे यांनी यावेळी केला होता.
“मात्र आता आपण या भागातील दुष्काळ निर्मुलन करण्यासाठी सुरेश खानापूरकर यांचा ‘शिरपूर पॅटर्न’ या भागात राबवणार आहोत, या जलसंधारणाच्या कामासाठी जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाच कोटी निधी खासदार निधीतून देण्याची घोषणा ही खासदार मुंडे यांनी यावेळी केली होती.
हे हि वाच भिडू
- पोरं १८ व्या वर्षी कॉलेजला जातात त्या वयात पतंगरावांनी विद्यापीठ काढलं
- अन् पोस्टाने आलेल्या ८६ मतांनी पतंगराव कदमांचा पराभव झाला.
- पराभवानं खचलेल्या कार्यकर्त्यांना गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं होतं, रडायचं नाही लढायचं…