दूसऱ्या दिवशी सगळा अकोला जिल्हा पातूरमध्ये जमला. सोन्याची नाणी गोळा करायला झुंबड उडाली.
ही सत्यकथा आहे १९७४ सालची. अकोला जिल्ह्यातल्या पातूर गावात एक लग्न सुरु होतं. जेवणं आटोपत होती. नव्या नवरा नवरी ची भेट घ्यायला गर्दी उडाली होती. अशातच मुलीचा लांबचा मामा तिला आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर आला. त्याच्या झोकांड्या देत चालण्या मुळे लक्षात आलेलं कि मामाने आज सकाळ सकाळी पहिल्या धारेची दारू घेतलेली आहे.
मामाने दोघांना भरभरून आशीर्वाद दिला आणि जाता जाता नवरीच्या हातात एक नाणं दिल.
गंमत म्हणजे ते नाणं अस्स्स्ल सोन्याचं होतं. जवळ जवळ दीड तोळ्याचं ते नाणं या दारुड्या कडे कुठनं आलं याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. कोणीतरी त्याला दमदाटी करून विचारलं,
कुठून आणल रे हे सोन्याचं नाणं ??कुठे चोरी केली ?
दारुड्याने सांगितलं कि चोरी केली नाही अशी अनेक नाणी बोर्डी नदी मध्ये आहेत.
हे ऐकल्या ऐकल्या अख्खा लग्नाचा मांडव बोर्डी नदीच्या दिशेनं धावू लागला. खरंच तिथे सोनं सापडत होता. प्रत्येकाने जमेल तेवढी नाणी उचलली. हा हा म्हणता म्हणता सारा गाव तिथे गोळा झाला. एव्हाना रात्र झाली होती. पेटते टायर, पेट्रोमॅक्सचे दिवे लावून त्या प्रकाशात संशोधन सुरु होता.
कुठल्या तरी बाबानं सांगितलं की,
नदी आपल्या गावावर प्रसन्न झाली आहे. तिचा आशीर्वाद घ्या म्हणजे ती सगळी संपत्ती बाहेर काढेल.
एका दगडाला शेंदूर फासून तिचं गिनीदेवीमध्ये रूपांतर करण्यात आलं. शोधकार्याने गती घेतली. एका रात्रीत शेजार पाजारच्या गावातही ही बातमी वणव्या सारखी पसरली.
दुसऱ्या दिवशी सगळा अकोला जिल्हा पातूर मध्ये हजर झाला. लाखो लोकांची झुंबड उडाली.
गर्दीला यावर घालण्यासाठी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. सोन्यासाठी लोक बेभान झाले होते. जमावाला पांगवण्यासाठी ४ अश्रुधुराच्या ४ नळ कांड्या फोडण्यात आल्या. तरीही काही उपयोग होत नव्हता. अखेर पोलिसांना १४४ कलम जारी करावे लागले.
त्यादिवशी ३६ किलो वजनाची ३ हजार २६२ नाणी सरकार दरबारी जमा झाली. रात्रभर लोकांनी पळवलेली नाणी किती होती याचा हिशोबच नव्हता.
नाणेसंशोधकांनी इतिहासाचा अभ्यास केल्यावर कळलं कि हे सोनं मुघल कालीन होता.
शाहजहान गादीवर होता तेव्हा त्याचा सरदार ख्वाजा जहाँ याला गोवळकोंडा मधून वसूल केलेल्या खंडणीचा खजिना सुरतच्या ठाण्यात जमा करायचा होता.
मजल दरमजल करता करता मुघल सैन्य विदर्भात पोहचलं. पातूर चा हिरवागार परिसर बघून त्यांनी तिथे तात्पुरती छावणी उभा केली. नेमकी हि छावणी नदीच्या पात्रात उभी होती. रात्री अचानक अतिवृष्टी झाली आणि बोर्डी नदीला महापूर आला.
काहीजण सांगतात कि पातुरच्या संत शहा बाबू ने दिलेल्या शापामुळे हा महापूर आला होता.
या पुरात मुघल सैन्य तर वाहून गेलंच शिवाय त्यांचा खजिनाही वाहून गेला. हाच तो खजिना एका दारुड्यामुळे सापडला. आजही इंटरनेटवर अकोलाची मुघलकालीन नाणी विक्री साठी आढळतात.
हा किस्सा महाराष्ट्रातील चलनाचा इतिहास या पद्माकर प्रभुणे यांच्या पुस्तकात सांगितला आहे.
हे ही वाच भिडू.
- असा होता थरार, साडेपाच लाखांच्या खजिना लुटीचा..
- कोल्हापूरातल्या या गावात चालतां चालतां सोनं घावतय !
- जाके बोल तेरे निझामको, वऱ्हाड के लोगोंके घरसे कस्तुरी का सुगंध आता है.