प्रवीण दरेकर सेनेत असल्यापासून उद्धव ठाकरेंचे विरोधक राहिले आहेत
शुक्रवारी महाड मधील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अधिकारी, मंत्री पोहोचण्यापूर्वी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घटनास्थळी पोहचले होते. त्यांतर त्यांनी कोकणात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपकडून आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यात प्रवीण दरेकर सुद्धा आघाडी असतात. विधानपरिषदेत सुद्धा ते आपली बाजू लाऊन धरण्यात पुढे आहते.
यानंतर अनेकांकडून आता प्रवीण दरेकर हे राजकारणात कसे आले, सुरुवात कुठल्या पक्षातून केली, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे. असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बोल भिडूने याचा घेतलेला आढावा.
महाड सोडून मुंबई गाठली
प्रवीण दरेकर यांचे जन्म रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वसाप या गावतील. त्यांचे लहानपण येथेचं गेले. त्यांचे वडील यशवंत दरेकर हे एसटी महामंडळात कंडक्टर होते. तर त्यांची आई मासळी विक्री करत असे. प्रवीण दरेकर लहान असतांना त्यांच्या वडिलांची नोकरी गेली होती. पोलादपूर येथे १० वीचे शिक्षणपूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. १२ आणि पदवीचे शिक्षण मुंबई येथे पूर्ण झाले.
१९८७ पासून शिवसेनेत काम
प्रवीण दरेकर १९८७ पासून शिवसेनेशी जोडले गेले होते. १९८९ मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांचे कॉमर्सचे शिक्षण पूर्ण झाले. त्यापूर्वीच त्यांचा शिवसेनेशी संपर्क आला होता. काही वर्षापुर्वीच राज ठाकरे यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी आली होती. त्यावेळी मुंबईत विद्यार्थी सेनेचा मोठा दबदबा होता.
प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी सेनेतून कामाला सुरुवात केली. नंतर त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांतर राज ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्या जवळीक वाढली होती.
राज समर्थक असल्याने दरेकरांचे तिकीट कापण्यात आले होते
१९९७ साली महापालिका निवडणुकीत प्रवीण दरेकर यांना दहिसर भागातून उभे राहायचे होते. त्यांना तिकीटही देण्यात आले होते. राज ठाकरे यांनी आपल्या समर्थकांना तिकीट मिळायला हवे असे सांगितले होते. त्यामुळे दरेकर यांना तिकीट देण्यात आले होते. ते राज ठाकरे समर्थक म्हणून ओळखले जात होते. पुढील काही वेळात त्यांचे तिकीट कापल्याचे सांगण्यात आले. राज ठाकरे समर्थक असल्याने दरेकर यांचे तिकीट कापण्यात आले होते.
ते तिकीट उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना देण्यात आले होते. यावेळी दहिसर परिसर मोठा राडा झाला होता. १९९५ पासून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत लक्ष घालायला सुरुवात केली होती. तेच शिवसेनेचे काम पाहत होते. यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे जमत नव्हते. प्रवीण दरेकरचं नाही तर इतरही राज ठाकरे समर्थकांची तिकिटे त्यावेळी कापण्यात आली होती.
दरेकरांनी दहिसर परिसरात कार्यकर्त्यांची चांगली फळी तयार केली होती. मात्र इतर नेत्याप्रमाणे राज ठाकरे समर्थक असल्याने शिवसेनेकडून दरेकर यांचे पंख कापण्यात आले होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या सोबत प्रवीण दरेकर हे सुद्धा होते.
राज ठाकरे यांच्या सोबत मनसेत
२००६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापन केली. दरेकर हे राज ठाकरे यांच्या सोबत राहिले. शिवसेनेचा पिंड असणाऱ्या दरेकरांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख दिवसेंदिवस वाढल्याचे दिसते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईतील मागाठाण्यातून विजय मिळविला होता.
मात्र पुढच्या विधानसभा २०१४ निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २००९ मध्ये निवडून आलेले मनसेचे अनेक उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यानंतर मनसेत गळती सुरु झाली. त्यातूनच अनेक मनसेचे नेत्यांनी भाजपकडे वळविला होता. त्यातच दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेचा घोटाळा बाहेर आला आणि त्यांची चौकशी सुरू झाली. त्यानंतर २०१५ मध्ये दरेकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
परत शिवसेनेत घेण्यासाठी प्रयत्न
२०१४ मध्ये मनसे सोडतांना त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेत परत बोलाविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनेची कमान उद्धव ठाकरे यांच्याकडे होती. उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांची मातोश्रीवर भेट झाली. या दोन्ही नेत्यात सुमारे दोन तास चर्चा झाली होती. मात्र त्यानंतरही प्रवीण दरेकर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
घोटाळ्याचा आरोप
प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे २००० पासून संचालक होते. २०१० पासून अध्यक्ष आहेत. मुंबै बँकेत हे कर्ज वाटप करताना कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यावेळी प्रवीण दरेकर हे त्यावेळी मुंबै बँकेचे अध्यक्ष होते. बँकेच्या काही सदस्यांनी नाबार्डकडे या कर्ज वाटप प्रकरणाची तक्रार केली होती.
या प्रकरणी २०१५ मध्ये विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर. शिवाजी नलावडे आणि राजा नलावडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. 1998 पासून 123 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं.
मतदार संघ शिवसेनेकडे असल्याने भाजपकडून विधानसभे ऐवजी विधानपरिषद
भाजपमध्ये आल्यानंतर दरेकर यांनी पुन्हा एकदा मागाठणेमधून तिकीट मिळावे यासाठी आग्रह धरला होता. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. २०१६ मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. एकेकाळी राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे दरेकर भाजप आल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले झाले. त्यामुळेच फडणवीसांनी त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावली. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांना देण्यात आले आहे.
हे ही वाच भिडू
- भाजपचे मुख्यमंत्री म्हणाले, वाजपेयी पंतप्रधान होतील पण आधी निवडून तरी येऊ देत.
- २०१६ पूर्वीचं चित्र बदललं आणि एक-एक करत ईशान्य भारतातील सर्व राज्ये भाजप जिंकत गेली..
- पंकजा मुंडे यांचं नाव देखील भाजपच्या निवडणूक चिन्हावरून ठेवण्यात आलं होतं