राणी चेन्नम्माच्या समोर इंग्रजांनी हातापाया पडून माफी मागितली होती…
देशाच्या स्वातंत्रलढ्यात अनेक नेते, समाजसुधारक आणि योध्यांचं योगदान आहे. ज्यात महिलांनाचा सुद्धा समावेश आहे. यात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचं नाव आपसूकचं आधी घेतलं जात. पण याच यादीत आणखी एक नाव आहे ते म्हणजे राणी चेन्नमा.
राणी चेन्नम्माची यांची कहाणी जवळजवळ झाशीच्या राणी लक्ष्मीबाईसारखी आहे. म्हणूनच त्यांना ‘कर्नाटकची लक्ष्मीबाई’ म्हंटलं जात.
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध सशस्त्र बंडाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय शासक होत्या.
जरी त्यांच्या सैनिकांची संख्या ब्रिटीश सैन्यापेक्षा कमी होती आणि त्यांना अटक करण्यात आली होती. पण तरीसुद्धा ब्रिटिश राजवटीविरूद्ध बंडखोरीचे नेतृत्व केल्याबद्दल त्या आजही स्मरणात आहे.
तर चेन्नम्मा यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1778 रोजी ककाती येथे झाला. कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यातील हे एक छोटेसे गाव. त्यांचा विवाह देसाई राजघराण्याचे राजे मल्लसराजाशी झाला आणि त्यानंतर त्या कित्तुरूची राणी बनल्या.
कित्तुरू सध्या कर्नाटकात आहे. दरम्यान, काही वर्षांत राजा मल्लसराज यांचे निधन झाले. या दुःखातून बाहेर पडत नाही तर त्यांची मुलगा १८२४ मध्ये मरण पावतो. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर, त्यांनी दुसरे मूल शिवलिंगप्पा दत्तक घेतले आणि त्याच्या सिंहासनाचा वारस घोषित केला.
पण ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या डॉक्ट्रिन ऑफ लेप्स पॉलिसी अंतर्गत हे स्वीकारले नाही. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८२४ मध्ये कित्तुरू ताब्यात घेतलं.
ब्रिटिशांच्या ‘डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स’च्या धोरणानुसार दत्तक पुत्रांना राज्य करण्याचा अधिकार नव्हता. जेव्हा अशी परिस्थिती आली तेव्हा ब्रिटीश आपल्या साम्राज्यात त्या राज्याला जोडत असत.
ब्रिटीश राजवटीने शिवलिंगप्पाला हद्दपार करण्याचे आदेश दिले. पण चेन्नम्मा ब्रिटिशांच्या आदेशाचे पालन करत नव्हत्या. त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीचे लेफ्टनंट गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांना पत्र पाठवले. त्यांनी कित्तुरूच्या प्रकरणात संबंधित डॉक्ट्रिन ऑफ लेप्स पॉलिसी लागू करू नये असे आवाहन केले. पण त्याची विनंती ब्रिटिशांनी नाकारली.
अशा प्रकारे ब्रिटिश आणि किट्टुरू यांच्यात लढाई सुरू झाली. ब्रिटिशांनी कित्तुरूच्या खजिन्याला आणि दागदागिने जप्त करण्याचा प्रयत्न केला, ज्याची किंमत १५ लाख रुपये होती. पण त्यांना यश आले नाही.
ब्रिटिशांनी २०,००० सैनिक आणि ४०० तोफा घेऊन कित्तुरूवर हल्ला केला. ऑक्टोबर १८२४ मध्ये त्यांच्यात पहिली लढाई झाली. त्या लढाईत ब्रिटिश सैन्याचे प्रचंड नुकसान झाले. ब्रिटिशांचा एजंट सेंट जॉन ठाकरे कित्तुरू सैन्याच्या हाताने मारला गेला. तर सर वॉल्टर इलियट आणि स्टीव्हनसन या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांना ओलिस घेण्यात आले. जेव्हा ब्रिटिशांनी आश्वासन दिले की ते यापुढे लढणार नाहीत, तेव्हा राणी चेन्नम्मा यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना सोडले.
पण ब्रिटिशांनी विश्वासघात केला आणि पुन्हा युद्ध सुरू केले. यावेळी ब्रिटिश अधिकारी चॅप्लिनने पूर्वीपेक्षा जास्त सैनिकांसह हल्ला केला. सर थॉमस मुनरो यांचे पुतणे आणि सोलापूरचे उपजिल्हाधिकारी मुनरो यांची हत्या झाली. राणी चेन्नम्माने त्यांचे सहयोगी सांगोली रायण्णा आणि गुरुसीडप्पा यांच्यासोबत मिळून जोरदार लढा दिला.
पण राणीचा पराभव झाला कारण त्यांच्याकडे ब्रिटिशांपेक्षा कमी सैनिक होते. राणी चेन्नम्मा यांना बेलहोंगलच्या किल्ल्यात कैद करण्यात आले. तेथे 21 फेब्रुवारी 1829 रोजी त्यांचे निधन झाले.
चेन्नम्मा यांचा शेवटच्या लढाईत पराभव झाला असला तरी त्यांचे शौर्य कायम लक्षात राहील. त्याचा पहिला विजय अजूनही साजरा केला जातो. कित्तूरूमध्ये दरवर्षी 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान किट्टुरू महोत्सव आयोजित केला जातो ज्यामध्ये त्यांचा विजय साजरा केला जातो.
राणी चेन्नम्मा यांना बेलहोंगल तालुक्यात पुरण्यात आले आहे. त्यांची समाधी एका छोट्या उद्यानात आहे ज्याची देखरेख सरकार करते.
नवी दिल्लीतल्या संसद कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. 11 सप्टेंबर 2007 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते कित्तुरुच्या राणी चेन्नम्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. विजय गौड यांनी तयार केलेली कित्तूर राणी चेन्नम्मा स्मारक समितीने ही मूर्ती दान केली होती.
हे ही वाच भिडू.
- भारतात स्त्री शिक्षण या राणीमुळे सुरु झालं, अंगावरचे दागिने गरिबांना वाटून टाकले होते..
- भोपाळच्या राजाने राज्यावर संकट आलं म्हणून राणीचा शिरच्छेद केला होता
- छत्रपतींची नातसुन जिजाबाईंनी शेवटपर्यंत करवीर राज्यावर पेशव्यांचे वर्चस्व येऊ दिले नव्हते.