आज तुम्ही रजिस्टर लग्न करू शकता ह्यासाठी महात्मा फुलेंनी संघर्ष केला आहे

लग्नकार्य, पूजाअर्चा, जन्मापासून ते मरणा पर्यंतचे सर्व विधी शुभ-अशुभ अशी सगळी धार्मिक कामे करण्यासाठी गावात ब्राह्मणकाका असतात. जुन्नर भागात अजूनही यासाठी ग्रामजोशी ही संकल्पना आढळते. उत्तरेतील काही राज्यांमध्ये देखील ही संकल्पना अजून रुजून आहे. 

खरंतर शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या गरजा भागविण्यासाठी सुतार, लोहार, कुंभार, सोनार, चांभार, महार, मांग किंवा मातंग, न्हावी, परीट, गुरव, ग्रामजोशी व कोळी अशा बारा बलुतेदारांचा एक वर्ग गावाच्या अर्थव्यवस्थेत आपोआपच तयार होत गेला होता. 

मात्र या व्यवस्थेत जेव्हा वर्णव्यवस्था घातली गेली तेव्हा मात्र त्यांच्यात भेदभाव आणि जातींना पारावार उरला नाही. 

गावांमध्ये श्रीमंत सावकार आणि त्यांना मदत करणारे ग्रामजोशी व ब्राह्मण काका यांची एक साखळी तेव्हाही तयार झाली होती तेव्हा देशात इंग्रजांचे प्रशासन होते.

महाराष्ट्रात पैशेवाले आणि धर्मवाले यांची युती ओळखणारे पहिले माणूस होते महात्मा फुले. 

जुन्नर भागामध्ये या काळात सावकारशाही विरुद्ध मोठे आंदोलन उभे राहिले होते व त्यांना पाठिंब्याची गरज होती. पुण्यातील जवळपास सर्वच वर्तमानपत्रे व जनता सावकारांच्या बाजूने उभी राहिली होती. शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात होता.

तेथील भाऊ पाटील या कार्यकर्त्याने जेव्हा महात्मा फुले यांची मदत मागितली तेव्हा ते पुण्याहुन निघाले व त्यांनी थेट जुन्नर मध्ये जाऊन लोकांची सभा भरवली आणि आपला पाठिंबा शेतकरी लोकांना दिला. तेथे जाऊन त्यांनी लोकांची ह्या गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलू  टाकली.

“आम्ही शूद्रातिशूद्र लोक माळी, कुणबी, धनगर, महार, मांग, चांभार, मराठे, भिल्ल आणि कोळी आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. अतिशूद्र बांधवांना भावासारखा वागवा यानेच समाजाचे कल्याण होणार आहे” 

अशी स्पष्ट आणि उघड सूचना महात्मा फुले यांनी ओतूरमध्ये भाषणात सगळ्या गावासमोर दिली होती. पंधरा हजार लोकांचा प्रचंड जनसमुदाय त्यांच्या समोर होता व त्यांनी महात्मा फुलेंच्या म्हणण्यानुसार आपल्या सर्व धार्मिक जीवनातून ब्राह्मणी विचारांना बाहेर काढण्याचे ठरवले. 

पण लग्न म्हणजे ब्राह्मण-ग्रामजोशी-दक्षिणा हे समीकरण ठरलेले होते. आजची नाही तर ही शतकानुशतके चाललेली प्रथा होती. ती इतकी रुजलेली होती की, काळाच्या ओघात अशी दक्षिणा वसूल करणे हा वतनदार जोश्यांचा वंशपरंपरा हक्क बनला होता. 

ही ईश्वर आणि माणसामधील मधल्या माणसाची कल्पना उधळून लावण्यासाठी सत्यशोधक समाजाने आपल्या समुदायातील विवाह हे ब्राह्मण व जोशी यांच्या कोणत्याही अनुमतीशिवाय स्वतःचे स्वतः करायला सुरुवात केली (कुणाला युरोपातील मार्टिन ल्युथर यांची पोप विरुद्ध केलेल्या चळवळीची आठवण झाली तर आपण जबाबदार नाही). 

मात्र ब्राह्मणेतर लोकांना हा लग्न करून घेण्याचा अधिकारच नाही व या सर्व गोष्टी आणि लग्न हक्कदार भटांकडून करवून घेतली नाहीत तरी ग्रामजोशाला दक्षिणा हक्काने मिळालीच पाहिजे, असे सर्व कर्मठ लोकांचे म्हणणे होते.  

मात्र त्यांच्या या म्हणण्याला न जुमानता सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मुला-मुलींची लग्ने लावायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांना ब्राह्मणांच्या कोणत्याही मदतीशिवाय लग्न लावता येत नव्हती तेव्हा फक्त “हर हर महादेव” असे मंडपात म्हणून लग्न लावण्यात येत असे. 

ओतूर मधील सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते बाळाजी पाटील यांनी आपल्या दोन मुलींची लग्न महात्मा फुले यांच्या उपस्थितीमध्ये अशाच प्रकारे उरकून दिली व महात्मा फुले पुण्याला परत आले. (बरेचदा याच बाळाजी पाटील यांचा फोटो महात्मा फुले यांचा फोटो म्हणून पसरवून दिला जातो.) 

पण फुले पुण्याला परतताच येथील  ब्राह्मण लोकांनी स्थानिक पाटील  व इतर भाज्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली व पौरोहित्य करण्याबद्दल आपले पैसे मागितले ज्या आर्थिक व्यवहार झाला आहे या आर्थिक आम्ही तिथे असो अथवा नसो तरीही ब्राम्हणांना दक्षिणा देणे हे  तुमचे कर्तव्य आहे म्हणून त्यांनी दक्षिण यांची मागणी केली वास्तविक पाहता जे काम आपण केले नाही त्यासाठी मोबदला मागणे म्हणजे न शिकवलेल्या विद्यासाठी द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागणे असेच आहे, असं स्थानिक लोकांचं मत पडलं. 

आपल्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे विवाह सुद्धा करता येऊ नये व न केलेल्या कामासाठी इतर कुणाला पैसे द्यावेत ही कल्पना तत्कालीन सुधारणावादी विचारांच्या लोकांना रुजली नाही व म्हणूनच त्यांनी ही दक्षिणा देण्यास नकार दिला. 

याविरुद्ध ब्राह्मण मंडळींनी थेट कोर्टामध्ये अपील केले. या कोर्टामध्ये न्यायाधीश महादेव श्रीधर हे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते व त्यांचा ब्राह्मण समाजाच्या विषयीचा दृष्टीकोन हा सनातनी ब्राह्मण सारखाच होता त्यामुळे त्यांनी या खटल्यात तडकाफडकी निकाल जोशी साहेबांच्या पक्षांमध्ये लावून दिला व त्यांना या नुकसानीसाठी दंड भरावयाला सांगितले. 

दरम्यानच्या काळात त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी व सत्यशोधक समाज जिथपर्यंत पसरला आहे तेथील सर्व सगळ्यांनी एकत्र येऊन महात्मा फुले यांचा त्यांच्या जीवनातील कार्याबद्दल फार मोठा सत्कार सोहळा आयोजित केला त्याला मोठे मोठे लोक उपस्थित होते. 

सत्कारसोहळा झाला तेव्हा सत्यशोधक कार्यकर्ते ओतुरचा खटला जिंकले नव्हते मात्र खटल्यामुळे महात्मा फुलेंच्या सहकाऱ्यांचं मनोबल वाढलं होतं. जिल्हा कोर्टाचा निर्णय आपल्या विरोधात लागला याविरुद्ध त्यांनी थेट जनतेकडे जाण्याचे ठरवले व लोकांना या खटल्यात संबंधी माहिती व्हावी म्हणून त्यांनी खालील प्रकारची खबर प्रसिद्ध केली व याची पत्रके सर्वत्र वाटण्यात आली- 

“ग्रामजोश्यासंबंधी जाहीर खबर (१८८४)”

जोतीराव गोविंदराव फुले

(ग्रामजोश्यांच्या हक्काबद्दलच्या मोकदमा नंबर ८३१ सन १८८४ यांतील हंशील.)

जाहीर खबर

सर्व हिंदु धर्मानुयायी त्यांतून मुख्यत्वेंकरून मराठे, माळी, कुणबी, कोळी, धनगर वगैरे जातीचे लोकांस ह्या पत्राद्वारे जाहीर करण्यांत येते की, ब्राह्मण लोक आमचे लोकांकडून लग्नकार्यास किंवा देवदेवतांच्या पूजाअर्च्या करण्यासमयीं आणि इतर शुभाशुभ कार्याचे वेळीं मनास वाटेल त्याप्रमाणे यजमानाकडून अडवून पैसे घेतात. ह्या सर्व कारणांकरिता व प्रत्येक मनुष्यास आपापले धर्मसंबंधी कार्य करण्यास हिंदु शास्त्राची पूर्ण सत्ता असल्यामुळें आज कित्येक दिवसांपासून वर दर्शविले जातींचे लोक ह्या मुंबई इलाख्याचे कित्येक भागावर ब्राह्मणांचे (भटांचे) साह्याशिवाय वर दर्शविलेलीं धर्मसंबंधी कार्यें करीत आहेत; परंतु हें करणें भट लोकांस न आवडून व त्यांचे रक्ताचें पाणी झाल्याशिवाय फुकट मिळत असलेलीं उत्पन्नें बुडूं पहात आहेत, हें जाणून जुन्नर प्रांतातील भटांनी ओतूर येथील कांही जोशांस पुढें करून रा॰ बाळाजी उर्फ काशीबा कुशाजी पाटील डुमरे, ओतुरकर यांनीं आपल्या दोन मुलींची लग्नें स्वतः लाविलीं म्हणून भटांची ६॥ रुपये (साडेसहा असं लिहायचे तेव्हा, दिडकी पाठ असणाऱ्या लोकांना माहीत असेल) नुकसान झाली, यास्तव ती नुकसान सदरचे बाळाजी यांजकडून भरून घेण्याकरितां वामन जगन्नाथ, शंकर बापुजी, बळवंत सखाराम, रामचंद्र सदाशिव जोशी, उदास या सर्वांनी जुन्नर कोर्टांत फिर्याद केली. सांप्रतचे काळास अनुसरून पहातां भटांचा कोणत्याही प्रकारचा हक्क इतर लोकांवर पोंचत नाहीं, हे न्यायदृष्टीने उघड असून न्यायाधीश महादेव श्रीधर, सबार्डिनेट जज्ज, जात ब्राह्मण यांनी आपले ब्राह्मण फिर्यादीचे स्वरूपाकडे पाहून ता॰ २९ मार्च सन १८८६ इसवी. रोजीं असा ठराव केला की, प्रत्येक लग्नाबद्दल प्रतिवादी बाळाजी पाटील डुमरे यांनी ४ आणे म्हणजे दोनी लग्नांबद्दल ८ आणे द्यावेत असा ठराव केला. 

ह्या ठरावाबद्दल वरिष्ठ कोर्टांत प्रतिवादी यांजकडून अपील होणें आहे व अपीलाचा निकाल लागेपर्यंत आमचे लोकांनी म्हणजे ज्यांचे येथें लग्नकार्यें होतील व जेथें भटजी किंवा ग्रामजोशी लग्न लाविण्याबद्दल हक्काने पैसा मागतील, तेथें प्रत्येक लग्नाबद्दल मशारनिल्हे रा॰ सा॰ सबजज्ज यांच्या ठरावान्वये तूर्त चारच आणे लग्न साडे वगैरे विधि करून घेतल्यानंतर द्यावे लागतील व हे सबजज्ज साहेबांच्या फैसल्यावरून सर्वांस कळविण्यात येत आहे.

या खटल्यातील फिर्यादीच्या क्रमांक (फिर्यादाचा क्रमांक ८३१) आणि सन १८८४ चा जुन्नर कोर्टाचा शिक्का JUDGE JUNAR SUBORDINATE COURT हा देखील फुले यांनी या पत्रामध्ये समाविष्ट केला आहे.

सर्वात शेवटी या खटल्यातील आरोपींची नावे त्यांनी लिहिली आहेत: (पा. रे पाटलाचा असे वाचावे)

जोतीराव गोविंदराव फुले.

नारायण मेघाजी लोखंडे.

भाऊ कोंडाजी पा. डुंबरे.

रामचंद्र तुकाराम हेजीब.

लक्ष्मण गणुजी शेटे.

विश्राम कुशाजी पा. पवार.

रावजी मल्हारजी बोकड.

संतु रामजी लाड.

चिमणाजी मथाजी पा. डुंबरे

गणु बापुजी पा. डुंबरे

अशाप्रकारे फुले यांनी यावेळी समाज बदलण्यासाठी वेगळी युक्ती वापरली व लोकांमध्ये पहिल्यांदा आपल्या बाजूने जनमत निर्माण केले यानंतर त्यांनी पाटलांना पुन्हा पुणे येथील पहिल्या वर्गातील दुय्यम न्यायाधीशांकडे आवेदन करायला सांगितले हे न्यायाधीश महादेव श्रीधर यांच्या वरिष्ठ न्यायाधीश होते होते. 

त्यांनी या खटल्याचे पुनर्वालोकन करुन खटल्याचा निकाल बालाजी पाटील यांच्या बाजूने दिला.

इथे सत्यशोधक समाजाचा विजय झाला होता मात्र सनातनी लोकांना ही बाब भरण्यासारखी नव्हती व म्हणून त्यांनी याचा बदला घेण्यासाठी जुन्नर व पुणे या दोन शहरांमध्ये ब्राह्मणांच्या सभा भरविल्या व त्यानंतर मुंबई येथील हायकोर्टामध्ये हा खटला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

मुंबई हायकोर्टाच्या जुन्या दस्तऐवजांमध्ये,

Sir Charles Sargent and Mr. Justice Candy in Waman Jagannath Joshi v. Balaji Kusaji Patil (1888) I.L.R, 14 Bom. 167,169

नावाचा खटला अजूनही सापडतो. 

ह्या खटल्याचा वापर पुढे वेळोवेळी केला गेला आहे. ह्यात वामन जोश्यानी बाळाजी पाटलांवर आरोप केले की त्यांनी आपल्या पौरोहित्य करण्याची फी बुडवली आहे. ह्यातून मार्ग काढण्यासाठी कोर्टात हा विवाह शास्त्रोक्त नाही हे सिद्ध करण्यात आले. 

हा विवाहच शास्त्रोक्त नसल्याने त्यासाठी दक्षिणा द्यायची गरजच काय असा सडेतोड प्रतिवाद फुले आणि पाटील यांच्या पक्षाने केला. त्यांच्याशी सहानुभूती असणाऱ्या साक्षकर्त्या लोकांनी कोर्टात जबाब दिले की,

 The marriages were performed without any prescribed ceremonies, and no priest as such, was employed. There was no ganeshpujan (लग्नातली गणेशपूजा). There was nothing beyond the placing of garlands on the necks of the bride and bridegroom.

There was no distribution of fees (दक्षिणा); therefore the village joshis cannot claim any fees. There is a separate ritual for the Sudras of the defendant’s caste. That ritual was not performed.

हा विवाह ‘घरचे लग्न’ ह्या पद्धतीने झाला असल्याने आणि त्यामध्ये तुम्ही दक्षिणा दिली नसल्याने जोशी किंवा ब्राह्मण समुदायाचा दक्षिण वरील अधिकार सिद्धच होत नाही, अशी कबुली कोर्टासमोर दिली गेली. 

बाळाजी पाटील यांनी आपल्या कबुली मध्ये बोलताना सांगितले की,

“आमचे पूर्वज वर्षानुवर्षे या प्रकारचा विवाह करत असल्याचे गावातील जुन्या लोकांचे म्हणणे होते. माझ्या जातीतील लोकांनी सांगितले त्याप्रमाणे मी हा विवाह केला आहे त्यामुळे मला त्याचा तांत्रिक/वैधानिक बाबींविषयी काहीही शंका नाही. घरचे पुरोहित वापरून आम्ही हा विधी केला आहे.” 

त्यांचे म्हणणे मान्य केले व कोर्टाच्या दोन्ही दज सर चार्ज सार्जंट आणि जस्टीस कॅंडी यांनी जुन्या न्यायालयाचा निकाल बदलून या खटल्याचा निकाल पाटील व फुले यांचा पक्षांमध्ये दिला आणि बहुजनांचा स्वतःचे पौरोहित्य स्वतः करण्याचा अधिकार मान्य केला. 

इथून पुढे लग्न करण्यासाठी किंवा कोणताही धार्मिक विधी करण्यासाठी हिंदू धर्मातील लोकांना ब्राह्मण पुरोहित असण्याचे बंधन कायमचा मोकळे झाले. 

देशातील जवळपास सर्व करताना या खटल्याचा कायदा म्हणून स्वीकार केला व यानंतर ते रेखाटले देशांमध्ये उभे राहिले या सर्व घटनांमध्ये पाटील विरुद्ध जोशी हा खटला नोंदवत नेहमीच बहुजनांच्या बाजूने निकाल दिला गेला.

असे शेकडो खटले ब्राह्मण लोकांनी बहुजनांच्या विरुद्ध भरले. 

सन 1900 ते 1904 यादरम्यान झालेल्या अशा सर्व घटनांचा तपशील शास्त्री नारो बालाजी महादु पाटील पानसरे, राहणार ओतुर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी “ब्राह्मणांचा हक्क काही नाही कशाबद्दल हायकोर्टाचे झालेले ठराव” या एका पुस्तिकेमध्ये थेट प्रकाशित करून टाकला. या पुस्तकालाही पुण्यात कोणी प्रकाशक लाभला नाही म्हणून हे पुस्तक गायकवाडांच्या बडोदे संस्थान कडून प्रकाशित करण्यात आले.

आणि आणि त्यानंतर महात्मा फुले यांनी ब्राह्मण नसताना सत्यशोधक पद्धतीने विवाह कसे करावे त्याच्या संरचना आखून दिल्या व मंगलाष्टके तयार केली.

  •  भिडू वैभव वाळुंज

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.