राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसेला पुण्यात बळ मिळेल का?
महापालिका निवडणुकींच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाशिक, पुण्यातील दौरे वाढले आहेत. गेल्या महिनाभरात राज ठाकरे यांनी ४ वेळा पुण्याचा दौरा केला आहे. यात पदाधिकारी, माजी नगसेवक, शाखा प्रमुख यांच्याशी ‘वन टू वन’ चर्चा केल्याचे पाहायला मिळाले. शहरातील सद्यस्थिती जाऊन घेऊन राज ठाकरे पुढील रणनीती ठरवतील असे बोलले जात आहे.
पुढच्या वर्षी राज्यातील मुंबई, पुणे, नाशिकसह दहा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मनसेला इतर शहराच्या तुलनेत नाशिक, पुणे महापालिकेने चांगली साथ दिली आहे. त्यामुळेच या शहरावर मनसेकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे.
मात्र याचबरोबर निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे दौरे करून पक्षाला फायदा होईल का? असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पुण्यातील मनसेची वाटचाल, निवडणुकांमध्ये यश- अपयश कस मिळत गेले त्याचा बोल भिडूने घेतलेला हा आढावा.
पुण्यातील मनसेचे संघटन
पुण्यातील मनसेची ताकत पाहायला गेली कोथरूड, कसबा पेठ, कात्रज, हडपसर आणि काही प्रमाणात सिंहगड रस्त्यावर मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र पक्षाला उपनगर भागामध्ये अजूनही खूप काम करण्याची गरज असल्याचे दिसून येते.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन मार्च महिन्यात खांदेपालट केली आहे. शहराची कमान वसंत मोरे यांच्याकडे दिली आहे. किशोर शिंदे, रुपाली ठोंबरे, अजय शिंदे, हे पुणे शहरातील मनसेचे प्रमुख शिलेदार मानले जातात. मात्र पक्षाच्या सुवर्णकाळात सोबत असणारे अनेक जण एक तर मागे पडले आहेत. अथवा पक्ष सोडून गेले आहे.
त्यामुळे पक्ष स्थापने पासून असणारे नेतेचे पुढे दिसतात. नवीन चेहऱ्याला संधी मिळावी याबाबत सुद्धा बोलण्यात येते.
पुण्यातील परिस्थिती पाहता प्रत्येक मतदारसंघात ठराविक मतदार आहे. जो अजूनही मनसे सोबत जोडला असल्याचे पाहायला मिळते. त्याच्या पर्यंत मनसे पोहचल्यास नक्कीच पक्षाला फायदा होईल.
पुण्यात मनसेची ताकत
मनसेच्या स्थापने नंतर पुण्याला विधनासभा आणि महापालिका निवडणुकीत साथ दिल्याचे पाहायला मिळते. २०१२ च्या पुणे महापालिका निवडणुकीत तब्बल नगरसेवक २९ निवडून आले होते. शहरातील २ नंबरचा पक्ष ठरला होता. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला ९४ हजार मते पडली होती. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला मिळणाऱ्या मतांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की,
पुढील महापालिका निवडणूक दोन प्रभाग पद्धती नुसार होणार आहे. याचा निश्चित फायदा मनसेला होईल. त्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. पुन्हा एकदा पुण्याच्या महापालिकेत मनसेचे २५ पेक्षा अधिक नगरसेवक पाहायला मिळतील.
पक्ष संघटनेतील गटबाजी, नगरसेवकांची कार्यपद्धती याचा फटका मनसेला झाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतायत. पुणे पालिकेत सध्याची पक्षीय बलाबल पहिले तर मनसेचा शेवटून दुसऱ्या नंबरवर आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत केवळ २ जागेवर मनसेचे उमेदवार निवडणून आले होते.
२०१४ मध्ये राज्यात परिवर्तन होऊन भाजप-सेनेच सरकार सत्तेत आली. त्यामुळे पुण्यात भाजपची काही प्रमाणात ताकत वाढत गेली. भाजपकडून पुणे महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यातच मनसेत गटबाजी पडली होती. तिकीट वाटपात सुद्धा गोंधळ दिसून आला. यामुळे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत मनसेला केवळ २ उमेदवार निवडून आले होते.
यापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या आधी असं लक्ष दिल होत का
मुंबईत बसून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष संघटन चालवत असल्याची टीका त्यांच्यावर नेहमी होत असते. सध्या राज ठाकरे यांचे दौरे पुढच्या वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्या समोर ठेवून होत आहेत. मागील महापालिका निवडणुकीत अशा प्रकारे राज ठाकरे यांनी लक्ष दिल होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत पुणे सकाळचे पत्रकार ब्रिजमोहन पाटील म्हणाले की,
पुण्यात राज ठाकरे हे सहा महिन्यात, वर्षात एखाद्या दौरा करत होते. आणि ते सुद्धा निवडक पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन निघून जात. मात्र मागच्या महिना भरातील दौऱ्यांचा विचार केला तर लक्षात येत की, मैदानावर काय परिस्थिती आहे हे जाऊन घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे करून घेत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच शाखा प्रमुख यांच्याशी ‘वन टू वन’ चर्चा जाणून घेतले आहे. असे यापूर्वी कधी घडले नसल्याचे त्यांनी सांगितले.
या दौऱ्यांचा किती फायदा होईल
निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्या बाबत साधक बाधक चर्चा होत आहेत. यामुळे मनसेच्या किती जागा वाढतील असे प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षातील गटबाजी कमी होऊन त्याचा कितपत फायदा होईल अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
याबाबत पत्रकार पांडुरंग सांडभोर यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की, पुढच्या निवडणुकीत मनसेचा जागा वाढतील हा आताच्या घडीला दुय्यम मुद्दा आहे. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यामुळे पक्षात उत्साह निर्माण झाला आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष वाढीसाठी मरगळ झटकून काम करतील.
नेते एॅटिव्ह झाले की पक्षातील इतर घटकातील कामाचा उत्साह वाढतो. त्यामुळे पक्ष, संघटन वाढीसाठी मदत होईल. असा फायदा राज ठाकरे यांच्या दौऱ्यातून पुणे मनसेला होईल.
हे ही वाच भिडू
- शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरे एकत्र पक्ष स्थापन करणार होते..
- एका पत्रकारामुळे मनसे आणि भाजपची संभाव्य युती फसली होती.
- पुणे पॅटर्न ज्यात कॉंग्रेसला बाजूला ठेवून भाजप, सेना राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली होती
- राज ठाकरेंपासून MF हुसेन पर्यंत अनेकांना घडवणाऱ्या जे जे स्कुलला मोठे करणारे हात मराठी आहेत