मियाँदादने चेतन शर्माला ठोकलेल्या सिक्सरचा बदला ११ वर्षांनी पूर्ण झाला..

क्रिकेट हा खेळ जितका जंटलमन गेम म्हणून खेळला जातो तो तितका कधीच नसतो. त्यातही भारत पाकिस्तान सामना असले तर विचारूच नका कि कसला जंटलमन गेम. भारत पाकिस्तान हा सामना खेळाडू देशाच्या कट्टर चाहत्यांसाठी जीवाची बाजी लावून खेळतात. कारण हे दोन देश एकमेकांचे कडवट प्रतिस्पर्धी आहेत.

दोन्ही संघ एकमेकांना हरवण्याचा प्रयत्नात असतात पण भारत हा कायम पाकिस्तानला वरचढ ठरत आला. पण बदला प्रकरण हे काही थांबलं नाही. त्यासंबंधीचा आजचा किस्सा. ज्यावेळी पाकिस्तानने भारताला हरवलं होतं आणि भारताच्या एका खेळाडूने सेम तसंच उत्तर देऊन पाकिस्तानचं तोंड बंद केलं होतं. 

जावेद मियांदाद हा पाकिस्तानचा जबरदस्त खेळाडू होता. त्याने भारताला दिलेली सिक्सररुपी जखम कडवट क्रिकेट फॅन कधीच विसरू शकत नाही. वर्षानुवर्षे जावेद मियाँदादने मारलेला तो शेवटच्या बॉलवरचा सिक्स भारतीयांना वाईट आठवण म्हणून आठवत राहतो. ते साल होतं १९८६. चेतन शर्माला त्याच्या ११ वर्षाच्या दीर्घ क्रिकेटसाठी कधीच ओळखलं गेलं नाही त्याला प्रसिद्धी मिळाली ती मियाँदादने मारलेल्या सिक्सरमुळे.

तो सुपरबॉल त्याने फेकला आणि जावेद मियाँदादने तो चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये टोलवला होता. तो सिक्स मारल्याबरोबर सगळी पाकिस्तानी टीम मैदानात जल्लोष साजरा करत होते. भारताचा संघ नुसता टकमक करत चेतन शर्माकडे बघत होता.

शारजहांमध्ये हा सामना खेळवला गेला होता, २४५ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज होती. चेतन शर्माने लो फुलटॉस बॉल फेकला तो जावेदने थेट लोकांमध्ये पोहचवला. जानी दुष्मन असलेल्या पाकिस्तानकडून हा घाव भारतीयांच्या वर्मावर बसला होता. हि जखम तोवर सलत राहिली जोवर संघात राजेश चौहान आलेला नव्हता.

राजेश चौहान हा तो माणूस होता ज्याने मियाँदादच्या त्या आठवणीतल्या सिक्सरचा बदला घेतला होता. त्या सिक्सरने पाकिस्तानची तोंडं बंद केली होती.

शेवटच्या बॉलवर तर नाही पण शेवटच्या ओव्हरमध्ये राजेश चौहानने षटकार मारून बहुअंशी त्या चेतन शर्माला पडलेल्या सिक्सरची भरपाई केली होती.

३० सप्टेंबर १९९७ मध्ये पाकिस्तानच्या २६५ धावांचा पाठलाग भारतीय संघ करत होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन, विनोद कांबळी, अजय जडेजा असे सगळे भारताचे नामी धुरंधर आउट झाले होते. ४ चेंडूत ६ धावांची गरज होती. त्यावेळी राजेश चौहान बॅटिंग करत होता. ड्रेसिंग रूममध्ये तो विनोद कांबळीला म्हणाला होता,

मैं बोलूं ना, तो मै करके दिखायगा भिडू !

समोर बॉलर होता मास्टर स्पिनर सकलेन मुश्ताक. मॅच एकदम रोमांचक स्थितीत आलेली होती. पण राजेश चौहान अशा कुठल्याही प्रकारच्या मूडमध्ये नव्हता. मैच शेवटच्या बॉलपर्यंत नेण्याची तसदीही त्याने घेतली नाही. सकलेन मुश्ताकच्या तिसऱ्या बॉलवर षटकार लगावत राजेश चौहानने भारताला मॅच जिंकून दिली.

११ वर्षांनंतर भारताने बदला पूर्ण केला होता. राजेश चौहानने सिक्स मारल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जे पाकिस्तानकडून हारण्याचं जे वातावरण निर्माण झालं होतं ते राजेश चौहानच्या एका सिक्सने पूर्णपणे बदलवलं. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली हे अक्षरशः ड्रेसिंगरुममध्ये नाचत होते. इतका महत्वाचा तो सिक्स होता. 

भारतासाठी ११ टेस्ट मॅच आणि ३५ वनडे सामने राजेश चौहान खेळला. भारताला आजवर मिळालेल्या उत्तम ऑलराउंडर खेळाडूंपैकी राजेश चौहान एक होता. भलेही त्याला भारताकडून दीर्घकाळ खेळायचं भाग्य मिळालं नसेल पण राजेश चौहान हा फेमस झाला तो पाकिस्तानचा बदला पूर्ण केला या घटनेसाठी.

राजेश चौहानच्या बाबतीत अजून एक गोष्ट खास आहे ती म्हणजे तो ज्या २१ टेस्ट सामन्यांमध्ये खेळला त्यातला एकही सामना भारत हरला नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.