राजीव गांधींच्या हत्येमधील आरोपीने संजय दत्तच्या अडचणी वाढवल्या आहेत.
अभिनेता संजय दत्त याला जेल का झाली होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटच्या केस मध्ये संजय दत्त नाव आले होते. त्यात टाडा अंतर्गत संजय दत्तवर खटला भरण्यात आला होता. यात अबू सालेम कडून एके-५६ रायफल विकत घेतल्याचा आरोप संजय दत्तवर होता.
बर ते झालं. मग राजीव गांधी हत्येत सहभागी असल्याचा आरोप असणाऱ्या पेरारीवलन संजय दत्तशी काय संबंध?सगळ्यात महत्वाच म्हणजे हा पेरारीवलन कोण ?
राजीव गांधी यांच्यावरील आत्मघाती हल्ल्यात वापरलेल्या जॅकेटसाठी ९ वोल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप पेरारीवलन याच्यावर आहे. पेरारीवलन अजूनही जेलमध्येच आहे.
रिपोर्ट नुसार राजीव गांधी हत्येत दोषी असलेला पेरारीवलन याने माहितीचा अधिकार अंतर्गत काही माहिती गोळा केली आहे. त्यामुळे संजय दत्त पुन्हा एकदा संकटात येताना दिसत आहे. संजय दत्त आता आपली शिक्षा पूर्ण करून जेल मधून बाहेर आला आहे. पण शिक्षेच्या काळात अनेक वेळा पॅरोल वर बाहेर आला होता. पण सध्या पेरारीवलनला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार जेल प्रशासनाने संजय दत्तला पॅरोल आणि सुट्टी देताना अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केले आहे.
केस चालू असतांनाही बऱ्याचदा संजय दत्त जमानतीवर बाहेर असायचा. मोठ्या सुनावणीनंतर टाडा न्यायलयाने संजय दत्तला बॉम्बस्फोटच्या आरोपातून सोडलेले पण हत्यार बागळल्याच्या आरोपात सहा वर्षांचा कठोर कारावास सुनावला. पुढे चालून २०१३ मध्ये न्यायलयाने हि शिक्षा कमी करून पाच वर्षांची केली. १६ मे २०१३ रोजी संजय दत्तने आत्मसमर्पण केलेले आणि तीन वर्षांनी २५ मे २०१६ ला तो जेल मधून सुटला.
संजय दत्त जेल मधून सुटल्याच्या एक महिन्यानंतर पेरारीवलन याने माहितचा अधिकार अंतर्गत पाच प्रश्नांचे उत्तर येरवडा जेल प्रशासनाला मागितले.
पेरारीवलन त्या सगळ्या मिटींग्सचा हिशोब, लेखा-जोखा आणि आधिकारिक पत्र मागितले जे संजय दत्तच्या जेल मधून सुटण्याशी जोडलेले होते. पेरारीवलनने हे हि विचारले की, संविधानाच्या कोणत्या कलमे अंतर्गत संजय दत्तला जेल मधून सोडण्यात आले ? पेरारीवलनने राज्य आणि केंद्र यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराचे सुद्धा डिटेल्स मागवले आणि ते आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमाने सगळे रेकॉर्ड्स दाखवण्यास सांगितले. पेरारीवलनला तीन वर्षांनी म्हणजे २० एप्रिल २०१९ ला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
एका वृत्तपत्रानुसार संजय दत्तला मिळालेल्या सुट्टीमध्ये अनेक वेळा नियमांचे पालन गेले नव्हते. पेरारीवलनने आपल्याला मिळालेली सगळी माहिती वृत्तपत्राला दिली आहे.
टाडा सारख्या गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्याला सुट्टी देताना जेल प्रशासन किंवा राज्य सरकार हे केंद्राच्या अनुमति शिवाय निर्णय घेऊ शकत नाहीत. पेरारीवलनला येरवडा जेल प्रशासन कडून मिळालेल्या माहिती नुसार केंद्र सरकार कडून कुठल्याही प्रकारच कसलच आधिकारिक पत्र मिळाल नव्हत. येरवडा जेलच्या प्रथम अपिलीय अधिकारी यांनी पेरारीवलनला दिलेल्या माहितीत हे स्पष्ट आहे की, संजय दत्तला सुट्टी देण्याबाबतचे केंद्र सरकारचे कुठलेही कागदपत्र जेल प्रशासनाकडे उपलब्ध नाही आहेत. प्रथम अपिलीय अधिकारी यांनी हे हि सांगितले की, संजय दत्तला जेलमधून सोडण्यापूर्वी केंद्राकडून कसलेही मत घेतले नव्हते.
पेरारीवलनने असे का केले ?
पेरारीवलन याच्यावर दोन ९ वोल्टच्या बॅटरी पुरवण्याचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला फाशीची शिक्षा झाली होती पण, १८ फेब्रुवारी २०१४ ला सुप्रीम कोर्टाने ती जन्मठेपेत बदलून दिली. १९ फेब्रुवारी २०१४ रोजी तामिळनाडू सरकारने पेरारीवलन आणि अन्य अभियुक्तींना सोडण्याचा निर्णय घेतला. तर पेरारीवलनला असे वाटत की,
“सुप्रीम कोर्टाकडून कडून दिलासा आणि राज्य सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला असून सुद्धा आपण जेलमध्येच आहे आणि संजय दत्तला नियम धाब्यावर बसवून सुट्टी दिली गेली. “
संजय दत्त जेव्हा शिक्षा भोगत होता तेव्हा अधिकांश वेळ तो जेलच्या बाहेर होता तेव्हा जेलमधील इतर कैदींच्या नातेवाईकांनी याबाबत याचिका दाखल केली होती पण त्यावर कुठलीही सुनावणी झाली नाही.
हे ही वाच भिडू.
- तो किस्सा ज्यामुळे संजय दत्त निवडणूक लढवायला घाबरतो.
- पुण्यात येऊन जनरल अरुण वैद्य यांची हत्या करणारे क्रूर अतिरेकी जिंदा आणि सुखा
- वाजपेयी म्हणाले होते, मी जिवंत आहे ते फक्त राजीव गांधी यांच्या उपकारामुळे.
- राजीव गांधी म्हणाले होते, मी कुत्र्यांकडे लक्ष देत नाही.