आंदोलनात बळी गेलेल्या राजीव गोस्वामीची गोष्ट !
राज्यात मराठा आंदोलनाने ठोक भूमिका घेतली. अस्वस्थ असणं हे तरुणाईच लक्षणच असत. निर्णयात विलंब लावणं हे राज्यकर्त्यांच लक्षण असतं. अशा आंदोलनात एखाद्याचा जीव जातो. या तरुणांच्या वाट्याला काय येत हि सांगणारी गोष्ट.
शेवटी आपण माणूस असतो. माणसं माणसांसाठी लढतात. राजकारण्यांचं राजकारण होतं. राजीव गोस्वामी मंडल आयोगाच्या विरोधासाठी लढला. त्यानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मार्गावर कित्येक तरुण गेले. कालांतराने मंडल आयोग राजकारणाचा विषय झाला. तसा तो पहिल्यापासूनच होता. पण या सर्व गोष्टीत राजीव गोस्वामी कुठे गेला ?
राजीव गोस्वामी कोण ?
तर या विद्यार्थांने भारतातल्या पहिल्या आरक्षणविरोधी आंदोलना जन्म दिला अस म्हणलं तर चुकिचं ठरणार नाही.
पंतप्रधान व्हि.पी. सिंग यांनी वटहुकम काढत मंडल आयोग लागू केला. मागास प्रवर्गाला २७ टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या. पंतप्रधानांच्या या निर्णयाने विरोधी सूर उमटू लागला. उपपंतप्रधान देवीलाल यांनी राजीनामा दिला.
पण या आंदोलनाने तितक मोठ्ठ स्वरूप घेतलं नव्हत जोपर्यन्त राजीव गोस्वामी ने तो निर्णय घेतला नाही.
राजीव गोस्वामी या तरुणांने स्वत:ला पेटवून दिलं. आत्मदहन करण्याच्या या प्रयत्नातून त्याला वाचवण्यात आलं. यात तो ८० टक्यांपर्यन्त भाजला होता अस सांगितलं जातं.
त्यानंतर देशभर आरक्षण विरोधी आंदोलनात विद्यार्थी सहभागी होवू लागले. विद्यापीठातून मंडल आयोगाचे, व्हि. पी. सिंगांचे पुतळे जाळण्यात येवू लागले.
आणि त्याचसोबत स्वत:ला देखील दहन करण्याची एक नवी लाट विरोध करणाऱ्यामध्ये निर्माण झाली.
अलाहाबाद येथील मिनाक्षी तिच्या आई बरोबर बोलत होती. ती म्हणाली, मला देखील या आरक्षणाच्या विरोधात आत्मदहन करु वाटतं. आई तिला म्हणाली, विरोध करायचा आहे तर व्हि.पी. सिंग यांना करा. तुमच्या भूमिका मांडा. पण त्या मुलीने निर्णय घेतला होता. मुलीने आत्मदहन करुन स्वत:ला संपवल.
आत्मदहन करणाऱ्यांमध्ये अनेक नाव होती काहीचे प्रयत्न यशस्वी झाले तर काही वाचले. पण या दरम्यान राजीव गोस्वामीचं काय झालं.
राजीव गोस्वामी यांच्यासाठी बाहेर फंड गोळा करण्यात आला. त्याला उपचारासाठी पैसै देण्यासाठी मोहिम आखण्यात आली.
तिकडे राजीव बरा होवून दिल्ली विद्यापीठाचा प्रतिनिधी झाला. मंडल आयोगाला विरोध कायम होता. आत्ता त्याच्या लक्षात आलं मंडल आयोगाच्या बाबतीत कॉंग्रेस आणि भाजप सरकारची वरच्या पातळ्यांवर एकच भूमिका आहे.
अचानक तो या सगळ्यातून बाहेर गेला कोण म्हणालं तो आपल्या मेहूण्याच्या कंपनीत नोकरीला गेला तर कोण म्हणालं त्याने स्वत:चा बिझनेस चालू केला.
२४ फेब्रुवारी २००४. पुन्हा त्याचं नाव बातम्यांमध्ये आलं. कारण तो गेला होता. आत्मदहन करताना त्याच्या लिव्हरला आणि पोटाला मार लागल्याचं सांगितल जातं. त्याचा त्रास त्याला अधून मधून होत होता. अशातच त्याचा अंत झाला.
त्याने आंदोलनाला दिशा दिली. लाथ मारू तिथे पाणी काढू म्हणणाऱ्या तरुणाईनं तो मार्ग स्वीकारला. कित्येक तरुण त्यामध्ये बरबाद झाले. त्याच्या उपचारासाठी जमा केलेली रक्कम देखील त्याला मिळाली नाही. आंदोलन सुरू करणारा राजीव गोस्वामी असाच एकाकी संपला.