फक्त राम जेठमलानी यांच्याशी गप्पा मारल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची गेली ?
निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त आश्चर्य वाटणारी बातमी होती.
ते मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा चुकून त्यांचे नाव निवडले गेले असं लोक म्हणायचे.
इंदिरा गांधीना छत्रपती घराण्यातील अभयसिंहराजे भोसलेंना मुख्यमंत्री करायचं होतं पण नावात चूक झाली आणि बाबासाहेब मुख्यमंत्री झाले असं लोक छातीठोकपणे सांगायचे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अजूनही त्यांची ओळख कित्येकांना प्रसिध्द व्याख्याते शिवाजीराव भोसले यांचे बंधू हीच आहे.
अंतुलेंच्या जागी मराठा मुख्यमंत्री हवा अशी मागणी होत होती आणि म्हणून इंदिरा गांधींनी बाबासाहेब भोसले यांची निवड केली असं सांगितलं जात होतं. तस बाबासाहेब हे स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासूनचे काँग्रेसचे नेते, मंत्रीपदावर देखील राहिलेले मात्र वरच्या लेव्हलला काय राजकारण चालतं याचा त्यांना काहीच अंदाज नव्हता. विशेषतः दिल्ली त्यांच्यासाठी अनोळखी होती.
त्यांना मुख्यमंत्री पद कसं मिळालं याबद्दल खुद्द बाबासाहेब सांगतात की,
‘काँग्रेसला बॅ. अंतुल्यांमुळे झालेल्या बदनामीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील अब्रू राखण्यासाठी चांगल्या माणसाची गरज होती. मंत्री म्हणून मी केलेला सचोटीचा कारभार दिल्लीच्या दरबारी रुजू होताच. माझ्या नावाचा विचार चालू आहे. याची मला कल्पना होती, पण मी दिल्लीला गेलो नाही. कुणाला कपभर चहाही पाजला नाही. अंतुलेंच्या हातसफाईमुळे इंदिराजी अडचणीत आल्या होत्या.
अंतुल्यांच्या अगदी विरुद्ध प्रतिमा असलेला, पण आपल्या आज्ञेत राहणारा माणूस इंदिराजींना हवा होता. अंतुल्यांचाही माझ्या नावाला विरोध नव्हता. मला मुख्यमंत्रीपद कुशल नेतृत्वाबद्दल किंवा संघटनात्मक कार्याबद्दल मिळालेलं नाही, याची जाणीव होती. १७ जानेवारी १९८२ ला दुपारी साडेतीन वाजता खुद्द इंदिराजींनी फोन करून मला मुख्यमंत्री करीत असल्याचे सांगितले.’
२१ जानेवारी १९८२ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल ओ. पी. मेहरा यांनी बाबासाहेबांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
बाबासाहेब भोसले यांचा स्वभाव मिश्किल होता. अनेकदा ते स्वतःवर ही विनोद करत असत. त्यांची अनेक विधाने कधी कधी पदाला शोभत नाहीत असं लोकांचं मत असायचं. विशेषतः त्याकाळचा मीडिया बाबासाहेब भोसले यांना गंभीरपणे घेत नव्हता उलट त्यांना वेळ मिळेल तसे टीकेने घायाळ करण्यात समाधान मानायचा.
अशातच बॅ. अंतुल्यांशी बाबासाहेबांचा खटका उडणे अटळ, अपरिहार्य होते.
बॅ. अंतुल्यांना त्यांच्या रिमोट कंट्रोलने चालणारा मुख्यमंत्री हवा होता, पण इतरांप्रमाणेच अंतुलेही बाबासाहेबांना ओळखू शकले नव्हते. बाबासाहेबांना बॅ. अंतुल्यांना आवरायचे आणि वसंतदादांच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर लॉबीला सावरायचे अशा दोन्ही बाजू सांभाळाव्या लागत होत्या.
सुरवातीला तरी बाबासाहेब भोसले यात यशस्वी ठरले. मात्र ही तारेवरची कसरत त्यांना फार काळ झेपली नाही. त्यांच्या विरुद्धच्या तक्रारी दिल्ली पर्यंत जाऊ लागल्या. अशातच एकदा मंत्रिमंडळ विस्तारावरून त्यांचं आणि इतर काही नेत्यांचं वाजलं.
त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या नेत्यांनी बाबासाहेबांच्या विरुद्ध बंड पुकारलं. दिल्लीपर्यंत त्यांच्या तक्रारी जाऊ लागल्या. पण इंदिरा गांधी यांचा वरदहस्त असल्यामुळे हे बंड फार काळ टिकलं नाही. बाबासाहेब भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये बंडोबा थंडोबा झाले अशी टिप्पणी केली.
पुन्हा त्यांच्या या वाक्यावरून वादंग निर्माण झाले. कधी नव्हे ते अंतुले समर्थक आणि वसंतदादा पाटील समर्थक नेते एकत्र आले. आपले वाद नंतर आधी काहीही करून बाबासाहेब भोसलेंना पदावरून काढले पाहिजे यावर सगळ्यांचं एक मत झालं.
बाबासाहेब भोसले यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्याच नेत्यांनी विधानसभेत त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. आमदारांनी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. हे सगळं असूनही इंदिरा गांधी यांचा पाठींबा असल्यामुळे मुख्यमंत्री भोसले यांचा आत्मविश्वास कमी होत नव्हता. पोलिसांचे झालेले बंड त्यांनी एका दिवसात मोडून काढले होते. केंद्राच्या पाठिंब्यावर राज्य सहज चालवता येईल असं त्यांना वाटत होतं.
बाबासाहेब भोसले सध्या राजकारणात सक्रिय झाले असले तरी ते मूळचे विख्यात वकील. कायदेपंडित म्हणून त्यांनी काळ गाजवला होता. त्यांचा एक कार्यक्रम देखील दूरदर्शनवर यायचा. त्यांच्या वकिलीच्या काळातले जवळचे मित्र म्हणजे राम जेठमलानी.
राम जेठमलानी हे देखील देशभरात गाजलेले वकील होते. अनेक हाय प्रोफाइल केस त्यांनी चुटकी सरशी सोडवल्या होत्या. देशातील सर्वात महागडे वकील म्हणून देखील त्यांना ओळखलं जायच.
बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले तेव्हा जेठमलानी परदेश दौर्यावर होते. पुढे ते परदेश दौऱ्यावरून परतले तेव्हा आपला मित्र मुख्यमंत्री बनला ही बातमी ऐकून त्यांना धक्का तर बसलाच पण प्रचंड आनंद झाला.
त्यांनी बाबासाहेबांना मी तुम्हाला भेटायला येतो असं सांगून फोन केला. मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या दिवशी दिल्लीला जायचं होतं त्यामुळे त्यांनी त्याच दिवशी एका हॉटेलमध्ये भेटायला जायचं ठरवलं.
खूप रात्री उशिरा त्यांची भेट झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खूपवेळ गप्पा झाल्या. दुसर्या दिवशी बाबासाहेब दिल्लीला रवाना झाले. वेगवेगळ्या केंद्रीय मंत्र्यांना भेटून त्यांनी राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले. सगळ्यात शेवटी ते पक्षाच्या सर्वेसर्वा आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेण्यासाठी गेले.
इंदिरा गांधींनी त्यांना तातडीने आत बोलावले आणि फक्त एकच प्रश्न विचारला.
कल रात को जेठमलानी क्या बोल रहे थे?
अनपेक्षितपणे समोर आलेल्या या प्रश्नाने बाबासाहेब हादरून गेले. इंदिरा गांधी त्यांच्याशी अत्यंत तुटकपणे बोलल्या. जेठमलानी यांच्याशी इंदिरा गांधींचा छत्तीसचा आकडा होता. त्याचा राग त्यांनी बाबासाहेबांवर काढला आणि बाबासाहेब त्यांचा निरोप घेऊन निघाले तेव्हा इंदिरा गांधी यांनी फार काही न बोलता ‘भोसलेजी आप मुंबई जाओ और मुख्यमंत्रीपद का इस्तीफा दे दो’ असा स्पष्ट आदेश दिला.
बाबासाहेबांनी अत्यंत विमनस्क अवस्थेत दिल्लीहून मुंबई गाठली आणि मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. जितके अनपेक्षितपणे बाबासाहेबांना मुख्यमंत्रीपद मिळाले, तितक्याच दुर्दैवीरित्या त्यांना राज्यातील हे सर्वात मोठे पद सोडावे लागले.
संदर्भ- सुरेंद्र हसमनीस मार्मिक
हे ही वाचा भिडू.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकेकाळी दूरदर्शनच्या टीव्ही शो मध्ये अँकरिंग करायचे..
- मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं, दिल्लीत पैसे मागण्याची नव्हे, देण्याची पद्धत आहे
- RBI च्या गव्हर्नरांना न जुमानता जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष खंबीर राहिला अन् सांगली जिल्हा घडला