भाजप तालिबानशी तुलना करतंय पण मोपल्यांचं बंड हे RSS च्या निर्माणाचं कारण आहे.
तालिबान आणि अफगाणिस्तान हा विषय आठवडा झाला सगळ्यांच्याच तोंडात आहे. मग ते भारताच्या कोपऱ्यापासून ते जगाच्या पाठीवर सगळ्यांच्याच. पण भारतात यावरून कोण काय बोलेल हे मात्र सांगता यायचं नाही. काही धर्मांध लोक या तालिबान्यांच्या बाजूने बोलत आहेत तर काही विरोधात. विरोधात बोलणं हे केव्हाही चांगलं पण याला धार्मिक रंग देणं अतिशय चुकीचं आहे.
तर हा विषय सांगण्यास कारण कि,
भारतात तालिबानच्या मुद्द्यावर जोरदार घमासान सुरु असताना काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी या तालिबान्यांची तुलना ब्रिटिश राजवटीत झालेल्या मोपल्यांच्या बंडाशी केली. ते म्हंटले कि,
केरळमधील १९२१ चा मोपला बंड हा तालिबानी विचारसरणीशी मिळत जुळता आहे. हे बंड तालिबानी मानसिकतेचेच प्रतिबिंब होते. राष्ट्रीय नेतृत्वाला (मोदींना) योग्य इतिहासाची जाणीव आहे आणि म्हणून ते अशा तालिबानी किंवा फुटीरतावादी शक्तींची ताकद वाढू न देता देशातील लोकांमध्ये फूट पडू देणार नाहीत, मग ते काश्मीर असो किंवा केरळ.
राम माधवांनी जसा का मोपल्यांच्या बंडाचा विषय काढला तेव्हा, भिडू म्हंटल आता शोधायला लागतंय, हे कसलं बंड होतं ते.
तर आठव्या शतकात काही अरब व्यापाऱ्यांनी केरळच्या मलबार भागात आपल्या वखारी काढल्या. व्यापार करता करता त्यांनी मलबार मध्ये इस्लामचा प्रसार करायला सुरुवात केली. या प्रसारामुळे त्या भागात मुस्लिस वस्ती वाढू लागल्या. त्या मुस्लिस शेतकऱ्यांना मोपला असं नाव पडलं.
अशातच एकोणिसाव्या शतकात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या.
ब्रिटिशांच्या कंपनीच्या राज्यात शेतकरी विरुद्ध सावकार-जमीनदार वाद सुरू झाले. सावकार जमीनदार शक्यतो हिंदू असत. तर सामान्य शेतकरी मोपला होता. अरबस्तानातील कडव्या पुनरुत्थानवादी, सकल इस्लामवादी वहाबी विचारांचा पगडा मोपला शेतकऱ्यांवर वाढू लागला. आणि आर्थिक धार्मिक संघर्षातून मुसलमान आणि मुसलमानेतर असा जातीय संघर्षही उद्भवला.
मोपला मुसलमान हे हिंदू जमीनदार त्यांना देत असलेल्या अल्प मजुरीमुळे व त्यांच्या वेगळ्या धार्मिक परंपरामुळे त्यांच्यावर नाराज होते. परिणामी मोपल्यांमध्ये पुनरुत्थानवादी कडव्या वहाबी विचारांची पकड अधिकच घट्ट झाली.
वहाबी उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी १९१९ साली मोठ्या प्रमाणावर हिंसा करून एका तालुक्यात वहाबी अंमल स्थापण्याचाही मोपल्यांकडून प्रयत्न झाला. तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला.
त्यात पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानचा पराभव झाला होता. त्यावेळी इंग्रजांनी त्या देशाचा राजाला जो जगभरातील मुसलमानांचा खलिफा होता, त्याला सत्तेतून खाली खेचले होते. इंग्रजांच्या या कारवाईमुळे जगभरातील सर्वच मुसलमान इंग्रजांवर नाराज झाले होते. यामुळे खिलाफत चळवळ सुरु झाली होती.
वर्षभराने महात्मा गांधीनी खिलाफत आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. परंतु काँग्रेसवादी खिलाफत नेते कडवे धर्मगुरू होते. त्यांनी साऱ्या देशभर धर्मयुद्धाचे आवाहन केले.
महात्मा गांधींनी जरी अहिंसेचा आग्रह धरला असला आणि खिलाफत आंदोलनाचे नेतृत्व धर्मगुरूंनी गांधीना दिले असले, तरी या मुल्लामौलवींचा अहिंसेवर काडीइतकाही विश्वास नव्हता व ते तसे उघडपणे बोलूनही दाखवीत. खिलाफत आंदोलनाचे काळी सुशिक्षित मवाळ मुस्लिम नेते मागे पडले आणि मुल्लामौलवींना अफाट लोकप्रियता मिळाली.
त्यातून मलबारमध्ये वहाबी मौलवींना मोकळे रान मिळाले.
त्यांच्या धर्मयुद्धाच्या भडक प्रचाराला धार आली आणि १९१९ साली वहाबी अंमल स्थापण्याचा प्रयत्न झाला. तसा प्रयत्न संबंध मलबारभर करावा असे स्थानिक धर्मगुरूंच्या मनात आले. मोपल्यांनी १९२१ च्या ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर खून, लुटालूट व जबरदस्तीने स्थानिक हिंदूंना बाटविण्याचे प्रकार केले. वरवर पाहता ब्रिटीश सरकारविरुद्ध ही बंडाळी असली, तरी तिला अखेर धार्मिक संघर्षाचे रूप आले आणि त्या संघर्षात हिंदूंची फार हानी झाली.
ही बंडाळी सरकारने अखेर लष्कराकरवी मोडून काढली. मोपल्यांनी जेवढे प्रकार केले त्याच्या दसपटीने लष्कराने केले. या बंडाळीमुळे गांधीजींनी पुकारलेल्या असहकारितेच्या आंदोलनाला मात्र खीळ बसली. मोपल्यांचे हिंसाचार आणि अत्याचार यांचा खिलाफत आंदोलनाशी काही संबंध नाही असे जरी काँग्रेस व खिलाफत नेत्यांनी जाहीर केले, तरी या गोष्टीचा कडक निषेध करण्याचे धैर्य काँग्रेस नेत्यांना झाले नाही.
खिलाफत नेत्यांनी तर या हिंसाचारी कृत्यांचे अप्रत्यक्षतः समर्थनच केले. या धोरणाची देशभर तीव्र प्रतिक्रया उमटली. मोपल्यांचे इंग्रजांशी स्वातंत्र्ययुद्ध चालू असता स्थानिक हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ इंग्रजी सैन्याला पाचारण केले. पण त्यामुळे मोपल्यांना चीड आली. काँग्रेस-खिलाफत नेते मौलाना हसरत मोहानी यांच्या या वक्तव्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखे झाले.
मुल्लामौलवींच्या तब्लीग आणि तंजीम (धर्मप्रसार आणि संघटना) या कडव्या धोरणाची प्रतिक्रिया म्हणून संघटन व शुद्धी आंदोलने सुरू झाली आणि त्या दशकात देशात अभूतपूर्व अशा जातीय दंगलीचे वातावरण उत्पन्न झाले. पुढं ज्या हिंदूंचं जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आले होते त्यांच्यासाठी आर्य समाजाने शुद्धी चळवळ सुरु केली. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बीज रोवण्यात आली. म्हणजे रास्वसं हे या मोपल्यांच्या बंडाचं फलित आहे.
हे ही वाच भिडू
- संघ सोडून गेलेल्या माणसाला डॉ. हेडगेवारांनी थेट सरसंघचालक बनवलं.
- इतरांचा विरोध होता तरी हेडगेवार यांनी गोळवलकरांनाच त्यांचा उत्तराधिकारी म्हणून का निवडले?
- संघाची हाफ चड्डी आणि गणवेषामागे या माणसाचं डोकं होतं..