फक्त बनियानवर घराबाहेर पडला तो १२ वर्षानंतर थेट पाकिस्तानच्या जेलमध्ये सापडला
भारत – पाकिस्तान सख्खे शेजारी. या दोन्ही देशांची सीमा जवळपास 3300 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. ज्यातल्या बऱ्याच एकमेकांना लागून आहेत. काही ठिकाणी जबरदस्त सुरक्षा तैनात आहे. तर काही ठिकाणी फक्त एका तारेचं कंपाऊंड.
त्यामुळे बऱ्याचदा लोकं चूकून या देशातून त्या देशांमध्ये जातात. पण त्यांना परत आपल्या देशात येणं अवघड होऊन बसतं. त्यांच्याकडं हेर म्हणून पाहिलं जात.
मग चौकशी सत्र, त्या व्यक्तीच्या संबंधित देशांशी चर्चा या सगळ्या गोष्टींना इतका अनेक वर्षे लागतात. याबाबतीत आपला देश जरा शांततेची भूमिका घेतो. परंतु पाकिस्तान मात्र आपला स्वभावपासून दूर जात नाही.
सरबजीत, कुलभूषण जाधव यांची उदाहरणं आपल्या समोर आहेत.
असचं काहीसं घडलं राम बहादूरसोबत जो गेले कित्येक वर्षे पाकीस्तानच्या तुरूंगात बंद होता.
राम बहादूर हा नरैनी तहसील परिसरातील पाचोखर गावचा रहिवासी. 12 वर्षांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी अख्ख मध्य प्रदेश पालथ घातलं प्रत्येक पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवल्या, पण राम बहादूरचा काही पत्ता लागला नाही.
दरम्यान, एक दिवस अचानक अमृतसर प्रशासनाचा फोन आला आणि घरातील प्रत्येकाला धक्का बसला. मे महिन्यात समजले की, तो पाकिस्तानच्या तुरुंगात आहे.
आता तो पाकच्या ताब्यात होता याचं टेन्शन तर होतं परत त्याला कधी सोडणार हे सुद्धा माहित नव्हतं, पण तो जिवंत आहे हा आनंद आई कुस्माला होता. तो सुखरूप आहे हे समजल्यावर धाकटा भाऊ त्याला सोडवण्यासाठी नातेवाईकांच्या मदतीनं पैसे गोळा करायच्या मागे लागला.
45 वर्षीय राम बहादूर 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2009 साली गावातील मुलांसोबत सायकलवर फक्त बनियान घालून नरैनीला गेला होता, त्यानंतर त्याच्याबद्दल काहीच कळले नाही. फेब्रुवारी 2009 पासून त्याचा सगळीकडे शोध घेतला गेला. बर्याच वर्षे घरच्यांनी शोध घेतला शेवटी सगळ्यांनी हार मानली.
त्यानंतर अमृतसर प्रशासनाने राम बहादूर यांच्या घरी फोन केला. आणि तो पाकिस्तानच्या तुरूंगात असल्याची माहिती दिली. त्यानंतर मे महिन्यात LIU टीम गावात आली होती. पाकिस्तानच्या प्रधान सचिवांचे पत्र दाखवण्यात आले. त्यानंतर राम बहादूर पाकिस्तानी तुरुंगात असल्याची खात्री पटली.
तेथून त्याच्या हालचालींची माहिती मागवण्यात आली. LIU टीमने नातेवाईकांशिवाय गावकऱ्यांची देखील चौकशी केली होती. तहसीलदार सुशील सिंग यांच्याकडून माहिती घेतली गेली. कुटुंबीयांचे जबाब घेण्यात आले आणि प्रतिज्ञापत्र घेण्यात आले. वडील आणि धाकटा भाऊ मैकू यांनी त्यांच्या निवेदनात संपूर्ण हकीकत सांगितली.
पत्रात दिलेल्या माहितीनुसार त्याला पाकिस्तानमध्ये सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दरम्यान तो तीन वर्षे लाहोर तुरुंगातही होता.
राम बहादूरच्या वडिलांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, मुलगा आधी पूर्णपणे ठीक होता. ते लोक भूमिहीन आहेत. बटाईनं शेती करून ते कुटुंबाच पोटपाणी भरतात.
राम बहादूर सुद्धा शेती करायचा. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गेंदा नावाच्या मुलीशी त्याचं लग्न झालं. पण त्याची बायको तीन महिन्यातचं निघून गेली. त्यानंतर मुलाचे मानसिक संतुलन बिघडले होते.
दरम्यान, आता राम बहादूरची सूटका करण्यात आलीये. अमृतसर प्रशासनासह नातेवाईकांना बोलावण्यात आलेय, मुलाच्या सुटकेबद्दल ऐकून कुटुंबीयांच्या डोळ्यांतून आनंद अश्रू वाहू लागले.
हे ही वाच भिडू :
- कुलभूषण जाधव केसवेळी पाकिस्तानच्या वकिलाने डोक्यावर पांढरा विग का घातलेला?
- कुलभूषण जाधवांच संपुर्ण प्रकरण आपण समजून घ्यायला हवं..
- पाकिस्तानला कोर्टात हरवलं पण दुर्दैवाने कोरोनाची लढाई जिंकू शकले नाहीत..