भारतातील एक अशी पायऱ्यांची विहिर ज्यात एक सिक्रेट बोगदाही आहे
आपल्या ग्रामीण भागात आजही बऱ्याच वाड्यात आड- विहिरी असतात. पूर्वीच्या काळात घरो-घरी जसं लोकं आप-आपल्या परीने आड-विहीर बांधत असत.
त्याचप्रमाणे पाण्याची कमतरता भासू नये म्हणून जुन्या काळी राजा-महाराजा आपल्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विहिरी खोदत असत. भारतात अशा हजारो विहिरी आहेत, ज्या शेकडो वर्षे जुन्या आहेत तर काही हजार वर्षांच्याही पेक्षा जुन्या. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विहिरीबद्दल सांगणार आहोत, ज्याचे नाव आहे ‘रानी की बावडी‘. वास्तविक बावडी म्हणजे पायरी विहीर.
गुजरातच्या पाटण जिल्ह्यात असलेली ‘रानी की वाव’ ही जलसंधारणाच्या प्राचीन परंपरेचे अनोखे उदाहरण आहे. असे म्हटले जाते की राणी की वाव/बावडी १०६३ मध्ये सोळंकी वंशाचा राजा भीमदेव प्रथम याच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी राणी उदयमती हिने बांधली होती. राणी उदयमती ही जुनागढचा राजा चुडासामा रा खेंगरची मुलगी होती.
‘राणी की वाव’ हा उत्कृष्ट वास्तुकलेचा जिवंत आणि अद्वितीय नमुना मानला जातो.
हि राणी की वाव ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल आहे. ही भारतातील सर्वात अनोखी वाव आहे. त्याच्या भिंती आणि खांबांवर अनेक कलाकृती आणि शिल्पे अतिशय सुंदरपणे कोरलेली आहेत. यातील बहुतेक कोरीव काम भगवान विष्णू, भगवान राम, वामन, नरसिंह, महिषासुरमर्दिनी, कल्की इत्यादी विविध रूपांमध्ये आहेत.
ही सात मजली वाव मारू-गुर्जरा स्थापत्य शैलीची साक्ष आहे. सरस्वती नदी गायब झाल्यानंतर सुमारे सात शतके ते गाळात गाडली गेली होती. भारताच्या पुरातत्व खात्याने ती पुन्हा शोधून स्वच्छ केली. आता येथे मोठ्या प्रमाणात लोक फिरायला येतात.
या वावमध्ये ३० किमी लांबीचा रहस्यमय बोगदाही आहे.
असे म्हटले जाते की या जगप्रसिद्ध पायरीच्या खाली एक छोटा दरवाजा देखील आहे, ज्याच्या आत सुमारे ३० किमी लांबीचा बोगदा आहे. पाटणमधील सिद्धपूर येथे हा बोगदा उघडतो. असे मानले जाते की या गुप्त बोगद्याचा वापर राजा आणि त्याचे कुटुंब युद्धात किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीत करत होते. सध्या हा बोगदा दगडफेक आणि चिखलामुळे बंद आहे.
‘रानी की बावडीचा इतिहास ९०० वर्षांहून अधिक जुना असून येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. २०१४ मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेय. युनेस्कोने याला तांत्रिक विकासाचे अलौकिक उदाहरण म्हणून मान्यता दिली आहे. यामध्ये जलव्यवस्थापनाच्या उत्तम व्यवस्थेबरोबरच कारागिरीचे सौंदर्यही दिसून येते. ‘रानी की वाव’ ही संपूर्ण जगात एकमेव अशी पायरी विहीर आहे ज्याचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. प्राचीन भारतातील जलव्यवस्थापनाची व्यवस्था किती उत्कृष्ट होती याचाही तो पुरावा आहे.
जुलै २०१८ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने १०० च्या नोटेवर ती वैशिष्ट्यीकृत केली होती.
या वाव ११ व्या शतकातील भारतीय भूगर्भीय वास्तू रचना आणि जल व्यवस्थापनात भूजल संसाधनांचा वापर करण्याच्या तंत्राचे सर्वात विकसित आणि व्यापक उदाहरण आहेत.
राणी की वाव ऐतिहासिक तथ्ये देखील पाहणे गरजेचं आहे, भारतात पायऱ्यांच्या बांधकामाचा आणि वापराचा मोठा इतिहास आहे. या विहिरी आपल्या देशाच्या मौल्यवान आणि अविभाज्य वारशाचे प्रतीक आहेत, असे बोलले जाते. या विहिरी पाणी व्यवस्थापनाच्या जुन्या पद्धतींपैकी एक आहेत, त्यांचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून महत्त्वपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. त्यांचे जतन करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.
हे हि वाच भिडू :
- मालेगाव बॉम्बस्फोटपासून सुरवात झालेला सायकल बॉम्बने आतापर्यंत शेकडो भारतीयांचा जीव घेतलाय
- मालेगाव बॉम्बस्फोटपासून सुरवात झालेला सायकल बॉम्बने आतापर्यंत शेकडो भारतीयांचा जीव घेतलाय
- ‘द काश्मीर फाईल’मध्ये असं काय आहे कि, विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याची धमकी मिळतेय