लाल किल्यावर फडकलेला झेंडा हा निशाण साहिब की खलिस्तानी..? काय आहे दोन झेंड्यातला फरक वाचा
दिल्लीमध्ये सुरू असणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. आज भारताच्या प्रजासत्ताक दिनादिवशीच शेतकरी संतप्त झाले आणि दिल्लीत घुसले. या दरम्यान लाल किल्ला परिसरात आंदोलन करत असताना आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरती आपला झेंडा लावला.
लाल किल्ल्यावर हा झेंडा नेमका कुठे लावण्यात आला तर ज्या ठिकाणावरून १५ ऑगस्टला पंतप्रधान भाषण करत असतात त्या डायसवरती असणाऱ्या झेंड्याच्या जागेवर केसरी आणि पिवळ्या रंगाचे दोन झेंडे फडकवण्यात आले..
लागलीच सोशल मिडीयावर हाहाकार झाला आणि खलिस्तानी चळवळीचा हा झेंडा असल्याचा आरोप करण्यात येवू लागला?
Khalistani Flag hoisted on Red Fort.. BlACK DAY FOR INDIA .. https://t.co/Rz5peVQrHC
— Sumit Kadel (@SumitkadeI) January 26, 2021
खरच हा झेंडा खलिस्तानवाद्यांचा आहे का? भारताचा झेंडा काढून तिथे खलिस्तानवाद्यांचा झेंडा लावण्यात आला का?
काय खरं काय खोटं…?
लाल किल्यावरून फडकवण्यात आलेल्या दोन झेंड्यापैकी पहिला झेंडा आहे तो,
निशाण साहेब.
या झेंड्यावर जे चिन्ह आहे त्याला ‘खंडा’ असं म्हणतात. शीख समाजाचे गुरू हरगोविंद सिंग यांनी ‘संत सिपाही’ची मांडणी केली होती. याच मांडणीला पुढे नेण्याचं काम शीखांचे दहावे आणि शेवटचे गुरू श्री गुरू गोविंद सिंग यांनी केलं.
त्यानुसार ‘खंडा’चे चिन्ह तयार करण्यात आले.
पुढे श्री गुरू गोविंद सिंग यांनी खालसा या पंथाची स्थापना केली होती. त्यांनीच खालसा पंथाचे स्वरूप कसं असावं आणि चिन्ह कोणतं असावं याबाबत मार्गदर्शन केलं होतं. हर गोविंदसिंग यांनी सुरुवातीच्या काळात तयार केलेल्या खंडाच्या चिन्हामध्ये फक्त दोन कृपाण होत्या.
या दोन कृपाण म्हणजे मीरी आणि पीरी. याचाच अर्थ अध्यात्म आणि राजकारण असा होतो. सोबतच जितकं महत्त्व अध्यात्माला दिलं जाईल तितकंच महत्त्व कर्तव्याला देखील असायला हवं. असं ही सांगितलं आहे.
पण कालांतराने गुरू गोविंद सिंग यांनी त्यात चक्र आणि दुधारी तलवार यांचा समावेश केला.
यामध्ये दुधारी तलवार ईश्वराचं प्रतीक आहे, तर ईश्वर अनादी आणि अनंत आहे आणि त्याने जे नियम आखून दिले आहेत त्याच नियमांमध्ये आयुष्य घालवावे याचे प्रतीक चक्र आहे असं मानण्यात येत. तर हे खंडा चिन्ह केसरी रंगाच्या ध्वजावर झळकताना दिसते. केसरी रंग हा त्यागाचे प्रतीक मानण्यात येते.
तर लाल किल्यावरून फडकवण्यात आलेला दूसरा झेंडा आहे तो,
शेतकरी आंदोलनाचा.
या दोन झेंड्याव्यतिरिक्त तिसरा झेंडा असतो तो खलिस्तानवादी चळवळीचा. मात्र आजच्या आंदोलनात कुठेही खलिस्तानवादी झेंडा फडकवण्यात आलेला नाही..
खलिस्तानवादी झेंड्याचा इतिहास काय आहे..?
खलिस्तान चळवळीचा झेंडा हा १९७० च्या दशकात उदयाला आल्याचे सांगण्यात येते. खलिस्तान चळवळीचे नेते देवेंद्र सिंग परमार यांनी १९५४ साली लंडनला स्थलांतर केले. त्यांच्या इथल्या पहिल्या बैठकीला २० पेक्षा देखील कमी लोक उपस्थित होते.
त्यातील १ सोडून सर्वानी त्यांना वेड्यात काढलं, पण परमार यांनी सोडले नव्हते. यानंतर १९७० मध्ये त्यांनी बर्मिंघममध्ये खलिस्तान झेंड्याला बळ मिळाले.
खलिस्तानी झेंडा २ रंगात असल्याचं पाहायला मिळत. १ म्हणजे केशरी आणि दुसरा म्हणजे पिवळा. या दोन्ही झेंड्यावर चिन्ह निशाण साहिब च चिन्ह दिसून येतं, पण प्रामुख्याने फरक म्हणजे या झेंड्याच्या खाली खलिस्तान असं लिहिलेलं असतं. जे आज लाल किल्यावरून फडकवलेल्या झेंड्यामध्ये नाही.
हे हि वाच भिडू.
- दिल्ली आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं..?
- दिल्लीतल्या आंदोलनात शेतकरी आहेत की खलिस्तानवादी..?
- खलिस्तानवादी म्हणताय, अहो आंदोलन करणाऱ्या या पाच नेत्यांबद्दल वाचा मग अक्कल येईल