पक्ष कोणताही असो उत्तर भारतीयांना टाळून मुंबई महापालिकेत सत्ता मिळणं अवघड झालय

”ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत ते सगळेच मुंबईकर आहेत. या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगीकारली आहे.”

असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी १५ एप्रिलला झालेल्या मुंबईत झालेल्या एक उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात केलं होतं.

उत्तर भारतीय संघाने कॅन्सर रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी उभारलेल्या एका विश्रामगृहाच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते.

उत्तर भारतीय संघ मुंबईमधल्या ३५ लाख उत्तर भारतीयांचं प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करते. 

मागच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळं आता येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता उत्तर भारतीय मतांसाठी आता सर्वच राजकीय पक्षांत चढाओढ होणार यात शंका नाही. 

सर्वच यासाठी की भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उघड उघड प्रयत्न करतात हे सर्वश्रुत आहे. मधल्या काळात शिवसेनेनेही हिंदुत्वाचा मुद्दा पुढं करत उत्तर भारतीयांना साद घातली होती. आणि आता फक्त मराठी माणसांचा मुद्दा घेऊन पुढं आलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण हिंदुत्वाकडे वळल्यापसून उत्तर भारतीयांबद्दल मवाळ झाली आहे. 

मुंबई महानगरपालिकेत असणारा हाच उत्तर भारतीयांचा दबाव सर्वच राजकीय पक्षांना “उत्तर भारतीय” लोकांकडे मतांचा जोगवा मागायला कारणीभूत ठरतो.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार,

२०१७ च्या पालिका निवडणुकित  २२७ सदस्यसंख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेत ७२ बिगरमराठी आहेत नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी २६ मुस्लिम, २४ गुजराती, १४ उत्तर भारतीय, पाच दक्षिण भारतीय आणि तीन ख्रिश्चन आहेत.

आता हे झालं निवडून आलेल्यांचं. पण त्यापलीकडेही इतर जागांवर पण उत्तर भारतीयांची मतं  निर्णायक असतात. मुंबईत २७% पेक्षा जास्त उत्तर भारतीय मतदार आहेत, तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात  (MMR) १ कोटी ५० लाख मतदान उत्तर भारतीयांचं असल्याचं सांगण्यात येतं.

मुंबईतील एकूण प्रभागांपैकी १८४ मध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या ५ ते ५३% पर्यंत आहे. यापैकी तर ६३ प्रभागांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण २५% पेक्षा जास्त आहे.

पूर्व उपनगरांपेक्षा पश्चिम उपनगरात विशेषतः अंधेरी, वांद्रे, भाईंदर, बोरिवली, दहिसर, गोरेगाव, जोगेश्वरी, जुहू, कांदिवली, खार, मालाड, मीरा रोड, सांताक्रूझ या भागात उत्तर भारतीय मतांचा बऱ्यापैकी बोलबाला आहे.

आणि त्यातही उत्तर भारतीय मतदार हिंदू मुस्लिम हे विभाजन सोडलं तर आपली एकगठ्ठा मतं पक्षाच्या पारड्यात टाकतो असं निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवतात.

२०१७ च्या आधी उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जायचा. संजय निरुपम, नसीम खान, कृपाशंकर सिंग, राजहंस सिंह, चंद्रकांत त्रिपाठी अशी उत्तर भारतीय नेत्यांची फळी काँग्रेसकडे उत्तर भारतीय मतदान मोठ्या प्रमाणात आणायची.

मात्र २०१७ च्या निवडणुकीत मात्र चित्र पालटलं आणि उत्तर भारतीयांनी मोठ्या प्रमाणात भाजपाला मतदान केलं.

भाजपने २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेवर सर्वाधिक ३६ अमराठी नगरसेवक पाठवले आहेत, ज्यात २३ गुजराती, १२ उत्तर भारतीय आणि एक दक्षिण भारतीय आहे. आणि त्यानंतर भाजपने उत्तर भारतीय मतदानावरची आपली पकड अजूनच घट्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचा प्रमुख उत्तर भारतीय चेहरा असलेल्या विद्या ठाकूर यांना स्थान होतं. त्याचबरोबर कृपाशंकर सिंग आणि राजहंस सिंग हे काँग्रेसचे उत्तर भारतीयांचे नेते आज भाजपात आहेत.

त्यापैकी राजहंस सिंग यांना भारतीय जनता पार्टीने विधनपरिषेदेचं तिकीट देऊन आमदार देखील केलं आहे.

भाजपच्या महापालिकेच्या गटनेतेपदीही उत्तर प्रदेशातील आझमगड येथून आलेल्या विनोद मिश्रा यांची निवड करण्यात आली होती.

इतिहासात असं पहिल्यांदा झालं होतं जेव्हा एक उत्तर भारतीय महापालिकेत भाजपचा गटनेता बनला होता.

उत्तर भारतीय मुस्लिमांचाही स्वतःच असं मोठं मतदान आहे.

मुंबईतल्या उत्तर भारतीय मतदानाच्या एकूण मतदानापैकी ४०% मतदान मुस्लिमांचं आहे.

आत हे मतदान तर भाजपाला जात नाही मात्र या मतांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी अशी चौरंगी स्पर्धा असते. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकांत काँग्रेसचे ११, समाजवादी पक्षाचे ७, एआयएमआयएमचे ४, राष्ट्रीय काँग्रेसचे ६ आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला असे मुस्लिम नगरसेवक महानगरपालिकेवर निवडून गेले होते. काँग्रेसचे नसीम खान, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, राष्ट्रवादीचे नवाब मलिक हे मुस्लिम उत्तर भारतीयांचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. 

त्यामुळं उत्तर भारतीय मतांसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावणार एवढं फिक्स आहे.

या निवडणुकीत अजून एक महत्वाची गोष्ट असू शकतेय ती म्हणजे राज ठाकरेंचा मराठी-अमराठी मुद्दा या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे. कधी काळी छटची नौटंकी सहन करणार नाही असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी छट पूजेला विरोध नसल्याचं स्पष्टीकरण पार उत्तर भारतीयांच्या सभेत जाऊन दिलं होतं. आणि आता तर मनसेने हिंदुत्वाची कास धरली आहे. त्यामुळंच उत्तर भारतीय मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता कमी आहे. 

त्यामुळं हिंदुत्वाच्या मुद्यावर उत्तर भारतीय मतदार कोणत्या पक्षाला मतदान करतो हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि त्यावरच मुंबई महानगरपालिकेचा निकाल बदलू शकतो.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.