राजकारण्यांपासून सुपरस्टारपर्यंत कोणालाही दयामाया न दाखवणारा NCBचा सिंघम

NCB म्हणजेच नार्कोटिक्स क्राईम ब्युरो. नुकताच त्यांनी मुंबईच्या मुच्छड पानवाल्यावर कारवाई केली. मुंबईचा हा मर्सिडीजमधून फिरणारा हायप्रोफाईल पानवाला अनेक सेलिब्रिटींना अंमली पदार्थ सप्लाय करायचा असं म्हणतात.

त्याच्या अटकेमुळे मुंबईत अनेक बंद दारे उघडली गेली आणि मोठमोठी नावे समोर येत गेली. यातच एक मोठं नाव म्हणजे समीर खान. राष्ट्रवादीचे नेते व सध्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा हा जावई. त्याच नाव या रॅकेटमध्ये आल्यावर सगळीकडे गोंधळ सुरु झाला. थेट नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने मुंबईत आपला धडाका जोरात लावला आहे. या सगळ्या कारवायांच्यामागे एक अधिकारी विशेषतः चमकत आहे.

‘समीर वानखेडे नाम तो सुना होगा.’ एनसीबीचा सिंघम अशी त्यांची नवी ओळख बनली आहे.

समीर वानखेडे मूळचे मुंबईचेच. २००४ साली यूपीएससीच्या परीक्षेततून त्यांनी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसची जागा पटकावली. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एयरपोर्टवर झाली.

मुंबईचे एअरपोर्ट म्हणजे भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक. दररोज हजारो लोक येथून प्रवास करत असतात. इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडचे सेलिब्रिटी. मुंबई मधल्या फिल्मइंडस्ट्रीमुळे या एअरपोर्टवर अनेक सेलिब्रिटीजचा राबता सुरु असतो.

पूर्वी जेव्हा एखादा सेलिब्रिटी विमानतळावर यायचा तेव्हा कस्टम्सचे अधिकारी त्याची तपासणी करण्याऐवजी त्याच्या सह्या घेण्यात मश्गुल असायचे. अनेक ज्युनिअर अधिकारी सेलिब्रिटी विशेषतः अभिनेत्रींच्या वावरानेच गांगरून गेलेले असायचे. समीर वानखेडे यांनी हे सगळं बंद केलं.

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सगळ्या सेलिब्रिटींना देखील कस्टम्समध्ये सगळे सामान चेक करायला लावणे कम्पलरी केले. परदेशी खरेदी करून आणलेल्या वस्तूंचे कस्टम व टॅक्स भरले आहे कि नाही याची कडक तपासणी होऊ लागली. ज्या गोष्टींचे टॅक्स भरले नाहीत त्या वस्तू सोडून जायला अथवा त्यांचे टॅक्स भरायला लावलं जाऊ लागलं.

बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स,राजकारणी यापैकी कोणालाही त्यांनी सोडलं नाही.

काहीवेळा नियमाच्या बाहेर जाऊन काही सिनेस्टार्स परदेशातून खरेदी करतात पण जेव्हा कारवाई होणार हे लक्षात आले तर आपले सामान आपल्या असिस्टंट कडे देऊन त्याच्यावर नाव ढकलतात. समीर वानखेडे यांनी तेव्हा पासून प्रत्येक सेलिब्रिटीला आपले सामान स्वतः वाहून न्यायला लावलं.

या एअरपोर्टच्या ड्युटीमध्ये त्यांनी अनेक अनुभव घेतले. एकदा एका सुप्रसिद्ध क्रिकेटर ने त्यांना रात्री ३ वाजता फोन करून आपल्या मित्राला उंची मद्याच्या १६ बाटल्या नेऊ देण्याची विनंती केली. असे प्रसन्ग अनेकदा आले मात्र वानखेडे कधी दबावापुढे झुकले नाहीत. त्यांनी नियमानुसारच काम करणे ठीक समजले.

वडील पोलीस खात्यात असल्यामुळे वानखेडे यांच्यावर संस्कारच तसे झाले होते.

पुढे २०१० साली त्यांची बदली महाराष्ट्र सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंट मध्ये झाली. तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल २५०० जणांवर टॅक्स डिपार्टमेंटने कारवाई केली. यातील २०० जण सेलिब्रिटी होते. फक्त दोनच वर्षात ८७ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचा विक्रम त्यांनी केला.

अजय देवगणचा सिंघम हा त्यांचा सगळ्यात आवडता सिनेमा आहे. अजय देवगण यांच्याच गंगाजल या सिनेमात काम केलेल्या क्रांती रेडकर यांच्याशी त्यांनी पुढे जाऊन लग्न देखील केलं.

वानखेडे यांची ख्याती ऐकून २०१३ साली त्यांना एनसीबी डिपार्टमेंट मध्ये बोलावून घेण्यात आले. आपल्या पहिल्या नियुक्ती पासून त्यांनी नार्कोटिक्स डिपार्टमेंटचा चेहरा मोहरा बदलून टाकला. मिका सिंग,अनुराग कश्यप, विवेक ऑबेरॉय तसंच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या घरी त्यांनी छापे टाकले होते. त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि धाडसी कारवाईचे कौतुक राष्ट्रीय पातळीवरून डॆहील करण्यात आलं.

पुढे नॅशनल इन्वेस्टिगेटिंग एजन्सी, रेव्हेन्यू इंटेलिजन्स डिपार्टमेंट मध्ये त्यांनी काम केलं. वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्यावर फास आवळण्यात वानखेडे यांचा सिंहाचा वाटा होता.

गेल्या वर्षी ते महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे NCB झोनल डिरेक्टर बनले. सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येपासून बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन याची चर्चा जोरात सुरु होती. समीर वानखेडे यांनी याचे सगळे धागे दोरे उकरून काढण्यास सुरवात केली. फक्त गेल्या दोन वर्षात त्यांनी १७०० कोटी रुपयांचे ड्रग खणून काढले आहेत.

सुशांत सिंग प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती हिची चौकशी त्यांनीच केली. याशिवाय श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण यांच्या प्रकरणाचाही तपास वानखेडे यांच्याकडेच देण्यात आला होता. भारती सिंग आणि तिच्या पतीला रंगेहाथ पकडणे, अर्जुन रामपालची चौकशी त्यांनीच केली.

असं म्हटलं जातं की करण जोहर सारखे बॉलिवूडचे सर्वात मोठे सेलिब्रिटी देखील त्यांचं नाव ऐकलं कि थरथर कापतात.

काही महिन्यापूर्वी समीर व त्यांची टीम कॅरी मॅंडिस या ड्रग तस्कराला अटक करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्यावर जवळपास ६० जणांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात पथकातील दोन अधिकारी जखमी झाले. या हल्ल्याची माहिती कळताच मुंबई पोलीस तिथे पोहोचले होते आणि परिस्थिती नियंत्रणात आणून पथकातील अधिकाऱ्यांचा हल्लेखोरांपासून बचाव केला होता. 

मात्र कोणताही हल्ला दबाव समीर वानखेडे यांना आपलं काम करण्यापासून थांबवू शकला नाही.

परवा त्यांनी मुंबईत वांद्रे येथून ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करण सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता अशी माहिती चौकशीत समोर आली. राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती.

तपासादरम्यान करण सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून पैशांचा मोठा व्यवहार झाला असल्याचं समोर आलं. ड्रग्जसाठी हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय होता. समीर खान ड्रग्जचे सेवन करत होते याचे पुरावे देखील मिळाले असल्याचं बोललं गेलं. त्याला याबद्दल समन्स बजावण्यात आल आणि आज सकाळी त्यांनाही अटक करण्यात आली.

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते असलेल्या नवाब मलिक यांचा जावई असलेल्या समिरवर त्यांनी केलेली कारवाई मोठी धाडसाची मानली जात आहे. क्रिकेटर असोत किंवा फिल्म सुपरस्टार किंवा कोणी मोठा नेता समीर वानखेडे यांच्या धडाक्यात कोणाचीही सुटका झालेली नाही. हा कर्तव्यदक्ष अधिकारी कायदा सोडून कोणापुढेही झुकत नाही हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेले आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.