मोठा गाजावाजा करत सुरु झालेला समृद्धी महामार्ग फेल ठरतोय का…?
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणजे महाराष्ट्राच्या विकासात आणि वैभवात भर घालणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प…पण…समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.
या अपघाताचे विधानसभेत पडसाद उमटले. आमदार संजय रायमुलकर आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत प्रश्न विचारत अपघातप्रवण स्थळांवर उपायोजना करणार का, असा सवाल शिंदे सरकारला केला.
जेव्हापासून उदघाटन झालं तेंव्हापासून जिकडे तिकडे सत्ताधारी समृद्धी महामार्गाबद्दल कौतुक करताना थकत नव्हते. मात्र महामार्गावर अनेक अडचणींचा सामना प्रवाश्यांना करावा लागतोय त्याबद्दल सत्ताधारी नेते ब्र देखील काढत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग सोयीचा की अडचणींचा ? हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण नेमक्या समृद्धी महामार्गावर असलेल्या अडचणी कोणत्या आहेत ते पाहूया,
समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली.
रस्त्यांची देखभाल केली जात नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर कुठे खड्डे, कुठे खणून ठेवलेलं आहे. त्यामुळेही अपघात वाढल्याचं सांगण्यात येतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या १८ दिवसांत विविध भागात किमान ४० अपघात झाले. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले आहेत आणि याबाबात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ वाढत्या अपघातांबाबत मौन बाळगून आहेत.
टायर फुटण्याच्या घटना वाढल्यात.
समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूरमधील अंतर कमी झालं आहे. त्यामुळे या महामार्गावरून वाहने सुसाट सुटत आहेत. परिणामी महामार्गावर काही अपघाताच्या घटना घडल्या देखील आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेग मर्यादेबाबत वाहन चालकांना कल्पना द्यायला हवी. कारण गाडीचा स्पीड वाढवला तर टायर फुटीच्या घटना घडत आहेत.
अलीकडेच शिर्डी नागपूर या समृद्धी महामार्गावर एका धावत्या कारनं अचानक पेट घेतला. या आगीत कार जळून खाक झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रवास करताना वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात, प्रवासात टायरची काळजी घेण्याचा सल्ला ऑटोमोबाईल तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या मारूती, स्कॉरपीओसारख्या गाड्यांचे टायर स्पीडमुळे महामार्गावर फुटत आहेत. थंडी असतानाही टायर फुटत आहेत तर मग उन्हाळ्यात तापमान ४२-४३ च्या वर जाईल तेंव्हा टायर फुटीच्या घटना आणखी वाढतील त्यामुळे सरकारने खबरदारी घेतली पाहिजे.
शेतकऱ्यांनाही समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्याकरिता या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊ केल्या त्या शेतकऱ्यांना आज समस्यांना तोंड द्यावं लागतंय. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या शेतांमध्ये उभ्या पिकांमध्ये महामार्गावरून वाहत येणारे पाणी साचल्याने आणि शेतात असणाऱ्या या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने या पिकांचे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांकडून याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व अधिकाऱ्यांना वारंवार विनवण्या केल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून शेतांत पाणी जाणार नाही यासाठी चर खोदण्यात आले. पण भविष्यात समृद्धी महामार्गावरून पावसाचे पाणी शेतांमध्ये येऊ नये यासाठी प्रभावी उपाय योजना मात्र प्रशासनेला सुचत नाहीत. सिन्नर तालुक्यातील वावी येथे गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी या संकटाचा सामना करत आहेत
समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप,डिझेल पंप, इलेक्ट्रिक मोटर चार्जिंग स्टेशन नाहीत.
या महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७ ठिकाणी तर शिर्डीहून नागपूरच्या दिशेने ६ ठिकाणी अशा फक्त १३ ठिकाणी इंधन भरण्यासाठी डिझेल आणि पेट्रोल पंपाची सोय करण्यात आली आहे. १०० किमीच्या टप्प्यात पेट्रोल पंप नाहीत. शिर्डीपर्यंतच्या मार्गावर मात्र साधे पंक्चर दुरुस्तीचे दुकानदेखील नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
नागपूर ते अकोला दरम्यान प्रवाशांना इंधन आणि वाहन दुरुस्तीसाठी दिलेल्या निर्गमनातून बाहेर जावे लागते. महामार्गावर स्पीड गन आणि कॅमेरे बसवण्याची गरज आहे.
खाण्यापिण्याची ठिकाणे नाहीत.
विश्रांतीची ठिकाणे, गॅरेज, मोटेल किंवा फूड जॉइंट्स यांसारखी कोणतीही गरेजची साधनं नाहीत. सर्वात महत्वाचं आहे दूर-दूर पर्यंत महिलांसाठी स्वच्छता गृह नाही. खरं तर थोड्या-थोड्या अंतराने प्रसाधनगृह असायला हवेत मात्र महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने जी काही ७ पेट्रोल पंप आहेत तिथेच काय ते प्रसाधनगृह आहेत. रस्त्यावर तहान लागली तर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी लाइट्स खराब असल्याचं प्रवासी सांगतात.
वन्यजीव
हा महामार्ग जंगलातून गेला असल्याने रस्त्यावर अचानक आडव्या येणाऱ्या जंगली जनावरांमुळे अपघातांची संख्या वाढलीय. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत जिथून प्राणी महामार्गावर प्रवेश करतात. जागोजागी वानरांची, माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत ज्याची अडचण प्रवासादरम्यान येत आहे. प्रवाशांच्या आणि प्राण्यांच्या सुरक्षेखेरीज निव्वळ गतीला अर्थ नसतो. त्यामुळे त्यामुळे रस्ते सुरक्षा संदर्भात पुरेशा प्रतिबंधात्मक सोयी आवश्यक आहेत.
एवढेच काय तर, वैद्यकीय मदत उपलब्ध नाही.
दुर्दैवाने गाडीला अपघात झाला तर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देणारी साधने नाहीत. जर काही अपघात झाला तर मदत कशी पोहोचणार? कारण असंच अपघातात सापडलेल्या कुटुंबासोबत घडलेलं आहे. प्रवासा दरम्यान अपघात झाल्यास इस्पितळ, रुगवाहिका नाही, रात्रीच्या वेळी वाहन धारकांना कोणी लुटले तर पोलिसांची मदत केंद्र दूरपर्यंत कुठे दिसत नाही.
वैद्यकीय मदत मिळवून देण्याची त्यांची तत्परतादेखील आपण आत्मसात करायला हवी. रात्री-अपरात्री दुर्घटनांचा सामना करणाऱ्या कुटुंबाला ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय सुविधा मिळवून देणे गरजेचे आहे. सुरक्षा पथकांबाबतची जनजागृती हवी. दिशादर्शक फलकांपासून पोलिसी वा वैद्यकीय साहाय्याचे भक्कम पाठबळ असायला हवे.
याच सगळ्या अडचणींमुळे आणि कमी प्रतिसादामुळे नागपूर -शिर्डी बससेवा स्थगित झाली.
समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या एसटीचा खर्चही प्रवाशांअभावी निघत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा सुरू केली होती. पण त्यातून डिझेलचे पैसेही निघत नव्हते.
डिसेंबर महिन्यात एकूण आसन क्षमतेच्या तुलनेत ४० टक्के प्रवासी मिळाले होते. मात्र, जानेवारी महिन्यात त्यात कमालीची घट होऊन आसन क्षमतेच्या तुलनेत फक्त १३ टक्के प्रवासी मिळाले. फेब्रुवारी महिन्यात हा दर ८ टक्क्यांवर आला आहे. फेब्रुवारी महिन्यात तर अनेक दिवस एक ही प्रवाशाने या बसने प्रवास केला नाही. त्यामुळेच अवघ्या तीन महिन्यातच ही बस सेवा बंद ठेवण्याची वेळ एसटीच्या अधिकाऱ्यांवर आली आहे.
राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देऊ शकेल आणि गेम चेंजर ठरेल अशी अपेक्षा असलेला समृद्धी महामार्ग एसटीला मात्र आर्थिक दृष्ट्या पावलेला नाही असेच सध्याचे चित्र आहे
अशाप्रकारे समृद्धी महाराष्ट्रावरील अडचणींचा पाढाच थोडक्यात या ठिकाणी असला तरी या महामार्गावरील समस्या तातडीने सोडवल्या गेल्या पाहिजेत नाही तर वाजतगाजत शुभारंभ झालेला प्रकल्प फेल गेला म्हणावं लागेल.
हे ही वाच भिडू :
- समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना नेमकी कुणाची ?
- समृद्धी महामार्गात साडेचार एकर गेली, त्याबदल्यात ८ एकर घेतली अन् संत्रा बागायतदार झाला
- समृद्धी महामार्गाचं श्रेय कोणाचं, फडणवीस की ठाकरे..?