या महाराजांना “सटरफटर” नाव का पडलं ?

 

सटरफटर हे कसलं नाव ? नेमकां काय असेल या महाराजांचा इतिहास ? आणि हे असल सटरफटर नाव पडण्यासारखे नेमके कसले उद्योग महाराजांनी केले असावेत हे सगळं जाणून घेवुया सटरफटर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने !!!

 

धालेवाडी, तालुका : पुरंदर, जिल्हा : पुणे.

धालेवाडी हे कऱ्हा नदीच्या काठावर वसलेलं एक छोट गाव. गावाच्या शेजारी असलेल्या कऱ्हा नदी. सन १८७२ साली या गावात एका महाराजांचं आगमन झालं. त्या काळात अनेक महाराज तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात जावून त्यानंतर ते देशावर येत. अशाच प्रकारे भटकत भटकत हे साधू कऱ्हा नदिच्या किनाऱ्यावर असणाऱ्या धालेवाडी गावात विसावले.

कऱ्हेच्या शेजारी असणाऱ्या शंकराच्या मंदीरात पूजाअर्चा करणं आणि गावभर भिक्षा मागून घेणं हा महाराजांचा दिनक्रम झाला. महाराज मंदीरात येणाऱ्या भक्तांना वेगवेगळे नैसर्गिक औषधोपचार पटवून सांगू लागले. महाराजांच्या या “हातगुणाची” महती पंचक्रोशीत झाली आणि दूरदूरवरुन लोक या महाराजांना भेटी देवू लागले. आत्ता महाराजांनी एक घोडा पाळला. मंदिरात भजन किर्तन करु लागले. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराज हे संन्यासानं जे काही करायचं असतं ते सर्व हे महाराज करु लागले.

आत्ता महाराजांनी लोकांना भजनातून मार्गदर्शन करण्यास सुरवात केली, त्यांनी आपल्या पंचक्रोशीत पहिला नियम काढलां तो म्हणजे, दर सोमवारी औतफाट्यास सुट्टी !!!
याचं कारण अस की माणसांना सुट्टी असते. माणसं कंटाळा आला की काम बंद करतात मग जनावरांना सुट्टी का नको? या विचारातून महाराजांनी “दर सोमवारी जनावरांना सुट्टी” ही अभिनव कल्पना राबवली.

महाराजांच्या अशाच अभिनव उपक्रमामुळे महाराजांची किर्ती जोर घेवू लागली. महाराजांच्या भजनास गर्दी होवू लागली. भक्तांची रांग वाढली. येणारा प्रत्येकजण महाराजांना विचारे, महाराज तुमचं नाव काय ? आणि तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारायची ?
महाराज म्हणाले, नावात काय आहे. मला काहीही सटरफटर म्हणा !!!!
झालं भक्तांनी महाराजांचा आदेश पाळलां आणि महाराजांना नाव पडलं सटरफटर महाराज !!!

याबद्दल अधिक माहिती देताना धालेवाडीचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच संभाजीनाना काळाणे यांनी सांगितलं की,

“महाराजांचं नाव पाहून अनेकांना कुतूहल निर्माण होतं. परंतु महाराजांच्या नावापेक्षा महाराजांनी औतफाट्यास सुट्टी देत. एक दिवस तरी बैल व इतर जनावरांना सुट्टी देण्यास सुरवात केली यातूनच महाराजांचे विचार लोकांच्या लक्षात येतील. किमान नावाच्या निमित्ताने का होईना लोकांना महाराजांची दूसरी बाजू देखील समजणं महत्वाचं आहे”

Leave A Reply

Your email address will not be published.