साडे तीन तास पोवाडे गात राहिले आणि त्यातून थेट संयुक्त महाराष्ट्राचा काळ उभा केला
महाराजांची कीर्ती बेफाम,
भल्याभल्यांना फुटला घाम….
या पोवाड्याने एकेकाळी संबंध महाराष्ट्र दणाणून सोडला होता. पोवाड्याच्या प्रत्येक शब्दांत प्रचंड ताकद होती. शाहिराने गायलेल्या प्रत्येक ओळीने आजही अंगावर काटा येतो.
महाराष्ट्राला शाहिरांची आणि साहित्यिकांची परंपरा. शाहिरी बाण्याने शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्र जागा केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, द.ना गव्हाणकर अशा अनेक शाहिरांनी आपल्या खड्या आवाजाने महाराष्ट्रात जनजागृती आणली. आपल्या भाषेवर आणि मातीवर प्रेम करायला लावणारी हि शाहिरी परंपरा.
दुसऱ्या फळीत शाहीर विठ्ठल उमप, शाहीर बाबासाहेब देशमुख या मंडळींनी प्रबोधनाबरोबरचं छत्रपती शिवाजी महाराजांची महती आणि प्रताप भारतभर सांगितला.
पण आत्ताच्या फळीत बोटांवर मोजण्याइतक्या शाहिरांपैकी एक म्हणजे शाहीर नंदेश उमप. या माणसाच्या आवाजात असलेला दमदारपणा आणि पहाडी जरब.
नंदेश उमप यांचा आजचा किस्सा आश्चर्यचकित करणारा आहे आणि नंतर आपला आपसूकच विश्वास बसतो कि हे फक्त नंदेश उमपचं करू शकतो. प्रचंड ताकदीचा आवाज आणि सादरीकरण करणारा नंदेश उमप हा महाराष्ट्रातल्या गायन क्षेत्रातला सध्याचा महत्वाचा गायक आहे.
२०१४ साली चित्रपट आला यशवंतराव चव्हाण- बखर एका वादळाची. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते डॉ. जब्बार पटेल. चित्रपटाचे संगीतकार होते आनंद मोडक. आता यशवंतराव चव्हाण यांच्यावर जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात गाणी सुद्धा त्याच काळातली हवी होती आणि आवाजही.
जब्बार पटेल यांना या चित्रपटाची सगळी गाणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याकडून गौण घ्यायची होती. पण दुर्दैवाने ते तेव्हा हयात नव्हते. यावर उपाय म्हणून जब्बार पटेलांनी आनंद मोडक यांना विचारणा केली कि आता हि गाणी कोण गाणार ?
आनंद मोडकांनी जब्बार पटेलांना सांगितलं कि अरे आपण नंदेश उमपला घेऊ शकतो कि, विठ्ठल उमपांच्या जवळ जाणारा एकमेव आवाज म्हणजे नंदेश उमप. जब्बार पटेल नंदेश विषयी जरा साशंक होते कि,
नंदेश खरंच मला जस हवं तस गाणं देईल का ? तो खरंच इतक्या उंच पट्टीत गातो ?
आनंद मोडकांनी पटेलांना विश्वास दिला कि हि गाणी गाणारा एकच गायक आहे तो म्हणजे नंदेश उमप, मीही त्याला बऱ्याच चित्रपटांमध्ये गाऊन घेतलं आहे. जब्बार पटेलांनी सहमती दर्शवली.
आनंद मोडकांनी नंदेश उमपांना बोलावलं, गाणी समजावली, सगळी तयारी केली. मग नंदेश उमप यांना जब्बार पटेलांना भेटवण्यात आलं. जब्बार पटेलांनी नंदेशला सांगितलं कि ,
नंदेश संयुक्त महाराष्ट्राचा काळ तुला उभा करायचा आहेस.
नंदेश उमपांनी त्यांना विश्वास दिला आणि संधी दिल्याबद्दल आभारही मानले.
रेकॉर्डिंग साठी स्टुडिओ बुक करण्यात आला. दोन दिवसांमध्ये हि गाणी उरकायची होती. नंदेश उमपांना संगीतकारांनी एक दिवस आधीच पुण्याला बोलावण्यात आलं होतं. नंदेशला या चित्रपटातील तब्बल दहा गाणी गायची होती. रिहर्सलच्या दिवशी गाण्यांची तालीम झाली.
त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलही बरंच काही सांगितलं. त्यांच्या अनुषंगाने कसं गायलं पाहिजे, आवाजाने संयुक्त महाराष्ट्राचा काळ उभा राहिला पाहिजे, तो आवाज त्यातील तड्प आणि करारेपण आलं पाहिजे, नंदेश उमपांनी संगीतकाराला आश्वासन दिलं कि नक्की प्रयत्न करीन म्हणून.
दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग होती. गाणी सुरु होणार होती. नंदेश माईकवर उभा राहिला आणि त्याने हात जोडून बाबांना म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमपांना डोळ्यासमोर आणलं, त्यांना स्मरून अभिवादन केलं आणि सांगितलं कि,
बाबा हि गाणी माझ्या रूपाने तुला गायची आहे, तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ तुला उभा करायचा आहे. हे सगळं तुझं आहे, मी फक्त निमित्तमात्र.
गाणी सुरु झाली. दोन दिवसांसाठी तो रेकॉर्डिंग स्टुडिओ बुक केलेला होता. दहा गाण्यांसाठी दोन दिवस. पण नंदेश उमप यांनी हि दहा गाणी केवळ साडेतीन तासात गेली होती. रेकॉर्डिंग करून ते बाहेर आले तर सगळे अवाक होते, जब्बार पटेल प्रचंड खुश झाले, त्यांना जो आवाज चित्रपटात हवा होता तो मिळाला. त्यांनी नंदेशला शाबासकी दिली, अभिनंदन केलं.
हि साधीसुधी घटना मुळीच नव्हती, पण नंदेश उमपांच गाण्यांवर असलेलं प्रेम आणि निष्ठा या सगळ्यामुळे ते शक्य झालं. या चित्रपटातील सगळी गाणी नंदेश उमपांनी गायली आणि एक गाणं आनंद शिंदे यांनी गायलं होतं.
नंदेश उमप हा माणूस केवळ महाराष्ट्रातचं नाही तर संबंध जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातील प्रसिद्ध कोक स्टुडिओ मध्ये जाऊन गाण्याचं मोठमोठ्या गायकाचं स्वप्न असतं. त्या कोक स्टुडिओ मध्ये जाणारा नंदेश उमप हा पहिलाच मराठी गायक होता. तिथे जाऊनही आपली परंपरा त्याने गाण्यातून मंडळी. धनगरी ओव्या आणि देवीचा गोंधळ त्याने ज्या प्रकारे सादर केला त्याला शब्दचं नाहीत.
लोकशाहीर विठ्ठल उमप गेल्यानंतर त्यांचं जांभूळाख्यान नंदेश उमपांनी नेटाने पुढे चालू ठेवलं. विदेशी संगीतकारांबरोबर काम करून मराठी परंपरा जगभर पसरवली. जांभूळ आख्यानातील त्यांनी गायलेल्या या ओळी विशेष गाजल्या,
झाडाची उडविली फळं केली देवगत
एका झाडाला एक फळं लैच निर्मळ अन देठी गाभुळलं
कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकूळलं…
पोवाडे, धनगरी गीते, छक्कड, आंबेडकरी गीते, जांभूळाख्यान, लोकगीते, गजल अशा अनेक गाण्यांना नंदेश उमपांनी आपला आवाज दिला आहे. प्रसिद्धीचा जास्त गाजावाजा न करता आपल्या कामाशी प्रामाणिक राहून आपल्या मातीप्रती आणि भाषेप्रती जाण असलेला एक अस्सल शाहीर म्हणजे नंदेश उमप…..
- दुर्गेश काळे
हे हि वाच भिडू :
- प्रल्हाद शिंदे यांच्या कव्वालीने चढता सूरजचं मार्केट डाऊन केलं.
- सुरेश भटांच्या गझलेवर नाखूष झालेल्या शाहिरांनी तिथेच त्यांना प्रत्युत्तर देणारी गझल लिहिली
- फॉरेनरनां सुद्धा वेड लावणारं गाणं आनंद शिंदेनी फक्त ५ हजारात गायलं होतं.
- महाराष्ट्राच्या लोकगीताला त्यावेळी जगात पहिलं पारितोषिक मिळालं..