शाहरुखच्या पहिल्या सुपरहिट पिक्चरच्या यशात सलमानचा मोठा हात आहे

शाहरूखचा पठाण रिलीज झाला आणि लोकांनी तो डोक्यावरही घेतला. पठाणमध्ये जितकी चर्चा शाहरुख आणि जॉन अब्राहमच्या ऍक्शन सीन्सची झाली, तितकीच सलमान खान आणि शाहरुख खानच्या एकत्रित सिनची. कित्येक वर्षांनी स्क्रीनवर एकत्र दिसल्यानं या जोडीची मेजर हवा झाली.

त्यात सलमाननं डायलॉग मारला, टायगर को पठाण की जरुरत पडेगी…

तेव्हाच चर्चा सुरु झाली या दोघांभोवती फिरणाऱ्या सेपरेट पिक्चरची. आपल्या स्पाय युनिव्हर्समध्ये असा पिक्चर येणार आणि त्याचं नाव असेल टायगर व्हर्सेस पठाण, अशी घोषणा नुकतीच करण्यात आलीये.

थोडक्यात कमबॅक करत असणाऱ्या बॉलिवूडमध्ये हे दोन सुपरस्टार्स पुन्हा एकदा एकत्र येऊन राडा करणार आहेत, पण या जोडीचं नातं करण-अर्जुनपेक्षाही जुनं आहे.

सुरवातीच्या काळात शाहरुख खान काय किंग खान नव्हता, स्ट्रगलिंग पिरियडमध्ये तो सिरियल्स वगैरे करत होता. पण जेव्हा बॉलिवूडमध्ये त्याला ब्रेक मिळाला तेव्हा शाहरुख खानने बाजीगर, डर या चित्रपटांमधून त्याने जो काही झंझावात केला तो आपण पाहतच आहोत.

या चित्रपटांमधून शाहरुखचा दबदबा त्याकाळी बॉलिवूडमध्ये होता.

बाजीगर चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले, अनेक पुरस्कार शाहरुख खानला मिळाले. बाजीगर चित्रपट हा आजवरचा शाहरुखच्या सिनेमा कारकिर्दीतला गाजलेला सिनेमा म्हणून परिचित आहे.

डर चित्रपटातील गाणी आणि त्यावर शाहरुखचा रोमान्स प्रचंड गाजला होता, या चित्रपटानंतर बॉलीवूडला किंग खान मिळाला होता. तिथून काय शाहरुख मागे फिरलाच नाही. अनेक चित्रपटांमधून त्याने स्वतःला सिद्ध केले आणि यशाच्या शिखरावर तो जाऊन बसला.

पण खरंतर एक ट्विस्ट यात असा होता कि शाहरुख खानच्या आधी डर, बाजीगर हे चित्रपट सलमान खानला ऑफर झाले होते. त्यावेळी सलमान खानने हे चित्रपट काही कारणाने केले नाही. सलमान खानने रिजेक्ट केलेल्या चित्रपटांमध्ये शाहरुखची वर्णी लागली आणि तो सुपरस्टार झाला.

बाजीगर हा चित्रपट सुरवातीला सलमान खानला ऑफर केला तो अब्बास-मस्तान या दिग्दर्शक जोडीने. चित्रपटाचं कथानक सलमान खानला आवडलं होतं मात्र मुख्य पात्राची भूमिका हि निगेटिव्ह शेड मध्ये जास्त असल्याने सलमान खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

जाताना अब्बास- मस्तान जोडीला सलमान खान म्हणाला कि या चित्रपटात आईचं पात्र असावं.  या मागे सलीम खान यांनी सुचवलं कि तो नायक हे सगळे कांड आईसाठी करतो आहे असं दाखवा ज्यामुळे पिच्चर चालेल. त्यानंतर सलीम खान आणि सलमान खान तिथून बाहेर पडले.

चित्रपट शूट झाला , यावेळी सलमान ऐवजी शाहरुख खानला अब्बास-मस्तान जोडीने साइन केलं. ज्यावेळी चित्रपट पूर्ण टीमने बघितला तेव्हा अब्बास-मस्तान यांना सलीम खान यांनी सुचवलेली आयडिया पटली. त्यांनी सलमान खानला फोन केला आणि सांगितलं कि तुम्ही सांगितलेली आयडिया आम्ही चित्रपटात वापरत आहोत.

शाहरुख एका मुलाखतीमध्ये सांगतो कि बाजीगरच्या प्रीमियर वेळी सलमान त्याला म्हणाला,

“तुम्हारी बाजीगर मैने प्यार किया से भी ज्यादा हिट होगी.”

पुन्हा चित्रपटात बदल करून अब्बास-मस्तान जोडीने हा चित्रपट रिलीज केला. बाजीगर चित्रपट मैने प्यार किया इतका नाही पण तुफ्फान हिट झाला. शाहरुख खानचा हा पहिलाच सुपरहिट सिनेमा. त्यातली गाणी देखील प्रचंड फेमस झाली. निगेटिव्ह रोल असूनही शाहरुखने बाजीगर मधून आपली खास ओळख बनवली. त्याला अवॉर्ड देखील मिळाले.

त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी ऑफर येऊ लागल्या. दिलवाले दुल्हनिया हम ले जायेंगे, कुछ कुछ होता है, मोहबते, देवदास, स्वदेस अशा अनेक हिट चित्रपटांनी शाहरुख खानने आपला दबदबा बॉलिवूडवर निर्माण केला.

बऱ्याच काळानंतर चक दे इंडिया हा चित्रपट सुद्धा सलमान खानला ऑफर झाला होता पण सलमान खानने काही कारणास्तव तो चित्रपट नाकारला. हा चित्रपटसुद्धा शाहरुख खानला मिळाला आणि तो पुढे भरपूर चालला. शाहरुख खानच्या कारकिर्दीतला कळस म्हणावा असा हा चित्रपट होता.

पुढे शाहरुख खान आणि सलमान खान यांनी एकत्रसुद्धा काम केलं ज्यामध्ये करण अर्जुन, कुछ कुछ होता हे आणि मध्यन्तरी आलेला झिरो या चित्रपटांचा समावेश त्यात आहे. 

ज्यावेळी बाजीगर, डर, चक दे इंडिया या चित्रपटांना नाकारणं आणि पुढे जाऊन शाहरुख खानने हे चित्रपट हिट करणं याचा कधी पश्चाताप झाला का असं सलमानला विचारलं गेलं तेव्हा तो म्हणाला होता कि, हे चित्रपट जेव्हा मी नाकारले तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक डायलॉग लिहिला होता आणि तो डायलॉग होता कि,

इस दुनिया में हम देने के लिये आये हे ना कि लेने के लिये…..

हे हि वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.