तर संजूबाबाच्या ऐवजी शाहरुख खान मुन्नाभाईच्या रोलमध्ये दिसला असता…..
बॉलिवूडमध्ये रोल चेंज करण्याची अनेक जणांना खुमखुमी असते, म्हणजे मजेमजेत का होईना पण असा विचार मनात येतोच कि जर हा रोल याने केला, तो रोल त्याने केला असता तर किती भारी झालं असतं वैगरे. म्हणजे उदाहरणार्थ जर जोकरचं काम नवाजुद्दीन सिद्दिकीनं केलं असतं तर एक वेगळंच चित्र असतं. पण असाच एक किस्सा आहे सुपरहिट फिल्म मुन्नाभाईचा. या मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमात संजुबाबा ऐवजी शाहरुख खान अगोदर काम करणार होता.
मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमाच्या सुरवातीला जी क्रेडिट्स येतात ती जर व्यवस्थित वाचली तर तुम्हाला दिसेल कि स्पेशल क्रेडिटमध्ये शाहरुख खानचं नाव तिथं देण्यात आलेलं आहे. थॅंक्स टू शाहरुख खान पण का ? कारण मुन्नाभाई एमबीबीएसच्या स्क्रिप्टमधे शाहरुख खानचा मोठा वाटा आहे.
खरतर काय झालेलं कि शाहरुख खानच्या देवदास या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं आणि त्याच वेळी दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमाची स्क्रिप्ट लिहीत होते. लिहितेवेळी राजकुमार हिरानी यांच्या डोक्यात शाहरुख खानचा चेहरा होता. शाहरुख खान हा मुन्नाभाई असणार हे नक्की होतं. राजकुमार हिरानी यांनी शाहरुखला स्क्रिप्ट ऐकवली आणि शाहरुखसुद्धा मुन्नाभाईच्या रोलसाठी आणि सिनेमासाठी उत्सुक होता. यात स्क्रिप्टमधे शाहरुख खानने महत्वाचे मुद्दे मांडलेले होते.
स्क्रिप्ट फिल्म ज्यावेळी रेडी झाली तेव्हा शाहरुख खानची लूक टेस्ट झाली होती. विधू विनोद चोप्रा या सिनेमाचे प्रोड्युसर असणार होते आणि राजकुमार हिराणीवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी या सिनेमात पैसे गुंतवले होते पण त्यांच्या काही स्ट्रिक्ट अटी होत्या. विधू विनोद चोप्रा यांच्यासोबत काम करणं खूप जास्त अवघड असायचं. स्वतःच्या अटीवर ते काम करायला तयार होत असे.
इथंच खरं प्रकरण खटकलं आणि शाहरुख खान आणि विधू विनोद चोप्रा यांचं ट्युनिंग काय बसलं नाही. शाहरुख खानसुद्धा लय रगेल होता तोसुद्धा त्याच्याच अटींवर काम करणारा होता. दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नव्हत्या.
तेव्हा शाहरुखने या सिनेमाला रामराम केला. शाहरुख खानसोबत यात हिरोईन होती ऐश्वर्या राय. पण शाहरुखसोबत बोलणं झाल्यावर तिनेही या सिनेमातून काढता पाय घेतला.
या सिनेमात सगळ्यात आधी वेगळी कास्टिंग ठरलेली होती. जहीरचा रोल संजय दत्त करणार होता पण पुढे तो जिम्मी शेरगीलने केला आणि संजय दत्त मुन्नाभाईच्या रोलसाठी फिट झाला. मकरंद देशपांडे यांचं नाव सर्किटच्या रोलसाठी चर्चेत होतं पण काही कारणास्तव मकरंद देशपांडेंना शक्य झालं नाही आणि अर्शद वारसीच्या वाट्याला सर्किटचा रोल गेला.
पुढे राजकुमार हिराणीने या लोकांना घेऊन सिनेमा केला. सिनेमा जबरदस्त चालला आणि मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा संजय दत्तच्या करिअरमधला सगळ्यात बेस्ट सिनेमा ठरला. पुढे याच सिनेमाचा सिक्वेल सुद्धा बनला लगे रहो मुन्नाभाई म्हणून.
जर मुन्नाभाईचा रोल शाहरुख खानने केला असता तर एक वेगळाच मुन्नाभाई पाहायला मिळाला असता. पण संजय दत्तने हा सिनेमा जो काय गाजवलाय त्याला काय तोडच नाही….!
हे हि वाच भिडू :
- संजय दत्त डॉन बरोबर फोनवर बोलताना सापडला आणि त्याची फिल्म गोत्यात आली
- संजय दत्त दारू पिवून ऋषी कपूरला हाणायला गेलेला इतक्यात एक घोळ झाला…
- शाहरुखच्या पहिल्या सुपरहिट पिक्चरच्या यशात सलमान आणि त्याच्या वडिलांचा मोठा हात आहे.
- पार्टीत गन घेऊन पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या शाहरुखचा माज एका फोन कॉलवर उतरवला.