म्हणून शाहू महाराजांनी त्या व्यक्तीचं नाव बटाट्या ठेवलं.
शाहू महाराजांबद्दल अनेक किस्से आहेत. कित्येक दंतकथा देखील त्यांच्या नावाने खपवल्या जातात. किती खऱ्या किती खोट्या हा वेगळा संशोधनाचा प्रकार, पण शाहू महाराजांबद्दल असणाऱ्या या सर्व किस्यांमधून महाराजांच लोकांवर आणि लोकांच महाराजांवर असणारं प्रेमच दिसून येत असतं.
अशाच एका किस्स्याचा उल्लेख उदयसिंगराव गायकवाड यांनी केला आहे. उदयसिंगराव गायकवाड हे आमदार आणि खासदार होते. लोकल बोर्डापासून ते युनोपर्यन्त प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. सात मुख्यमंत्री आणि दहा पंतप्रधानांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यानी हा सर्व प्रवास आपल्या कथा बारा अक्षरांची या आत्मचरित्रात लिहला आहे. याच पुस्तकाच राजर्षी शाहू महाराजांचा एक अफलातून किस्सा ते सांगतात.
ते म्हणतात,
छत्रपती शाहू महाराजांना टोपननावे ठेवण्याची सवय होती. आर्य समाजाचे डी.टी. अपराध यांना शाहू महाराजांनी मालक हे टोपपनाव ठेवलं होतं. शाहू महाराज शिकारीला गेले की तिथं रेड्यावरुन पाणी आणण्याच काम एकजण करायचं म्हणून शाहू महाराजांनी त्याच नाव पखाली ठेवलं.
पुढे उदयसिंह गायकवाड सांगतात की, शाहू महाराजांचा शिकारीसाठी कोल्हापूर, आजरा, भुदरगड इथं मुक्काम असायचा. आमचे आजोबा त्यांच्यासोबत होते. महाराजांना रोज मटण खाऊन खाऊन कंटाळा आला आणि एक दिवस त्यांनी आमच्या आजोबांना बोलावून सांगितलं की,
“बाळासाहेब मला अख्या बारीक बटाट्याचा मस्त रस्सा खायचा आहे”
एवढच ना, संध्याकाळच्या जेवणात रस्सा करू या की.
पण इथे कुठं मिळाणार बटाटे.
त्याची काळजी तुम्ही कशाला करता, तुम्हाला बटाट्याचा रस्सा मिळाला म्हणजे झालं
आमच्या आजोबांनी शक्कल लढवली. सिंघण नावाच्या स्वयंपारी कॅम्पवर होता त्याला बोलावून सांगितलं की, महाराजांना बटाट्याचा रस्सा पाहीजे. सध्याकाळच्या जेवणात मस्त रस्सा करायचा.
पण मला ठाऊक आहे तू काय म्हणणार ते. बटाटे इथं कुठं मिळणार. पण हे बघ कुठंही काही बोलायचं नाही. नदीवर जायचं, तांबूस रंगाचे लहान लहान गोटे निवडून आणायचे आणि ते रश्यात टाकायचे. महाराजांना फक्त रस्सा वाढायचा.
सिंघण कुठेही काहीही वाच्यता न करता सांगितलेलं काम केलं. रात्री महाराजांना वाढण्यात आलं. बटाट्याचा रस्सा खावून महाराज खूष झाले ते बाळासाहेबांना म्हणाले रोज मटण खावून तोंडाला बुरशी आली होती. पण या रश्याने सगळी घालवली. पण मला नुसता रस्साच वाढलां. बटाटे का वाढले नाहीत.
तेव्हा ते बटाटे सालीसहित होते अस सांगून बाळासाहेबांनी वेळ मारून नेली. पण काही केल्या महाराजांच्या डोक्यातून तो विषय जात नव्हता.
दूसऱ्या दिवशी महाराज बाळासाहेबांना म्हणाले,
बाळासाहेब इतक्या जंगलात तुम्हाला बटाटे कुठून मिळाले, आण बघू ते बटाटे.
आत्ता वेळ सिंघण या स्वयपाक्याची आली होती. शाहू महाराजांना बटाटे म्हणून नदीवरच्या दगडगोट्यांचा रस्सा त्याने वाढला होता. सिंघण गयावया करू लागला. तेव्हा बाळासाहेब त्याला म्हणाले. ते दगडगोटे घे आणि पातेले घे. आपण शाहूमहाराजांना भेटू काय करायचे ते मी पहातो.
शाहू महाराजांसमोर जात बाळासाहेब म्हणाले,
“महाराज तुम्ही विचारलं इतक्या जंगलात बटाटे कुठून मिळाले. तुम्हाला बटाटे पहायचे होते. पण खरच सांगयच तर इथं कुठले बटाटे मिळणार.”
या सिंघणनं नदीवर जाऊन लहान बटाट्याच्या आकाराचे गोटे निवडून आणले आणि ते बटाटे म्हणून रस्यात टाकले. तूम्ही रस्सा खायची इच्छा व्यक्त केली म्हणून आम्हाला काहीतरी करावं लागलं.
त्यावर महाराज म्हणाल बघू तरी तुमचे ते बटाटे.
सिंघण या स्वयपाक्याने बटाटे म्हणून रस्यात घातलेले दगडी गोटे महाराजांना दाखवले. ते पाहून राग येण्याऐवजी महाराजांना आनंद झाला. आपल्या इच्छेसाठी काहीही करणारा आचारी पाहून महाराज आनंदित झाले पण या आनंदाची शिक्षा? म्हणून शाहू महाराजांनी सिंघणला नवीन टोपण नाव दिलं, ते नाव होतं.
बटाट्या.
हे ही वाच भिडू.
- भारतातील पहिला हॉमिओपॅथीचा सार्वजनिक दवाखाना शाहू महाराजांमुळे सुरू झाला.
- राजर्षी शाहूंचा पहिलवान विरुद्ध कोल्हापूरकरांचा पहिलवान.
- शाहू महाराजांचा लाडका देवाप्पा धनगर रुस्तम ए हिंदची गदा आणणार होता पण ;