बंडखोरी 2.0 : शिवसेना आमदारांनंतर खासदारही वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत

एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदारही बंडाच्या तयारीत असल्याचं  सांगितलं जातंय. राज्याबरोबर केंद्रातही भाजपबरोबर सत्ता स्थापन करावी यासाठी शिवसेनेचे १४ खासदार बंडाच्या तयारीत आहेत. 

द हिंदू वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, पुढील दोन दिवसात हे खासदार वेगळा गट म्हणून मान्यता द्यावी यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी करणार आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून सेना खासदारांची नाराजी पाहिली, तर दिसून येईल की बंडखोर आमदारांपेक्षा जास्त नाराज खासदार आहेत आणि याचा फटका शिवसेनेला बसेल असं बोलले जातंय. 

कल्याणमधून दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले आणि एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यापूर्वीच वडिलांच्या छावणीत दाखल झाले होते. बरं श्रीकांत शिंदेच नाहीतर तर आणखी असे खासदार आहेत जे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचं सांगण्यात येतंय. 

महाराष्ट्रात आमदारांपाठोपाठ आता खासदारही छावणी बदलण्याच्या तयारीत आहेत मात्र त्याचा थेट परिणाम काय होईल ?

तर महाराष्ट्रातील शिवसेनेतील फुटीचा लोकसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल.

महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनंतर आता पक्षाचे खासदारही दुफळी बदलण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे किमान १२ लोकसभा सदस्य भाजपच्या संपर्कात असल्यामुळे शिवसेनेतील फुटीचा थेट २०२४ च्या लोकसभेवर परिणाम होईल.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘मिशन ४८’ समोर ठेवलं आहे, तसेच फडणवीस कायमच म्हणत असतात की, येत्या २०२४ मध्ये ४८ पैकी ४० खासदार भाजपचे असतील, त्यामुळे सेनेचे भाजपच्या संपर्कात असणारे खासदार पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ जागांपैकी २३ जागांवर भाजप, १८ जागांवर शिवसेना, ५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला होता तर काँग्रेस व MIM एक-एक खासदार निवडून आलेला.

मात्र यातील फक्त शिवसेनेच्या जागा बघणं महत्वाचं आहे. कारण सेना खासदारांच्या बंडाळीचं कारण त्यांच्या मतदार संघात आहे.. 

२०१९ मध्ये शिवसेनेचे जे खासदार निवडून आलेत त्या खासदारांच्या मतदार संघात त्यांनी कुणाचा पराभव केला? थोडक्यात त्या निवडणुकीत त्या जागांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार कोणत्या पक्षांचे होते? त्यांना किती मतं मिळालीत. हे पाहिल्यास लक्षात येईल की, २०२४ मध्ये तिकीट वाटपाचा मुद्दा महाविकास आघाडीतल्या सेनेच्या खासदारांसाठी डोकेदुखी ठरू शकते. 

सेनेचे बऱ्यापैकी खासदार हे कॉंग्रेस किंव्हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना हरवून लोकसभेत पोहोचलेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात तिकीट मिळवण्यापासून ते जिंकून येण्यापर्यंतचा संघर्ष हा सेनेच्या खासदारांना करावा लागणार आहे . 

त्याचा सविस्तर आढावा घेऊया..

१) प्रतापराव जाधव

गेल्या २० वर्षांपासून शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेत. त्यांनी राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला. प्रतापराव जाधव यांना ५ लाख २१ हजार ९७७ मतं मिळाली तर राजेंद्र शिंगणे यांना ३ लाख ८८ हजार ६९० मत मिळवत ते दुसऱ्या क्रमांकावर होते. 

एकनाथ शिंदेंसहित सेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत दाखल झालेले तेंव्हा पक्षाने आमदारांप्रमाणेच शिवसेनेना खासदारांची बैठक बोलवली होती. त्यात प्रताप जाधवांची गैरहजेरी बरंच काही सांगून गेली.

२) कृपाल तुमाने

रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंह राव यांनी १९८४ आणि १९८९ असे दोन वेळेस लोकसभा निवडणुक लढवली होती आणि त्याच्या दुसऱ्या पर्वात ते पंतप्रधान झाले होते.  सुरुवातीपासूनच काँग्रेसचा गड राहिलेल्या रामटेकमध्ये बाळासाहेब ठाकरेंना विशेष रस होता. काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावला तो शिवसेनेच्या सुबोध मोहितेंनी.  १९९९, २००४ असे दोन वेळेस सुबोध मोहिते निवडून आलेले. 

२००९ चा उपवाद सोडता पुन्हा शिवसेनेने रामटेक ताब्यात घेतलं, २०१४, २०१९ असे सलग दोन वेळेस शिवसेनेचे कृपाल तुमाने निवडून आलेत. त्यांना ५ लाख ९७ हजार १२६ मतं मिळाली तर ४ लाख ७० हजार ३४३ मतं घेत कॉंग्रेसचे किशोर गजभिये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत.  

३) भावना गवळी

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेच्या भावना गवळी ५ लाख ४२ हजार ९८ मतांनी विजय मिळवला तर ४ लाख २४ हजार १५९ मतं घेत कॉंग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत.  

यवतमाळ-वाशिम लोकसभा  मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. १९९९, २००४, २००९, २०१४,२०१९ असं सलग ५ वेळेस भावना गवळी या शिवसेनेच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

त्यांना ईडीने आत्तापर्यंत ३ वेळा चौकशीसाठी बोलावलंय. शिंदे गटाने बंड केलं तेंव्हा भावना गवळी यांनी, बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ २२ जून ला उद्धव ठाकरेंना पत्र लिहून, “बंडखोर आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती केली होती. त्यामुळे त्या शिवसेना नेतृत्वावर नाराज असल्याचं दिसून येतं. कारण एकनाथ शिंदेंच्या बंडादरम्यान पक्षाने बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला भावना गवळींनी दांडी मारली होती. त्यानंतर भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटविण्यात आले.

४) हेमंत पाटील. 

हिंगोलीमधून ५ लाख ८६ हजार ३१२ मतं घेत शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील विजयी झालेले. तर कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे ३ लाख ८ हजार ४५६ मतं घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत.

हिंगोलीतून २०१४ साली सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेच्या तिकिटावरून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र तेंव्हा काँग्रेसचे राजीव सातव यांनी वानखेडेंचा १,६३२ मतांनी पराभव केलेला. तेच सुभाष वानखेडे २०१९ ला काँग्रेसच्या तिकिटावरून उभे होते तेंव्हा त्यांचा पराभव शिवसेनेच्या हेमंत पाटलांनी केलेला. 

कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील डिसेंबर २०२१ मध्ये नांदेड येथे बोलताना असं म्हणाले होते की,  

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचा ‘वापर करून’ घेतला जात असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांच्या कानावर काही बाबी घातल्या आहेत.” यावरून नाराज खासदारांच्या यादीत हेमंत पाटलांचाही समावेश आहे असं दिसून येतं. 

५) संजय जाधव.

शिवसेनेचा पारंपरिकरीत्या बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात २०१९ ची लोकसभा निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळाली. सरतेशेवटी शिवसेनेच्या संजय जाधव यांनी विजय खेचून आणला. संजय जाधव यांनी ५ लाख ३८ हजार ९४१ मते घेत विजय मिळवला तर ४ लाख ९६ हजार ७४२ मते घेत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर दुसऱ्या क्रमांकावर होते.

परभणीच्या मतदारांचं दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी श्रद्धा आहे हे गेली ३० वर्षांपासून दिसून येतं. गेल्या ३० वर्षांत फक्त एक अपवाद वगळला तर इथे शिवसेनेचीच सत्ता आहे.

पण गेल्या काही काळात असं दिसून आलं की एक टर्म संपली की इथले खासदार शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करतात. 

तुकाराम रेंगे पाटील आणि गणेश दुधगावकर हे त्याची उदाहरणं म्हणता येतील. मात्र यावेळेस निवडून आलेले संजय जाधव तरी शिवसेनेत टिकतील का हा प्रश्न आहे कारण-

महाविकास आघाडीत नाराज असलेल्या यादीत संजय जाधवांचा नंबर लागतो.  ऑगस्ट २०२१ मध्ये परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात वाद झाला होता, तेव्हा खासदार संजय जाधव यांनी वक्तव्य केलं होतं की, “वेळ आल्यावर माकडीनही आपल्या पिल्लांना पायाखाली घालते, एकदिवस आम्ही ही राष्ट्रवादीला पायाखाली घालू.” असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला डिवचले होते. 

६) हेमंत गोडसे

नाशिक लोकसभा मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही असा इतिहास आहे. मात्र हेमंत गोडसे यांनी तो इतिहास खोडून काढत २०१४ आणि २०१९ असा सलग विजय मिळवला आहे.

हेमंत गोडसे मनसेत होते तेंव्हा २००९ मध्ये छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळांनी गोडसेंचा पराभव केलेला. २०१४ मध्ये गोडसे शिवसेनेत आले अन त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला.

२०१९ मध्ये गोडसेंची लढत पुन्हा समीर भुजबळ यांच्यासोबत होती, त्या लढतीत हेमंत गोडसे यांनी ५ लाख ६३ हजार ५९९ मतं मिळवत विजय मिळवला होता तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ हे होते. त्यांनी २ लाख ७१ हजार ३९५ मतं मिळवली होती. 

मात्र महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतरही गोडसे विरुद्ध भुजबळ संघर्ष धुसफुसत होता. 

 ७) राजेंद्र गावित.

पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित यांनी आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा ८८ हजार ८८३ मतांनी पराभव केलेला. राजेंद्र गावित यांना ५ लाख ८० हजार ४७९ मतं मिळवलीत तर बळीराम जाधव  यांना ४ लाख ९१ हजार ५९६ मतं मिळालेली. 

पालघर भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असून, अनेक वर्षांपासून पालघर लोकसभेची जागा भाजप पारंपारिक लढवत. मात्र २०१९ ला उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा शिवसेनाच लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे भाजप-सेना युतीत पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. 

या जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडने पूर्ण ताकदीनिशी हि जागा लढवली होती. मात्र इकडे युतीतील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. 

एकनाथ शिंदेंच्या बंडादरम्यान पक्षाने आमदारांप्रमाणेच शिवसेनेना खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला चार खासदार अनुपस्थित होते. त्यातले एक म्हणजे राजेंद्र गावित. बैठकीला उपस्थित न राहण्याचं कारण म्हणजे त्यांची नाराजी असणार अशी चर्चा आहे.

८) श्रीकांत शिंदे –

खासदार श्रीकांत शिंदे म्हणजेच एकनाथ शिंदेंचे सुपुत्र. कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांनी ५ लाख ५९ हजार ७२३ मतं मिळवत विजय मिळवला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील आहेत त्यांना २ लाख १५ हजार ३८० इतकी मते मिळालेली. 

महाविकास आघाडीतील नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. 

ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम आहे. त्या-त्या ठिकाणी शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे”

असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेला शिवाय सेनेच्या आमदारांसोबत निधीवाटपात भेदभाव होत असल्याचा मुद्दा देखील ते वारंवार दाखवून देत होते.

शिंदेंच्या बंडाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं खासदारांना तातडीनं मुंबईत बोलावलं होतं त्यावेळी सर्वात पहिले नॉट रिचेबल राहणारे खासदार श्रीकांत शिंदेच होते. त्यादरम्यान ते दिल्लीत होते. तर त्यानंतर ते गुवाहाटीत बंडखोर आमदारांच्या सोबत रॅडिसन हॉटेल मध्ये वास्तव्यास असल्याचं समोर आलेलं. तेथील सर्व नियोजन तेच पाहत असल्याची देखील माहिती मिळालेली.

९) राजन विचारे

शिवसेनेसाठी महत्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे ठाणे. ठाण्यातून २०१४ आणि २०१९ असे सलग दोन वेळेस राजन विचारे खासदार म्हणून निवडून आलेत. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांचा पराभव केलेला तर २०१९ मध्ये राष्ट्रवादीने आनंद परांजपे यांना उतरवलेलं. 

दोन्ही वेळेस विचारे यांनी सेनेचा गड राखलेला. राजन विचारे यांना ७ लाख ४० हजार ६९ मते घेतलेली. तर दुसऱ्या क्रमांकावर तर आनंद परांजपे यांना ३ लाख २८ हजार ८२४ मते मिळाली होती. 

ही निवडणूक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. त्यांच्याच मेहनतीने राजन विचारे यांना खासदारकी मिळाल्याचं म्हणण्यात येतं. आणि दुसरं म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुखांनी एकनाथ शिंदेंच्या बंडादरम्यान पक्षाने  खासदारांची बैठक बोलवलेली. या बैठकीला राजन विचारे अनुपस्थित होते.

१०) गजानन कीर्तिकर.

बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आणि आजही शिवसेनेत असणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये गजानन किर्तीकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ४ वेळेस सलग आमदारकी, मंत्रिपदे मिळवत त्यांनी लोकसभेत एंट्री मारली. २०१४ ला काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा पराभव करुन वायव्य मुंबई मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.  

तर २०१९ मध्ये ५ लाख ७० हजार ६३ मतं घेत कॉंग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा पराभव केलेला. संजय निरुपम यांना ३ लाख ९७ हजार ७३५ मतं मिळालेली.

महाविकास आघाडीच्या काळात आमदारांच्या निधीवाटपाच्या मुद्दयावरून त्यांनी, “राज्यात ठाकरे सरकार आहे, असं आम्ही म्हणतोय मात्र प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं.

११) राहुल शेवाळे.

शिवसेनेच्या मुंबईतील खासदारांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे राहुल शेवाळे. २०१४ सालच्या मोदी लाटेत राहुल शेवाळे पहिल्यांदा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. 

त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत राहुल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाडांचा पराभव केला. शेवाळे यांना ४ लाख २४ हजार ९१३ मते मिळालेली तर दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड होते त्यांना २ लाख ७२ हजार ७७४ मते मिळालेली. 

१२) अरविंद सावंत.

सेनेत बंडाळी चालू असतानाच काही खासदार आपण अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत असं  सांगतायेत. त्या खासदारांमध्ये अरविंद सावंतांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईचे खासदार सावंत यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४ लाख २१ हजार ९३७ मते मिळवत काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. देवरा यांना ३ लाख २१ हजार ८७० मतं मिळाली होती. 

“शिवसेना ही आमदारांमुळे नाहीये तर शिवसेना ही शिवसैनिकांमुळे आहे. हा शिवसैनिक अजून जिवंत आहे आणि उद्धव ठाकरेंसोबत आहे, आम्ही सगळे खासदार मुख्यमंत्र्यांसोबत आहोत, आम्ही कुठेही जाणार नाही” असं त्यांनी अलीकडेच जाहीररीत्या सांगितलं आहे .

१३) श्रीरंग बारणे. 

मावळमधून श्रीरंग बारणे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ७ लाख २० हजार ६६३ मते घेत राष्ट्रवादीचे आणि शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव केलेला. पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५० मते मिळाली होती. नाराज खासदारांच्या यादीत त्यांचाही नंबर लागतो.

श्रीरंग बारणे मार्च २०२२ ला जालन्याच्या दौर्‍यावर गेले असताना, जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांना संबोधून असं बोलले होते की, “जालन्याचे राष्ट्रवादीचे पालकमंत्री शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कामं करत नाहीत. याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवणार आहे.” असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील अस्वस्थता दाखवून दिली होती. 

१४ ) सदाशिव लोखंडे

सदाशिव लोखंडे यांनी २०१९ च्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीत ४ लाख ८६ हजार ८२० मते मिळवून काँग्रेसच्या भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांचा पराभव केलेला. कांबळे यांना ३ लाख ६६ हजार ६२५ मते होती.

सदाशिव लोखंडे देखील महाविकास आघाडीच्या काळात नाराज होते.  मे २०२१ मध्ये निळवंडे डाव्या कालव्यावरील आढळा जलसेतूच्या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाहणी दौरा केला होता. 

तेंव्हा सदाशिव लोखंडे यांनी महाविकास आघाडीतल्या मोठ्या नेत्यांवर सडकून टीका केली होती कि,

“आमच्याच मतदारसंघात कामे होत असताना आम्हालाच निमंत्रण दिले जात नाही. आम्ही कोणतेही कार्यक्रम घेताना अधिकारी कोरोनाचे नियम पुढे करतात. मंत्र्यांच्या कार्यक्रमात मात्र कितीही गर्दी झाली, तरीही तेथे नियम कुठे जातात? त्यामुळे हा भेदभाव नको. आमदार, खासदार किंवा मंत्री असो, नियम सर्वांना सारखेच असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी भेदभाव करू नये. या प्रकाराची तातडीने चाैकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत” अशी उघड उघड टीका त्यांनी केलेली.

१५) ओमराजे निंबाळकर

उस्मानाबादच्या २०१९ लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केलेला.  निंबाळकरांना ५ लाख ९६न हजार ६४० मते मिळालेली तर जगजितसिंह पाटील यांना ४ लाख ६९ हजार ७४ मतं मिळालेली.

शिंदेंच्या बंडादरम्यान निंबाळकर शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती तेंव्हा माध्यमांना बोलतांना त्यांनी  अशी प्रतिक्रिया दिली कि, “मला उद्धव ठाकरे यांनी खूप प्रेम व सत्ता दिली. त्यामुळे अशा माणसाला संकट समयी सोडून जाणे कदापिही शक्य नाही. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचा एकही खासदार पक्ष सोडून जाणार नाही”, असे सांगत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली. 

१६) संजय मंडलिक

संजय मंडलिक हे कोल्हापूरचे खासदार. कोल्हापुरात सेनेची ताकद म्हणजे इथे ६ आमदार २ खासदार. होय.

कोल्हापुरात लोकसभेचे दोन मतदारसंघ येतात, एक कोल्हापुर आणि दुसरा हातकणंगले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेनेने विजय मिळवला.  कोल्हापूरमधून – संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने.

कोल्हापूरमधून ७ लाख ४९ हजार ८५ मतं मिळवत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिकांचा पराभव केला होता. त्यावेळेस धनंजय महाडिक यांना ४ लाख ७८ हजार ५१७ मते होती.

आता धैर्यशील माने यांच्याबद्दल बोलायचं तर, 

१७ ) धैर्यशील माने

हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांनी ५ लाख ८५ हजार ७७६ मते मिळवत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींचा पराभव केलेला. राजू शेट्टी यांना ४ लाख ८९ हजार ७३७ मते मिळाली होती.

धैर्यशील माने यांची सध्याची भूमिका म्हणजे, “सर्व खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत, ठाकरेंच्या भावना सर्व खासदारांनी ऐकून घेतल्या आहेत. आम्ही सर्व खासदार ठाकरेंसोबतच आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं.  

१८ ) विनायक राउत.

दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी २०१९ मध्ये देखील बाजी मारलेली.  त्यांनी १ लाख ७६ हजार ६९१ मताधिक्य घेत काँग्रेसचे नवीनचंद्र बांदीवडेकर आणि महाराष्ट्र स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे यांना धूळ चारलेली.

सद्याच्या परिस्थितीत त्यांचा शिवसेनेला खंबीर पाठिंबा असल्याचं म्हणलं जातंय, कारण या बंडाच्या दरम्यान राऊतांच म्हणणं होतं कि, “या बंडाचा शिवसेना संसदीय पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही. शिवसेनापक्षप्रमुखांच्या सूचनेनुसार १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहे“.  

ज्यावेळी उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडून चालले होते, त्यावेळी खासदार विनायक राऊत २२ जूनला रात्री वर्षा बंगल्याच्या बाहेर पत्रकारांशी बोलतांना म्हणालेले, “महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचं महत्व कायम राहणार आहे ते कधीही कोणीही पुसून टाकू शकत नाही, जे आज उद्धव साहेबांना सोडून गेलेत. त्यांना नक्कीच पश्चाताप होईल. आमच्या आमदारांना ज्यांनी फसवून नेलंय त्यांना धडा शिकवला जाईल”

तर होते विजयी खासदार ज्यांनी राष्ट्रवादी किंव्हा कॉंग्रेसच्या नेत्यांचा पराभव करत मतदारसंघात आपलं स्थान बळकट केलं. त्यामुळे ज्या उमेदवारांशी समेट करून घेणं म्हणजे आपल्या तिकीटाशी तडजोड करणं. त्यापेक्षा ही आघाडीच नको म्हणून हे खासदार पक्ष-प्रमुखांना मागणी करू करतील, याआधीही अशा घडामोडी आपण पाहिल्या आहेतच.

असो तर २०१९ मध्ये शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या त्यापैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. मग पराभूत झालेल्या त्या ५ जागा कोणत्या होत्या ? हे पाहावं लागेल म्हणजे लक्षात येईल कि येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हेच उमेदवार पुन्हा भरारी मारतील की नाही… 

१) चंद्रकांत खैरे

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला धक्का बसला तो चंदकांत खैरे यांच्या पराभवाने. 

२०१९ ला औरंगाबाद मधून इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केलेला. जलील यांना ३ लाख ८९ हजार ४२ मतं मिळालीत तर खैरेंना ३ लाख ८४ हजार ५५० मतं मिळालेली. यात ४ हजार ४९२ मतांचा फरक होता ज्यामुळे सेनेला ही पारंपरिक जागा हातची सोडावी लागली. मात्र पुढील निवडणुकीत खैरे सेनेचा गड पुन्हा जिंकून आणतील असं सांगितलं जातं.

२) आनंदराव अडसूळ

अमरावतीचा उल्लेख करणं आवश्यक ठरतं. अमरावतीमधून २०१९ ला नवनीत कौर -राणा ५ लाख १० हजार ९४७ मतांनी निवडून आल्या होत्या तर इथे ४ लाख ७३ हजार ९९६ मतं घेऊन शिवसेनेचे आनंदराव अडसूळ दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत. त्यांच्या मतांमधील फरक पहायचा झाल्यास ३६ हजार ९५१ मतांचा फरक आहे.

३) शिवाजीराव आढळराव पाटील

शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी पराभव केलेला . अमोल कोल्हे यांना ६ लाख ३५ हजार ८३० मते तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना ५ लाख ७७ हजार ३४७ मते मिळाली होती.

४) अनंत गीते 

ज्यांचा रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी पराभव केलेला. आणि पाचवे म्हणजे नरेंद्र पाटील जे  सातारा लोकसभा मतदार संघात हरले होते, राष्ट्रवादीच्या तिकिटावर उदयनराजे यांनी शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा पराभव केलेला.

असो तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर काही खासदारांनी उद्धव ठाकरेंना आपला पाठिंबा जाहीर केला असला, तरी महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांवरची त्यांची नाराजी लपून राहिलेली नव्हती. त्यामुळं त्यांनी बंड पुकारलं, तर आधीच अडचणीत असणाऱ्या शिवसेनेचा पाय आणखी खोलात जाऊ शकतो आणि हे संकट सेनेवर कधीही येऊन ठेपेल अशी दाट शक्यता वर्तवली जातेय.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.