अन् त्या क्षणापासून भावाभावांचा संसार सुरू झाला…

येत्या विधानसभा निवडणुकीत युती होणार हे काल निश्चित झाले. महाराष्ट्रातल्या युतीमध्ये कायम मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेने पहिल्यांदाच लहान भावाची भूमिका घेतली. तसं बघितल तर मागच्या विधानसभेवेळीच शिवसेनेवर हे दिवस आले होते पण तेव्हा त्यांनी युती मोडली. पण मोदी लाटेचा दणका बघता सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं म्हणत अपमान सहन करत पडती बाजू घेतली.

एक काळ असा होता की मातोश्रीवरून आदेश सुटायचे आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेत्यांची तारांबळ उडायची. शिवसेना भाजपचं तुझ नी माझ जमेना तुझ्या शिवाय करमेना अशी त्रांगडी अवस्था तेव्हासुद्धा होती आणि आता सुद्धा आहे.

मुख्य प्रश्न उरतो कायम बांधावरून भाऊबंदकी असल्याप्रमाणे भांडणारे हे दोन पक्ष युती म्हणून एकत्र कधी आले?

त्यासाठी खूप वर्ष पूर्वी जावे लागेल. साधारण १९६६ मध्ये मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी बेरोजगार तरुणांना एकत्र करून मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. खर तर या पक्षाला काँग्रेसच्या काही नेत्यांचा आतून पाठिंबा होता. मुंबईत वाढलेल्या कम्युनिस्ट कामगार चळवळीवर वचक राहावा यासाठी शिवसेना वाढेल याकडेच त्यांचे प्रयत्न असायचे.

सुरवातीपासून बाळासाहेबांनी उजव्या विचारसरणीचा थेट पुरस्कार केला होता. हिंदुत्व त्यांच्यासाठी तेव्हा अग्रक्रमाचा विषय नव्हता पण शिवरायांनी स्थापन केलेली हिंदूपदपातशाही आपण परत आणणार याचा पुनरुच्चार ते आपल्या भाषणातून करायचे. डाव्या संघटनाशी थेट भिडायचा आदेश त्यांनी आपल्या शिवसैनिकांना दिला होता. यानिमित्ताने उजव्या विचारसरणीच्या जनसंघ, हिंदू महासभा यांची शिवसेनेप्रती आपुलकी दिसून येऊ लागली.

युती या शब्दाचा पहिला उल्लेख बाळासाहेबांनी जून १९७० साली दैनिक मराठाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला.

झालं असं होत की संघाचे तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी एके ठिकाणी वक्तव्य केलं होतं की,

” बाळासाहेब ठाकरे हे जनसंघ व शिवसेना एकत्र यावी यासाठी मला भेटले होते.”

याच संदर्भाला धरून एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनाप्रमुख म्हणाले,

“गोळवलकर गुरुजी यांनी दिलेल्या मुलाखतीत तथ्य नाही. गुरुजी मुंबईत आले असताना त्यांनी प्रबोधनकारांची त्यांच्या आजारपणात भेट घेतली होती. मी दोन वर्षापूर्वी नागपूर येथे गेलो तेव्हा त्यांची सहज भेट घेतली होती. या भेटीत राजकीय “युती” चा उल्लेख नव्हता. आम्हा दोघांची सर्वसाधारण राजकीय परिस्थिती वर बोलणी झाली होती. युती व्हायची ती जाहीरपणे होईल. त्यात घाबरण्याचे कारण काय?”

इथून पहिल्यांदा युतीची चर्चा सुरु झाली. या मुलाखतीमध्ये सुद्धा कळेल की अगदी पहिल्यापासून बाळासाहेबांनी जनसंघावर(पूर्वाश्रमीचा भाजप) वजन ठेवूनच बोलणी चालू ठेवली होती.

याच वर्षी कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खूनानंतर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना उमेदवाराला  पाठिंबा दिला. ही निवडणूक जिंकून वामनराव महाडिकांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला आमदार विधानभवनात गेला. ही युती फारकाळ टिकली नाही.

पण पुढचा काळ शिवसेना आणि काँग्रेस यांच्या छुप्या युतीचाच होता. इंदिरा गांधींच्या आणीबाणीचे तर शिवसेनेने खुले समर्थन केले. तर जनसंघ आणीबाणी विरोधातल्या जनता पक्षात सहभागी झाला होता.

१९८२ च्या गिरणी संपात पहिल्यांदा कामगार मैदानात सभा घेऊन बाळासाहेबांनी आपण काँग्रेसबरोबरची मैत्री तोडत आहोत अशी घोषणा केली.

तो पर्यंत जनता सरकारचा प्रयोग फसला होता. जनसंघ त्यातून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली. पण इंदिरा गांधींच्या हत्येवेळी आलेल्या लाटेत या दोन्ही पक्षांची वाताहत झाली. पुढच्या विधानसभा निवडणुकीत दोघांनी एकमेकांची साथ सोडली.

बाळासाहेब म्हणाले,

“कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या!!”

या निवडणुकीपर्यंत दोन्ही पक्षांनी हिंदुत्व हा मुख्य मुद्दा केलाच नव्हता. पण वारंवार येणारा पराभव बघता जनतेची नस पकडण्यासाठी येत्या काळात याच मुद्द्याची कास धरावी लागेल हे त्यांनी ओळखल.

यात आघाडीवर होते लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन.

विश्वहिंदूपरिषदेने सर्वप्रथम रामजन्मभूमीचा प्रश्न हाती घेऊन हिंदुत्वाला देश पातळीवर नेले. पाठोपाठ १९८७ च्या विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीवेळी पहिल्यांदाच अधिकृतरीत्या शिवसेनेने हिंदुत्वाची शाल पांघरली. भाजप त्यांच्या विरुद्धच लढला. पण शिवसेनेने केलेल्या आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचारापुढे सगळेच विरोधक उडून गेले. शिवसेनेचा विजय झाला.

याच निवडणुकीनंतर प्रमोद महाजनांनी दिल्लीतल्या आपल्या श्रेष्ठींना महाराष्ट्रात शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मिळवलेले यश आणि त्यांच्याशी सहकार्य करून युती करण्याबद्दलचा मुद्दा समजवायला सुरवात केली. राज्यभर कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन शिवसेनेशी युती करायची की नाही हे प्रश्न थेट विचारले.

अखेर जून १९८९ मध्ये हिमाचलप्रदेश येथील पालमपूर येथे झालेल्या भाजपच्या चिंतन बैठकीत दोन महत्वाचे निर्णय झाले.

एक होता की विश्वहिंदू परिषदेच्या रामजन्मभूमीला पाठिंबा आणि महाराष्ट्रात शिवसेनेशी युती !!

ही बैठक ऐतिहासिक ठरली. या बैठकीमुळे भाजपचे जनता पक्षासारखे इतर मित्रपक्ष दुखावले पण त्यांच्या नेत्यांनी पर्वा केली नाही. त्यावर्षी झालेली लोकसभा निवडणुक युतीची अधिकृत पहिली मोठी निवडणुक ठरली. यावेळी भाजपचे खासदार २ वरून ८५ ला पोहचले. शिवसेनेला या निवडणुकीत मिळालेली मते काँग्रेसला भविष्यात डोकेदुखी करणार हे स्पष्ट दिसू लागले होते.

भावाभावाचा हा संसार सुरु झाला.

फक्त प्रमोद महाजन होते म्हणून युती शक्य झाली. त्यांचा सगळ्यांना घेऊन जाण्याचा समजूतदार स्वभाव, प्रसंगी एक पाऊल मागे घेण्याची धूर्त भूमिका यामुळे १९९५ साली युतीचा झेंडा विधानसभेवर फडकला. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री अशी वाटणी झाली. पुढे प्रत्येक निवडणुका अशाच लढल्या गेल्या. भांडणे झाली पण वितुष्ट आले नव्हते.

पण प्रमोद महाजन बाळासाहेब अशा जुन्या नेत्यांच्या निधनानंतर कुरबुरी वाढत गेल्या आणि आज अशी परिस्थिती आहे की एकमेकांसोबतचा संसार मोडून ही एकत्र याव लागलं आहे. फक्त लहान भाऊ मोठा भाऊ भूमिका चेंज झाल्या आहेत इतकच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.