आज जिथे दसरा मेळावा होणार, तो षण्मुखानंद हॉल सेनेच्या सर्वात मोठ्या शत्रूने उभारलाय..
शिवाजी पार्कवर भरणारा दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांचे स्फूर्तीस्थान. शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची तोफ याच शिवतीर्थाच्या मैदानावरून धडाडत असायची. इथूनच ऊर्जा घेऊन शिवसैनिक रस्त्यावरच्या लढाईला सज्ज व्हायचा.
शिवाजी पार्कवरचे दसरा मेळावे गाजले. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर देखील त्यात खंड पडला नाही. नवे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली. शिवसैनिक देखील अगदी भक्तिभावाने या दसरा मेळाव्याला हजेरी लावत राहिले.
गेल्यावर्षी मात्र कोरोनाच्या साथीमुळे हा दसरा मेळावा होऊ शकला नाही. या वर्षी दसरा मेळावा होणार पण तो शिवतीर्थावर घेता येणार नाही असे आदेश आले. अखेर कोरोना काळातले सर्व निर्बंध पाळून दसरा मेळावा साजरा करायचं ठरलं. नवी जागा ठरली सायन येथील षण्मुखानंद हॉल.
फक्त मुंबईतलाच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा सभागृह अशी ओळख असलेला हा हॉल. या हॉलचं नाव आहे षण्मुखानंद ! अन हॉल देखील अगदी नावासारखाच आहे. मंदिरासारखं त्याचं सजावट आणि बांधकाम करण्यात आलेले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या विविध नक्षी आणि सजावट या हॉलमध्ये करण्यात आली आहे. थोडक्यात हा हॉल जणू एक पुरातन काळातलं मंदिर असल्याचाच भास होतो.
पण या भव्य-दिव्य हॉलचा इतिहासही काहीसा रंजक आहे. कारण या हॉलमध्ये ज्या पक्षाचा म्हणजेच सेनेचा दसरा मेळावा झाला आहे त्याचं सेनेचे कट्टर विरोधकाने या हॉलची उभारणी केली आहे. म्हणजेच स.का. पाटील.
महाराष्ट्राचा इतिहास जाणून आहे कि, शिवसेना-बाळासाहेब ठाकरे आणि स.का.पाटील हे समीकरण कसं होतं. बाळासाहेब ठाकरे हे स.का.पाटील यांचे सर्वात मोठे विरोधक होते. हे दोन्ही नेते एकमेकांना जमेल तिथे टीका करण्यावाचून राहायचे नाही. आपल्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकात त्यांनी स.का.पाटील यांच्यावर बऱ्याचदा ताशेरे ओढायचे.
शिवसैनिक तर स.का.पाटील यांना ‘सद्या पाटील’ असं करायचे.
आत्ता उभी असलेली इमारतीच्या जागेचा ताबा १९५४ सालच्या ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. १९५४ ते १९५८ पर्यंत या ओपन ग्राउंडवरच मैफिली व वार्षिक सणांचे आयोजन होत होत असे. मग इथे एक भव्य इमारत व्हावी, ती सुशोभित असावी म्हणून अखेरीस २६ जानेवारी १९५८ रोजी या वास्तूसाठी भूमीपूजन केले.
आणि हे भूमिपूजन सदाशिव कानोजी पाटील यांनी केलं. म्हणजेच स.का.पाटील. पाटील हे त्यावेळी केंद्रात अन्न व कृषी मंत्री होते. त्यानंतर २ वर्षांनी म्हणजेच १९६० मध्ये या वस्तूचे बांधकाम चालू झालं. आय. एम. कद्री यांच्यासारख्या मातब्बर वास्तूविशारदाने वास्तूस्थापत्यात मोलाची साथ दिली व वास्तूरचनातज्ञ श्री. आर. एन. रायकर यांंनी त्यांना त्यात अमोलिक सहकार्य केलं. तर हि वास्तू पूर्ण झाली १९६३ मध्ये. या वास्तूचे उद्घाटन डॉ. विजयालक्ष्मी पंडीत यांच्या हस्ते झाले होते.
पण याच वास्तूची एक वाईट आठवण देखील आहे.
नव्याने चालू झालेल्या या इमारतीमध्ये १९९० मध्ये या वास्तूमध्ये एक मोठा अपघात घडला होता. नव्या कोऱ्या इमारतीत एका शाळेचा कार्यक्रम असतांना एका मुलाच्या हातून चुकून जळती मेणबत्ती पडली आणि इमारतीने अचानक पेट घेतला. जीवितहानी काही झाली नाही पण त्यात बराच नुकसान झालेलं.
हॉलमधील पुढच्या काही रांगेतल्या खुर्च्या तसेच, स्टेजचं बरंच नुकसान झालं. आग आटोक्यात आली. मालमत्तेची डागडुजी करण्यात आली आणि पुन्हा एकदा इमारतीचे रिनोवेशन करण्यात आले. आणि हि वास्तू मोठ्या दिमाखात उभी राहिली.
हे सभागृह इतकं मोठं आहे कि, येथील आसन क्षमता तब्बल ३०२० इतकी आहे. तसेच हे आशिया खंडातील सर्वात मोठंं सभागृह आहे असं मानलं जातं. सभागृहात एकूण ४ ग्रीन रूम्स असून त्यातील २ तळ मजल्यावर व २ पहिल्या मजल्यावर उपलब्ध आहेत.
हे हि वाच भिडू :
- प्रबोधनकारांच्या पुढाकारातून माहीम पार्कचं शिवाजी पार्क झालं.
- ममता दीदी तुम्ही किती पण नाकारा हिंदुत्वाची सुरवात बंगालमध्येच झालीय
- बाळासाहेबांची फार इच्छा होती की उद्धव ठाकरेंनी क्रिकेटर बनावं.