युद्धग्रस्त सीमेवरील सैनिकांपुढं दिलेल्या भाषणानं पुण्याचे गाडगीळ केंद्रात मंत्री झाले
बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ महाराष्ट्राला लाभलेले एक मुत्सद्दी आणि बुद्धिवंत राजकारणी. आपले वडील न.वि. गाडगीळ ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचा जनसेवेचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला. राज्यसभा व लोकसभेचे खासदार, प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी इंदीरा गांधी मंत्रीमंडळात संरक्षण उत्पादन मंत्री, राजीव गांधी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालय असा त्यांचा प्रवास होता. विशेषतः इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश व्हायचा.
इंदिराजींच्या स्वभावाचा एक विशेष पैलू होता त्यानं तो राजकारणात नेहमीच कामाला आला तो म्हणजे आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना योग्य ती पदं देण्याचा.
असाच एक प्रसंग घडला होता विठ्ठलराव गाडगीळ यांच्या बाबतीत. विठ्ठलरावांची बुद्धिमत्ता आणि पक्षाबद्दल निष्ठा पाहून इंदिराजींनी त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचं ठरवलं होतं. सुरवातीला त्यांनी विठ्ठलराव यांना पेट्रोलियम मंत्री म्हणून मंत्रिमंडळात संधी द्यायचं ठरवलं होतं. पण शपथविधी नंतरच्या पहिल्याच भेटीत इंदिराजींनी त्यांच्या मनात काही वेगळेच असल्याचे बोलून दाखवलं.
‘७१च्या युद्धानंतर पाकिस्तान बेचैन आहे. आपण जागृत असले पाहिजे. संरक्षण उत्पादनावर मी भर देणार आहे. म्हणून पेट्रोलियम ऐवजी संरक्षण उत्पादन खात्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत आहे’, असे इंदिराजींनी त्या बैठकीत विठ्ठलरावांना सांगितले.
पण विठ्ठलरावांना हि जबाबदारी देण्यामागं ही एक बॅकस्टोरी होती.
सप्टेंबरमधील तो पाकिस्तानचा पहिला विमान हल्ला होताच रात्रीच्या रात्रीच सर्व संबंधित लष्करी अधिकाऱ्यांची बैठक तर इंदिरा गांधींनी घेतलीच पण धोका पत्करून पुढील दोन-तीन दिवस आणि रात्री इंदिराजींनी सीमा भागाचा प्रत्यक्ष दौरा करत जवानांचे मनोबल वाढविले होते. त्याचबरोबर निवडक खासदारांवरही त्यांनी ही जबाबदारी सोपविली होती. अशाच एका ‘फॉरवर्ड पोस्ट’वर पाठवले होते विठ्ठलरावांना.
जवानांचा जोश वाढविणारे हिंदीतून छोटे भाषणही विठ्ठलरावांनी केले.
या भाषणाचा जो व्हायचा होता तो इफेक्ट झालाच होता. भाषणाच्या शेवटी, तुमचे काही म्हणणे आहे का,असे विठ्ठलरावांना विचारताच दोन जवान उठले व हिंदीतून म्हणाले की, आम्ही शहीद झालो तरी चालेल, पण एकदा का ‘आगे बढो’चा आदेश दिल्यावर ‘पिछे मुड’चा आदेश आम्हाला देऊ नका, असे तुम्ही इंदिराजींना जाऊन सांगा.
हे वाक्य संपत नाही तोवर सर्व जवानांनी हात वर केले व सर्वांच्या मुखातून संपूर्ण परिसर दणाणून सोडणारा एकच नारा आला – हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय!
या फॉरवर्ड पोस्टवर मलाच का इंदिराजींनी पाठविले, या दोन दिवस विठ्ठलरावांना भेडसावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर त्या घोषणांतून मिळाले होते. कारण लढाईच्या तयारीला लागलेले त्या फॉरवर्ड पोस्टवरील बहुतांशी जवान हे सातारा-सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातले होते.
हे ही वाच भिडू :
- गाडगीळांनी रुसून राजीनामा दिला, पंतप्रधानांनी आयडिया करून त्यांना परत आणलं.
- आपला वैमानिक मुलगा शहीद झाल्यानंतर पुण्याच्या गाडगीळांनी जे केलं ते वाचण्यासारखं आहे.
- शेतकऱ्यांच्या ज्वारीला भाव मिळावा म्हणून या नेत्यांनी शिखर बँकेला देखील झुकवलं होतं