स्तन झाकण्यासाठी कर लावणाऱ्या राज्यावर दलित महिलेने आपले स्तन कापून फेकले !
पद्मनाभ मंदिरातील एक लाख कोटी सोन्याच्या दागिन्यांचा हक्क त्रावणकोर राजाच्या वंशजांना मिळाला हे तुम्हाला माहीत असेल. पण त्याच महान राज्यातल्या नांगेली नावाच्या बाईचं नाव आपल्याला माहीत असायचा संबंध नाही.
काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने पाठ्यपुस्तकातील तिचा इतिहास सुद्धा पुसून टाकला.
पण दलित आणि बहुजन लोकांना किती बेसिक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला होता त्याचे प्रतीक म्हणजे नांगेली होय. आजपासून दीडशे वर्षांपूर्वी घडलेली ही घटना भारताच्या इतिहासात कायमची कोरली गेलेली आहे.
भारताच्या दक्षिणेकडील ह्या संस्थानात सुबत्ता आणि समृद्धी होती. वर्मा या ब्राह्मण राजांनी ह्या प्रदेशात मोठी कामे केली. मात्र त्यांनी दलितांवर केलेल्या अत्याचाराची कहाणी दुर्लक्षित आहे.
दक्षिणेत जाती उत्तर भारतात आहेत तितक्या खानेसुमारीबाज नव्हत्या पण राजांनी आपल्या स्वार्थासाठी त्यात वेगवेगळ्या तरतुदी केल्या.
१९ व्या शतकात केलेलं असंच काम म्हणजे हा स्तनांवरचा कर.
त्याशिवाय त्यांच्या स्तनांच्या आकारावरून हा कर किती असावा हे ठरवले जाई, असेही आपल्या प्रसिद्ध प्रबंधात काही संशोधकांनी लिहिलं आहे. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार सर्वच खालच्या जातीच्या स्त्रियांकडून हा कर आकारला जात असे. ह्या राजाने पुरुषांच्या मिशिवर, दागिने घालण्यावर आणि पाण्यावरही कर लावला होता. (प्रचंड संपत्तीचे रहस्य कडकडीत आता उलगडलं असेल.)
मूलकरम नावाच्या ह्या करांत फक्त दलित समाजातील व प्रामुख्याने एळव्हा जातीच्या स्त्रियांना आपले स्तन झाकायला कापड वापरले तर कर भरावा लागे.
डॉ. शिबा के. एम. यांनी ह्यावर सखोल अभ्यास व संशोधन करून हा विषय जनतेसमोर आणण्यास मोलाचा हातभार लावला आहे.
त्यांच्या मते ह्या कराचा उदेश पारंपरिक जातीव्यवस्था टिकवून ठेवणे आणि शेतमजूर म्हणून काम करत असल्याचे दलित महिलांना दडपून टाकणे इतकाच होता. फार कमी महिला हा कर भरू शकत. उच्चवर्णीय महिलांना देखील देवासमोर आपल्या छातीवरील कापड काढावे लागत असे मात्र इतर महिलांना मात्र राजरोसपणे असेच फिरावे लागे.
याविरुद्ध पहिला संघर्ष करणारी महिला होती नांगेली.
१९८०३ साली तिने या कायद्याला न जुमानता आपले स्तन झाकायला सुरुवात केली. हे समजताच गावचा कारभारी ज्याला मल्याळम मध्ये प्रवतियार म्हंटले जाई, नांगेली कडे आला व त्याने कर भरण्यासाठी सक्ती केली. ह्यावर तिने आपला निषेध नोंदवला.
जबरदस्ती करणाऱ्या अधिकाऱ्याला धडा शिकवावा म्हणून तिने आपले स्तन कापून ह्या अधिकाऱ्यावर फेकले व राज्याला शाप दिला.
दुसऱ्या एका कथेनुसार तिने केळीच्या पानात आपले स्तन कापून अधिकाऱ्याजवळ दिले. थोड्याच वेळात अतिरक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला. तिच्याबरोबर तिचा पती चिरुकंदन यानेही चितेत झेप घेतली.
त्याची नोंदही इतिहासात पहिला “पुरुष सती” म्हणून झालेली आहे.
ही बातमी समजताच राजाने जनतेवरचा हा कर माघारी घेतला. आपल्यासह सर्व समाजातील स्त्रियांना स्वतंत्रपणे जगता यावे म्हणून नांगेलीने ही लढाई लढली. ह्याने अनेक लढ्यात लोकांना प्रेरणा दिली.
पुढे 1946 साली केरळमध्ये कम्युनिस्टांच्या सेनेने राजाविरुद्ध लढा देऊन केरळमध्ये आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्यामुळे त्रावनकोरच्या राजाचा स्वतःचा वेगळा देश बनवण्याचा प्लॅन फसला आणि हे राज्य 1949 साली भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले.
म्हणूनच हा भाग अभ्यासक्रमातुन काढल्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
२०१९ साली आलेल्या आदई या तमिळ चित्रपटात देखील ही कथा सांगितली आहे. या घटनेनंतर तुला जागेचे नावही मुलच्छीपुरम किंवा मुलाचीपुरंबु अर्थात ‘स्तनाचे स्थान’ ठेवले गेले. आज येथे राहणारे लोक मात्र ह्या जागेचे नाव मनोरमा जंक्शन असे सांगतात.
हे ही वाच भिडू
- दलित समाजातून आलेला हा मुलगा भारतासाठी १०० विकेट्स घेणारा पहिला वेगवान बॉलर ठरला !
- मराठी साहित्यविश्वात दलित साहित्याला पायवाट निर्माण करून देणारा लेखक !
- हंगेरी देशातील रोमानी लोकांना बाबासाहेब का आपलेसे वाटतात ?