स्वामींच्या आडमुठेपणामुळे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी २ दिवस चालला होता…

सुब्रमण्यम स्वामी यांना भारताच्या राजकारणात सगळे जण घाबरतात. कधी सोनिया गांधी यांना बारगर्ल तर कधी राहुल गांधी यांना बुध्धु म्हणणार तर कधी थेट अटलबिहारी वाजपेयी यांना आडव्या हाताखाली घेतात.

त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते जेष्ठ अर्थतज्ञ आहेत. त्यामुळे अर्थशास्त्रात डॉक्टर असलेल्या स्वामींच्या रडारवर अगदी मनमोहनसिंगांपासून ते आजच्या सीतारामणपर्यंतचे सगळे अर्थमंत्री असतात. आजच्या राजकारणात देखील थेट नरेंद्र मोदींना आर्थिक धोरणावरून शिव्या घालण्याचं धाडस फक्त सुब्रमण्यम स्वामीच करतात.

इतकचं नाही तर स्वामींच्या दाव्यानुसार मनमोहनसिंगांनी १९९१ सालचं जे जागतिकीकरणाचे बजेट मांडलं होत ते त्यांचचं कॉपी केलं होतं. जे काही असेल ते मात्र स्वामींचं भारताच्या राजकारणात वजन आहे हि गोष्ट नाकारून चालणार नाही.

मात्र याच जेष्ठ अर्थतज्ञामुळे एकदा देशाच्या पंतप्रधानांचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी २ दिवस चालला होता. 

त्याचं झालं असं होतं कि, बोफोर्सचे आरोप करून सत्तेत आलेल्या व्ही.पी.सिंग यांचा पाठिंबा भाजपने काढून घेतला. त्यानंतर वर्षभरात कोसळलेल्या जनता सरकारनंतर पुन्हा निवडणुका घेणे देशाला परवडणारे नव्हते. संसदेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. अखेर राजीव गांधींनी चंद्रशेखर पंतप्रधान होणार असतील तर नव्या सरकारला काँग्रेसतर्फे बाहेरून पाठिंबा देऊ असं सांगितलं.

१० नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पण त्यादिवशी त्यांनी एकट्यांनीच शपथ घेतली होती. तर त्यांच्या संपूर्ण कॅबिनेटने दुसऱ्या दिवशी शपथ घेतली. देशाच्या इतिहासात हि पहिलीच वेळ होती, जेव्हा पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सलग २ दिवस चालला होता.

यामागचं सगळ्यात मोठं कारण सुब्रह्मण्यम स्वामींची आडमुठी भूमिका.

त्या सरकारमध्ये अर्थमंत्री झालेले यशवंत सिन्हा आपल्या आत्मचरित्रात सांगतात,

हा शपथविधी सोहळा २ दिवस चालला होता. कारण पंतप्रधानांचा शपथविधी झाला तरी त्या दिवसापर्यंत कॅबिनेटमधील खातेवाटपाची यादी अंतिम होऊ शकली नव्हती. सुब्रम्हण्यम स्वामी अर्थमंत्री होण्यासाठी अडून बसले होते. तर संभाव्य मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा मात्र स्वामींना अर्थमंत्रालय देण्यास विरोध होता.

अखेरीस स्वामींची मनधरणी करत त्यांना वाणिज्य आणि न्याय अशा दोन मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली.

यशवंत सिन्हा सांगतात, माझी प्राथमिकता परराष्ट्र मंत्रालयाला होती, पण चंद्रशेखर यांचं मत होतं की मी अर्थमंत्रालय सांभाळावं. त्यामुळे परराष्ट्र मंत्री पद व्ही. सी शुक्ला यांना गेलं आणि स्वामींच्या जागी मी अर्थमंत्री झालो.

स्वामींच्या या आडमुठेपणामागे होती त्यांची आपण अर्थतज्ञ व्हावं हि अनेक दिवसांपासूनची असलेली इच्छा.

स्वामी यांच्या दाव्यानुसार १९७७ मध्ये मोरारजी देसाई त्यांना आपल्या कॅबिनेटमध्ये घेणार होते आणि अर्थ राज्यमंत्री पदाची जबाबदारी देणार होते. पण त्यावेळचे परराष्ट्र मंत्री असलेले अटल बिहारी वाजपेयींच्या ती मुळे हुकली. तेव्हापासून दोघांच्यात कधी विस्तव देखील गेला नाही. पुढे २० वर्षानंतर तामिळ साप्ताहिकेमध्ये स्वामींनी वाजपेयींना अस्सल बेवडा म्हणून हिणवलं होतं.

चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री होण्याची त्यांना मिळालेली हि दुसरी संधी होती. मात्र ती हुकत चालली संधी बघून ते काहीसे हताश होतं होते. स्वामी सांगतात त्यांना त्यानंतर नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात देखील त्यांना अर्थमंत्री होण्याची संधी आली होती. मात्र ती देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागेल त्यामुळे त्यांनी ती सोडली होती.

पुढे देखील १९९८ साली स्वामींच्या दाव्यानुसार त्यांना अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी मला अर्थमंत्री होण्याचा शब्द दिला होता. पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्षात जयललितांचा पाठिंबा मिळाल्यानंतर ते आपल्या शब्दापासून मागे हटले.

त्यानंतर २०१४ साली जनता पक्ष भाजपमध्ये विलीन केल्यानंतर त्यांना आशा होती कि मोदी मंत्रिमंडळात तरी अर्थमंत्री बनण्याची संधी मिळेल. पण त्यावेळी हे खात अरुण जेटली यांच्याकडे गेलं होतं. त्यामुळे मागच्या ४५ वर्षांपासून त्यांचं अर्थमंत्री बनण्याचं स्वप्न आजतागायत अपूर्ण राहिले आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.