सुरेश कलमाडी यांनी दहशतवाद्यांवर विमानातून बॉम्बहल्ला केला होता.

भारताचा ईशान्य भाग कायम असंतोषामुळे धगधगता राहिला आहे. यापूर्वी आपण बोल भिडूवर नागालँड, आसामसिक्कीमचा संघर्ष पाहिला, आज आपण मिझोरामची कहाणी जाणणार आहोत.

मिझोराम हा निसर्गसुंदर टेकड्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. या छोट्याशा राज्याची खूप कमी आहे पण या राज्याला बांगलादेश व म्यानमार या दोन देशांची सीमा जोडली असल्यामुळे भारतासाठी अतिमहत्वाचे आहे.

मिझो लोकांची भूमी म्हणजे मिझोराम.

मूळ मंगोल वंशाचे हे लोक प्राचीन काळी ब्रह्मदेशाच्या शान प्रांतात स्थायिक झाले. त्यांच्यापैकी लुशाई आणि हमार या दोन टोळ्या पहिल्यांदा भारतात आल्या व लुशाई टेकड्यांच्या परिसरात त्यांनी वस्ती केली.

ब्रिटिशांच्या राजवटीत हे लोक वारंवार हल्ले करीत. हा उपद्रव थांबविण्यासाठी ब्रिटिश सैन्याने मिझो प्रदेशात प्रवेश केला व १८९१ मध्ये तो प्रदेश ब्रिटिश हिंदुस्थानात समाविष्ट करण्यात आला. लुशाई हिल्स डिस्ट्रिक्ट या नावाने आसामचा तो एक भाग बनला.

स्वातंत्र्य मिळल्यावरही या मिझोराम हा आसाम राज्याचा जिल्हा म्हणून राहिला.

मिझो लोकांच्या विकासाकडे तत्कालीन प्रांतिक सरकारने पुरेसे लक्ष न दिल्यामुळे या लोकांतील असंतोष वाढत गेला.

शेजारच्या पूर्व पाकिस्तानमधून येणारे निर्वासितांचे लोंढे यांना देखील आवर घालण्यात आसाम सरकार कमी पडत होते.

त्यांतच वारंवार होणाऱ्या भीषण दुष्काळाची भर पडली.

मिझो तरुणांनी दुष्काळ निधी न देणाऱ्या आसाम सरकारच्या विरोधात शस्त्रे उचलली.

१९६६ मध्ये ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या संघटनेतर्फे सशस्त्र उठाव करण्यात आला.

एकेकाळी भारतीय लष्करात हवालदार असणाऱ्या व आता सरकारी नोकरीत असणाऱ्या लालडेंगाने या लढ्याचे नेतृत्व केलं होतं.

त्याने गेल्या काही वर्षात त्याने हजारो तरुणांची फळी उभारण्यास सुरवात केली होती. पाकिस्तान चीन व अमेरिकेची त्याला फूस होती.

याबद्दल लालडेंगाला काही वर्षांपूर्वी अटक देखील झाली होती.

पण गेल्या काही वर्षात १९६२ साली झालेले चीनचे युद्ध व १९६५ सालचे पाकिस्तान युद्ध या दरम्यान देशांतर्गत यादवी माजत आहे याकडे सरकारचे थोडेफार दुर्लक्ष झाले होते, याचा मोठा फटका बसला होता.

२८ फेब्रुवारी १९६६ रोजी मिझो नॅशनल फ्रंट च्या तरुणांनी तिथल्या मोठ्या शहरांवर हल्ला केला. काही दिवसातच मिझोराममधले शासकीय कार्यालये त्यांनी ताब्यात घेतले होते.

ऐझवालमध्ये असलेल्या आसाम रायफल या बटालियनच्या हेडक्वार्टर्सला त्यांनी वेढा घातला.

लालडेंगाने ऐझवालमधून तिरंगा हटवला व मिझोराम हा स्वतंत्र देश जाहीर केले.

लालडेंगाने मोठी चूक केली. कारण त्यावेळी पंतप्रधानपदी इंदिरा गांधी होत्या. कोणत्याही फुटीरतावादी प्रकाराला त्या भीक घालणाऱ्या नव्हत्या. त्यांनी मिझोराममध्ये लष्करी कारवाईचे आदेश दिले.

२ मार्च रोजी आसाममध्ये AFSA हा कायदा लागू करण्यात आला. ३मार्च रोजी ऐझवालमध्ये २४ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली.

गृहमंत्री गुलझारीलाल नंदा दहशतवाद्यांना शरण या अथवा कठोर कारवाई करणार असल्याचे रेडिओ वर सांगत होते.

आसाम रायफल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू होती. त्यांच्या इमारतीमध्ये अनेक महत्वाच्या व्यक्ती व सरकारी अधिकाऱ्यांनी आश्रय घेतला होता.

भारतीय लष्कराकडून हेलिकॉप्टरमधून रसद पूरवली जात होती पण ती किती वेळ पुरेल हा प्रश्नच होता.

लालडेंगाचे प्रयत्न सुरू होते की कमीतकमी ४८ तास ऐझवालवर एमएनएफचा झेंडा फडकत राहिला तर पाकिस्तानच्या मदतीने संयुक्त राष्ट्रात हा प्रश्न नेता येईल व मिझोराम वेगळे राष्ट्र आहे यावर शिक्कामोर्तब होईल.

पण त्याच्या आधी ४ मार्च रोजी म्हणजे बंडाच्या तिसऱ्या दिवशी इंदिरा गांधींनी चर्चेतून मार्ग सुटत नसल्यामुळे हवाई दलाला कारवाईचे आदेश दिले.

भारतीय वायू दलाच्या सर्वोत्कृष्ट तुफानी व हंटर या लढाऊ विमानांनी ऐझवालवर हल्ला चढवला.

पहिल्या दिवशी या विमानांनी मशिनगणच्या साह्याने जमीन भाजून काढली. दुसऱ्या दिवशी आणखी मोठी कारवाई झाली ज्यात जवळपास ५ तास विमानातून बॉम्बफेक करण्यात आली.

भारतीय वायूदलाच्या इतिहासात आपल्याच देशाच्या भूमीवर करण्यात आलेला हा पहिला व एकमेव एयरस्ट्राईक होता.

फुटीरतावाद्यानी इंदिरा गांधींनी सर्वसामान्य नागरिकांची काळजी न करता हल्ला केला याबद्दल टीका केली पण वायुदलाने ऐझवालमधली परिस्थिती काबूत आणली.

लालडेंगा यांचे बंड मोडून काढले, पुढे मिझो ला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

या एयरस्ट्राईक सहभागी झालेल्या वैमानिकांमध्ये दोन तरुणांचा समावेश होता. त्यांचं नाव सुरेश कलमाडी व राजेश पायलट.

08996
स्क्वाड्रन लीडर सुरेश कलमाडी

या दोघांनीही या व अशा अनेक युद्धात आपला पराक्रम दाखवला व फ्लाईट लेफ्टनंट म्हणून निवृत्त झाले. राजकारणात प्रवेश केला व मंत्री झाले.

इकडे मिझोराम मध्ये जवळपास २० वर्षे लालडेंगा यांनी काही ना काही प्रकारे असंतोष पेटवत ठेवला होता.

यांतच भर म्हणून चकमा व मिझो या दोन जमातींतील संघर्षाला तोंड फुटले. तथापि भारताच्या ईशान्य सीमेवरील व मोक्याच्या व महत्त्वाच्या प्रदेशात राजकीय स्थैर्य व शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजीव गांधी पंतप्रधान बनल्यावर पुढाकार घेतला व फुटीरतावादयांशी करार केला.

या करारानुसार १९८७ सालापासून मिझोराम भारतातील २३ राज्य बनले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.