एक काळ होता पुणे महापालिकेत कलमाडींच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची कोणात हिंमत नव्हती
काँग्रेस नेते सुरेश कलमाडी हे दहा वर्षानंतर शुक्रवारी पुणे महापालिकेत आले होते. कधी काळी याच महापालिकेत सबसे बडा खिलाडी सुरेश भाई कलमाडी अशा घोषणा ऐकायला मिळायच्या. त्यांना रोखण्यासाठी पुणे पॅटर्न राबविण्यात आला होता.
यात राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना आणि भाजपला सोबत घ्यावं लागलं होत. मात्र, हा पॅटर्न जास्त काळ चालला नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कलमाडी यांची घरी जाऊन भेट घेतली होती. परत पुण्यात अशा प्रकारचा पॅटर्न होणार नसल्याचे सांगावे लागले होते.
कधी काळी भारतीय हवाई दलाचे पायलट राहिलेले सुरेश कलमाडी इतके महत्वाचे नेते कसे झाले.
१९७४ मध्ये कलमाडी यांनी हवाई दलातून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आणि निळूभाऊ लिमये यांच्याकडून पूना हॉफी हाऊस चालवायला घेतले. लिमये हे पुण्यातील राजकारणातील मोठं नाव होत. लिमये यांच्या मालकीचे पूनम हॉटेल सुद्धा होते. हे हॉटेल त्याकाळात राजकारण्यांचा अड्डा होता.
मंत्र्यांपासून ते नगरसेवक, कार्यकर्ते यांच्या गप्पांचा फड रंगत असायचा. सुरेश कलमाडी यांनी पूना कॉफी हाऊस चालवायला घेतल्यानंतर पूनम हॉटेल ऐवजी राजकारणी पूना हाऊस मध्ये जमू लागले. त्यांना राजकारणात येण्याची खरी संधी इथूनच मिळाली.
मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा यांची ओळख कलमाडीशी इथंच ओळख. चुडासामा हे एक एनजीओ चालवत होते. कलमाडी हे त्यात सहभागी झाले. चुडासामा यांच्या माध्यमातून ते शरद पवारांना भेटले.
यानंतर कलमाडी हे पवारांच्या अधिक जवळ गेले. कलमाडी यांची उत्साह आणि काम करण्याची तयारी पाहून शरद पवार यांनी १९७७ मध्ये कलमाडी यांची पुणे युथ काँग्रेसची अध्यक्षपदी निवड केली. यानंतर सुरेश कलमाडी पुण्याच्या राजकारणात ऑफिशिअल एन्ट्री झाली. आणीबाणी नंतर पुण्यातील काँग्रेस नेते मोहन धारिया यांनी काँग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी पहिल्यांदा जाहीर भाषण केल्याचे अनेकजण सांगतात.
तो पर्यंत कलमाडी यांची काँग्रेसचे स्थानिक नेते एवढीच ओळख होती.
आणीबाणी नंतर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई पुण्यातील टिळक स्मारक येथे एका कार्यक्रमा निम्मित आले होते. त्यावेळी कलमाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देसाई यांच्या कारवर चप्पल फेकली होती. ही गोष्ट संजय गांधी यांना समजली. त्यामुळे ते संजय गांधी यांच्या जवळलचे बनले. तर १९८० मध्ये एनडीएच्या पासिंग आऊट परेडसाठी राजीव गांधी पुण्यात आले होते. त्यावेळी राजीव गांधी यांच्याशी कलमाडी यांच्या भेट झाली.
राजीव गांधी आणि कलमाडी यांच्या एरिया ऑफ इंटरेस्ट एकच होता. तो म्हणजे दोघंपण पायलट होते. यामुळे ते राजीव गांधी यांच्या जवळचे बनले.
या काळात पुण्यात काँग्रेसचे नेतृत्व विठ्ठलराव गाडगीळ आणि जयंतराव टिळक यांच्याकडे होते. तर दुसरीकडे सुरेश कलमाडी पक्ष संघटनेत मोठे होत चालले होते. विठ्ठलराव गाडगीळ हे पुण्याचे खासदार होते. आणि काही काळ केंद्रात मंत्री सुद्धा होते. पुणे महापालिकेत गाडगीळ यांचा शब्द अंतिम समजला जात होता.
१९८२ ला सुरेश कलमाडी हे पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. तो पर्यंत सुरेश कलमाडी यांचा पुणे महापालिकेत काहीच रोल नव्हता. त्यानंतर हळूहळू कलमाडी यांनी महापालिकेत लक्ष घालायला सुरुवात केली होती. मात्र गाडगीळ यांचा गट महापालिकेत तगडा होता.
१९९१ मध्ये विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव झाला आणि त्यांची जागा सुरेश कलमाडी यांनी घेतली. कलमाडी यांच्या नेतृत्वखाली लढलेल्या पुणे महापालिकेच्या सलग तीन निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले. १९९२, १९९७ आणि २००२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस यश मिळाले.
सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वात पुणे महापालिकेत काँग्रेसची सलग १५ वर्ष सत्ता होती.
या काळात कलमाडी महापालिकेच्या कामकाजात विशेष लक्ष ठेऊन असायचे. काँग्रेसच्या प्रत्येक नगरसेवकाला फोन करून महापालिकेतील कामकाज संदर्भात माहिती विचारायचे. स्थायी समिती मध्ये मांडण्यात येणारे विषय अगोदर कलमाडी ठरावाचे.
गांधी घराण्याच्या निष्ठावंत समजले जात असल्याने पुणे शहर काँग्रेसची सगळी जबाबदारी सुरेश कलमाडी यांच्याकडे देण्यात आली होती. महापालिका निवडणुकीसाठी कोणाला तिकीट द्यायचे याचा अंतिम शब्द हा कलमाडी यांच्या समजला जात होता.
महापालिकेतील कामकाज संदर्भात पक्षाच्या मिटिंग मध्ये अगोदर चर्चा केली जायची आणि मगच तो विषय पालिकेत मांडला जात होता. १९९५ ते १९९६ दरम्यान कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री होते. मंत्री असतांना सुद्धा कलमाडी यांनी पुणे महापालिकेवरील आपली पकड कधी ढिली होऊ दिली नाही.
मंत्री असतांना कलमाडी हे आठड्यातून एकदा तरी पुण्यात यायचे. त्यावेळी पुण्यातील महापौर, उपमहपौर, स्थायी समितीचे अध्यक्ष हे त्यांना घ्यायला विमानतळावर जायचे. महापालिकेत त्यांचे किती वजन होते यावरून लक्षात येते.
पुण्यात पिण्याचे पाणी खडकासवाला धरणातून येतं. हे पाणी अनेक वर्ष उघड्या कॅनल मधून येत होते. कलमाडी यांनी हे पाणी बंद पाईप मधून यायला हवे यासाठी प्रयत्न केले आणि ३५० कोटींची योजना केंद्र सरकारकडून आणल्याची माहिती पुणे शहर माजी काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.
याबाबत बोलतांना अरविंद शिंदे म्हणाले की,
कलमाडी सकाळी उठले की कार्यकर्त्यांशी बोलायचे. नगसेवकांशी नेहमी संपर्कात असायचे. त्यामुळे महापालिकेत काय सुरु आहे यावर त्यांचे लक्ष असायचे. विरोधात जाऊन बीआरटी मार्ग सुरु केले.शहरातील रस्ते ८ ते १० फुटांचे आहेत त्यावर बस कशा चालतील असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला होता. शहरातील प्रमुख रस्ते ३० फुटांचे झाले. यासाठी केंद्रातून जेएनएनयुआरएम अंतर्गत २ हजार ८०० कोटींचा साली फंड आणल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच याच योजनेंतर्गत ३०० बस पुणे शहराला मिळवून दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
पुणे फेस्टिवल, पुणे मॅरेथॉन, पुणे व्यासपीठ सारखे उपक्रम सुरेश कलमाडी यांनी सुरु केले. यामाध्यमातून ते नेहमी लोकांच्या संपर्कात राहायचे.
सुरेश कलमाडी यांच्या कार्यकाळात पुण्याला सर्वाधिक महिला महापौर मिळाल्या. यात कमल व्यवहारे, वंदना चव्हाण, दीप्ती चौधरी, वत्सला आंदेकर, रजनी त्रिभुवन यांचा समावेश होता. त्याचबरोबर स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणून नीता प्रदेश राजपूत, संगीता देवकर्थे या महिलांना संधी दिल्याचे सांगण्यात येते.
२००७ मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीत स्वतः शरद पवार कलमाडी यांच्या विरोधात उतरले होते.
यावेळी पवारांनी कलमाडी यांच्यावर बरीच टिका केली. तसेच पुण्याच्या नागरिकांना कारभारी बदलण्याचे आवाहन केले होते. सलग १५ वर्ष सत्तेत असणाऱ्या काँग्रेसचा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे ३५ नगरसेवक, राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक निवडणून आले होते. मात्र कलमाडी यांना महापालिकेच्या राजकारणात बाहेर ठेवायचे असल्याने काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीने शिवसेना आणि भाजप सोबत सत्ता स्थापन केली.
२००९ मध्ये पुण्यात कॉमनवेल्थ युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्यामुळे पुण्यात बालेवाडी सारखे क्रीडा संकुल उभे राहू शकले. २०१० मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ते १० महिने तिहार जेल मध्ये होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय वर्चस्व उतरणीला लागले.
हे ही वाच भिडू
- पुणे पॅटर्न ज्यात कॉंग्रेसला बाजूला ठेवून भाजप, सेना – राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली होती
- चर्चा १० वर्ष आणि काम ५ वर्षांत, असा झाला पुणे मेट्रोचा प्रवास
- सुरेश कलमाडी यांनी दहशतवाद्यांवर विमानातून बॉम्बहल्ला केला होता.