महाराष्ट्रातील या गावच्या विकासावर आधारीत आहे शाहरुखच्या ‘स्वदेस’ची कहाणी
कुठेतरी वाचण्यात आलं होतं. ज्या सिनेमात शाहरुख खान शाहरुख खान वाटत नाही तेव्हा त्याचा कोणताही सिनेमा चांगलाच असतो. हे वाक्य अगदी खरं आहे. शाहरुखची एक स्टाईल आहे. अर्थात ती स्टाईल सुद्धा त्याने फार मेहनतीने कमावली आहे. परंतु ही स्टाईल थोडी दूर सारून शाहरुख जेव्हा अभिनय करतो, तेव्हा ते शाहरुखचं उत्कृष्ट काम होऊन जातं.
मुळात शून्यातून विश्व निर्माण करणारा हा कलाकार केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर इतका यशस्वी झाला आहे. रोमँटिक नायकाची प्रतिमा सोडल्यास शाहरुखने केलेल्या वेगळ्या भूमिका मनात घर करतात. यापैकी सर्वात वेगळी आणि दर्जेदार भूमिका म्हणजे ‘स्वदेस’ मधला मोहन भार्गव.
शाहरुख खान अभिनयात किती मुरलेला आहे, हे या सिनेमाच्या प्रत्येक प्रसंगातून कळून येतं.
आशुतोष गोवारीकर यांच्या लेखणीतून साकार झालेला हा मोहन भार्गव एका खऱ्या माणसाच्या आयुष्यावर आधारीत आहे. स्वदेस मध्ये मोहन भार्गव परदेशातून भारतात येऊन गावात राहणाऱ्या लोकांचं राहणीमान सुधारतो.
ही कहाणी NRI अरविंदा पिल्ललमरी आणि रवी कुचीमंची या जोडप्याच्या आयुष्यावर आधारीत आहे.
भारतामध्ये तळागाळातील लोकांमध्ये विकास करण्यासाठी रवी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. अमेरिकेच्या मेरीलँड विद्यापीठात फिजिक्स विषयात ते पीएचडी करत होते. १९९१ मध्ये त्यांनी AID (Association for Indian Development) ची स्थापना केली. त्यांच्या या संस्थेने भारतातील दुर्गम भागाचा विकास करण्याचे कार्य केले. रवी यांनी स्थापन केलेल्या AID चे आज जगभरात जवळपास १००० स्वयंसेवक आहेत.
दुसरीकडे अरविंदा यांचा जन्म अमेरिकेत झाला होता. विस्कॉन्सिन विद्यापीठामधून त्यांनी दक्षिण आशियाई अभ्यासात मास्टर्स ची डिग्री मिळवली. १९९५ पासून अरविंदा AID च्या कामात सहभागी झाल्या. इथेच त्यांची रवी सोबत भेट झाली. दोघांनी मिळून सामाजिक विकासाला हातभार लावणाऱ्या अनेक प्रोजेक्ट साठी एकत्र काम केले. अरविंदा चं शिक्षण पूर्ण झाल्यावर AID साठी पूर्णवेळ काम करण्यासाठी १९९८ साली दोघे भारतात आले. स्वदेस सिनेमात मोहन भार्गव आणि गीता हे दोघे गावच्या विकासासाठी झटत असतात.
तसंच खऱ्या जीवनात रवी आणि अरविंदा सामाजिक विकास होण्यासाठी प्रयत्नशील होते.
• बिलगाव प्रकल्प
बिलगाव हा महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम असा भाग. नर्मदा नदीची जिथे उपनदी आहे अशा उदाई या
ठिकाणी हे गाव वसलेले आहे. चार किलोमीटर इतका विस्तार असलेल्या या गावात १८० आदिवासी कुटुंब राहतात. देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु बिलगाव मात्र तसं दुर्लक्षित राहिलं. स्वातंत्र्यानंतर पुढची ५५ वर्ष बिलगावमध्ये वीज नव्हती. बिलगाव च्या अगदी जवळ नर्मदा नदीवर भारताचा सर्वात मोठा विद्युत प्रकल्प उभारला गेला आहे. परंतु या प्रकल्पाने आजूबाजूची आदिवासी गावं टाळली. त्यामुळे बिलगाव सारखी आदिवासी गावं दुलक्षित राहिली.
अरविंदा आणि रवी जेव्हा AID चं काम करण्यासाठी या भागात आले तेव्हा बिलगाव मध्ये असलेली विजेची समस्या त्यांना दिसली.
यासाठी कोणता उपाय शोधता येईल म्हणून त्यांनी आजूबाजूच्या भागाची पाहणी केली. तेव्हा त्यांना लक्षात आलं की, बिलगाव मध्ये ९ मीटर उंच धबधबा होता. त्याचा वापर करून वीजनिर्मिती होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आलं. अजिबात वेळ न दवडता डोक्यातली कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अरविंदा आणि रवी कामाला लागले.
१५ KW जनरेटर चा वापर करून या दोघांनी गावात वीजनिर्मिती करण्यासाठी अथक प्रयत्न केले. आणि अखेर या दोघांच्या प्रयत्नांना यश आले.
२००२ सालच्या मे महिन्यात त्यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली. आणि जानेवारी २००३ मध्ये अरविंदा आणि रवी यामध्ये यशस्वी झाले. बिलगाव प्रकल्पामुळे गावातील प्रत्येक घरात वीज आली. यानंतर या दोघांनी गावातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी चांगली जागा असावी म्हणून आश्रमशाळा उभारली.
बिलगाव तसेच आसपासच्या भागातील जवळपास ३०० मुलं येथे शिक्षण घेत आहेत. जसं सिनेमात दाखवलं आहे अगदी तसंच, संपूर्ण गाव अरविंदा आणि रवी या दोघांच्या प्रयत्नांना सहकार्य करत होते. प्रकल्पासाठी लागणारी टाकी, पॉवर हाऊस अशा अनेक गोष्टींची निर्मिती करण्यासाठी बिलगाव मध्ये राहणारे ग्रामस्थ आणि मजूर स्वतः पुढे आले.
बिलगाव मध्ये केवळ वीजनिर्मिती झाली नाही तर त्यापेक्षाही अनेक गोष्टी घडून आल्या. लोकांच्या घरात बल्ब, टीव्ही अशा वस्तू आल्या. मुळात लोकांचं राहणीमान सुधारलं. देशातील अशाच दुर्गम भागातील ग्रामस्थांनी बिलगावचा आदर्श घेतला. महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या पुढाकाराने बिलगावात दुधाचा पुरवठा होण्यास सुरुवात झाली.
• मेहनतीवर पाणी फिरले.
गावात वीजनिर्मिती करून स्वदेस मधला मोहन भार्गव पुन्हा परदेशी जातो. आणि काही वेळात सिनेमा संपतो. परंतु ही कहाणी बिलगावच्या बाबतीत मात्र घडली नाही. सर्व काही सुरळीत सुरू असलेल्या बिलगावला जणू काही कोणाची दृष्ट लागली.
२००६ च्या ऑगस्ट महिन्यात सरदार सरोवर धरणाच्या पाण्यामुळे बिलगाव प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला. पाण्याच्या पातळीत होणारी वाढ आणि जोडीला असणारा मुसळधार पाऊस यामुळे नर्मदा नदीच्या भोवताली असणारी अनेक गावे पुराने वेढली गेली. बिलगाव ला सुद्धा याचा मोठा फटका बसला. अरविंदा आणि रवी यांनी अथक परिश्रम करून उभारलेल्या या प्रकल्पावर पाणी फिरले.
• नुकसान झाल्यानंतर काय झालं ?
प्रकल्प बुडाल्यानंतर बिलगाव पुन्हा अंधारात गुडूप झाले. मीडिया, सेलिब्रिटी अनेकांनी बिलगाव मध्ये जाऊन गावकऱ्यांना प्रोत्साहन दिले. ‘ज्याचं जळतं, त्याला कळतं’ असं म्हणतात. बाहेरून कितीही लोकं आली तरी आयुष्यात अचानक आलेलं हे दुःख गावकऱ्यांना सहन करायचं होतं. गावातली वीज गेल्यानंतर गावकऱ्यांनी सूर्य ज्या वेळेला उगवतो आणि मावळतो त्या वेळेनुसार स्वतःची जीवनशैली अंगिकारली आहे.
आश्रमशाळेतील ४०० विद्यार्थी शाळा झाल्यावर संध्याकाळी ५ वाजताच रात्रीचं जेवण करतात. आणि अंधार होईपर्यंत उरलेल्या वेळेत स्वतःचा अभ्यास करतात. बिलगाव मध्ये पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याच्या अनियमित प्रवाहामुळे गावात दुष्काळाचे सावट असते. आदिवासींची वाढत जाणारी लोकसंख्या आणि विकासाकडे होणारं दुर्लक्ष यामुळे बिलगाव मध्ये असंतोषाचे प्रमाण वाढत आहे.
सर्व सुरळीत होतं तेव्हा राजकारणी बिलगावचं कौतुक करत होती. परंतु आत्ता बिलगाव हे पुन्हा एकदा एक दुर्लक्षित गाव झाले आहे.
तर ही होती बिलगाव ची कहाणी. स्वदेस सिनेमाची हॅपी एंडींग आहे. परंतु सिनेमात असलेली हॅपी एंडींग बिलगावच्या वाट्याला आली नाही. अरविंदा आणि रवी यांनी बिलगाव पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न केला
का? हे ठाऊक नाही. परंतु या दोघांनी नर्मदा बचाव आंदोलनात भाग घेतला होता. तसेच आजही हे दोघे AID च्या माध्यमातून ग्रामीण विकासाला हातभार लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
हे ही वाच भिडू
- या छोट्याश्या कल्पनेमुळे गावात बिबट्या यायचा बंद झाला
- महाराष्ट्रातल्या या गावात फक्त पाणी आणण्यासाठी म्हणून लोक ३-३ लग्न करतात
- ट्रक बांधणाऱ्यांचं गाव : इथला एकही मुलगा बेरोजगार नाही
- उचल्या लोकांनी मस्तानीचे संरक्षण केले. आजही या गावाला ‘उचल्यांचे पाबळ’ म्हणून ओळखतात.
बातमी बरोबर आहे पण आपण या ठिकाणी नक्षलवाद आहे अत्यन्त चुकीचा उल्लेख आहे येथील मी रहिवासी आहे चुकीची बातमी पसरवू नका तसेच आश्रम शाळा 1990 साली सुरू झाली होती