निकाल आला, आता टाटांची TCS पाकिस्तानचं संपूर्ण शेअरमार्केट तीनदा विकत घेऊ शकतेय
भारताची सगळ्यात मोठी आयटी कंपनी कोणती? अर्थातच रतन टाटांची Tata Consultancy Services, टीसीएस. या कंपनीचं एक वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचा वेगळाच स्वॅग असतो. आपण या कंपनीत काम करतो हे मिरवण्यात अलगच भूषण वाटत असतं. पण याला देखील कारण आहे ही कंपनीच. नेहमी आपणच सगळ्यात बेस्ट कसे आहोत हे प्रुफ करण्यात ती चुकतच नाही.
उदाहरण सांगायचं तर कालचा ताजा इन्सिडन्स. कंपनीच्या चोथ्या तिमाहीचा रिझल्ट लागला आणि जेवढ्या टार्गेटचा अंदाज लावण्यात आला होता तितका कम्प्लीट प्रोफिट त्यांना झाला आहे. सलग सातव्यांदा कंपनीच्या रेवेन्युचा आलेख वाढता राहिला आहे. सोबतच ही कंपनी अशी जबरी झाली आहे की पाकिस्थानचं संपूर्ण शेअरमार्केट तीनदा आरामात विकत घेऊ शकते.
कसं? जाणून घेऊ…
झालंय असं की, टीसीएसचा यावर्षीच्या चौथ्या क्वार्टरचा निकाल लागला. ज्यात कंपनीच्या ऑपरेशन्समधील रेव्हेन्यू मागील तिमाहीच्या तुलनेत ३.५% वाढून 50,591 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर ब्लूमबर्गने काही विश्लेषकांच्या मदतीने आधीच अंदाज ट्रॅक केला होता तो 50,263.1 कोटी रुपये इतका होता. म्हणजे अंदाज १००% खरा ठरलाय. तर निव्वळ नफा 1.6% वाढून 9,926 कोटी झाला आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च 2021 या कालावधीत कंपनीने 9,246 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता, जो जानेवारी-मार्च 2022 दरम्यान 7.35 टक्क्यांनी वाढून 9,926 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर संपूर्ण वर्षासाठी कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये 17 टक्के आणि निव्वळ नफ्यात 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हे कसं झालंय? तर कंपनीच्या धोरणामुळे आणि ते अगदी योग्यपणे हाताळल्यामुळे.
कंपनीने गेल्या वर्षभरामध्ये आपल्या वेगवेगळ्या ऑपरेशन्ससाठी खूप कार्यकर्त्यांची भरती केली. आणि त्यांना त्यानुसार कार्य करण्यास सांगितलं. टीसीएसने एका वर्षात नोकऱ्या देण्याचा विक्रम केला आहे. मार्च 2022 पर्यंत या कंपनीने एका वर्षात 1 लाख 3 हजार 546 लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. गेल्या वर्षीशी तुलना केली तर यंदा 40,000 जास्त लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.
तर आपण या तिमाहीचे बोलतोय त्यात देखील रेकॉर्ड केलाय कंपनीने. या तिमाहीत आतापर्यंतच्या सर्वाधिक 35,209 लोकांना नोकऱ्या कंपनीने दिलीये.
दुसरा मुद्दा म्हणजे या धोरणांमुळे कंपनीने कमावलेल्या डील्स. कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीत 7.6 बिलियन डॉलरच्या डील झाल्या होत्या. ज्यात वाढ होऊन चौथ्या क्वार्टरमध्ये 11.3 बिलियन डॉलर किमतीचे नवीन सौदे कंपनीने जिंकले. ज्यामुळे FY22 साठी एकूण डिल्सच मूल्य झालं 34.6 बिलियन डॉलर. तुलनेत FY21 मध्ये कंपनीने 31 बिलियन डॉलरचे सौदे केले होते.
असं सगळं चांगलं झालं मात्र थोडं पुढे मागे गणित झालं ते अॅट्रिशन रेटमध्ये.
अॅट्रिशन रेट म्हणजे काय? तर हा एक मेट्रिक आहे ज्याचा वापर कंपनीच्या एम्प्लॉईजने स्वेच्छेने कंपनी सोडल्याचा दर मोजण्यासाठी केला जातो. संघटनेतील एकूण कर्मचारी संख्येच्या प्रमाणात सोडण्याचा दर मोजला जातो.
कंपनीचा हाच अॅट्रिशन रेट एका तिमाहीत 17.4 टक्क्यांपर्यंत वाढला, जो वर्षाच्या सुरुवातीला 8.6 टक्के होता आणि डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 11.9 टक्के होता. पण तरीही कंपनीने म्हटलं आहे की, ज्याप्रकारे चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या सहामाहीत कंपनी भक्कम भरती करतेय, ज्याने हा रेट कमी होण्यास सुरुवात होईल.
सगळा सविस्तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. धोरण पण सांगितलंय. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की…
कंपनी पाकिस्थानचं संपूर्ण शेअरमार्केट तीनदा आरामात कसं विकत घेऊ शकते?
याचं गूढ आहे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये. सध्या टीसीएसची मार्केट व्हॅल्यू २१६ बिलियन डॉलरच्या जवळ आहे. तर पाकिस्तानच्या शेअर मार्केटमधील एकूण शेअर्सची व्हॅल्यू सध्या ४८ बिलियन डॉलर आहे. म्हणजेच तीनदा कंपनी आरामात पाकिस्थानचं शेअर मार्केट विकत घेऊ शकतेय. आणि अजून तर पिक्चर कंटिन्यू आहे भिडू…
तुम्हाला काय वाटतं, येत्या आर्थिक वर्षात कंपनी कोणते नवे रेकॉर्ड करू शकेल आणि तुम्ही जर टीसीएसचे एम्प्लॉई असाल तर तिथे काम करण्याचा तुमचा अनुभव नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा…
हे ही वाच भिडू :
- इ-कॉमर्स मध्ये टाटा लेट झालेत पण सुपरॲपमुळे एंट्री ग्रँड असणार आहे.
- पहिल्यांदाच एक शेतकऱ्याचा लेक संपूर्ण टाटा समूहाचा चेअरमन बनला होता
- संपूर्ण जगाला टेन्शन दिलेला प्रश्न TCS ने सोडवला आणि भारताच्या सॉफ्टवेअर क्रांतीला सुरवात झाली…