गुळाला दर मिळाला नाही म्हणून तात्यासाहेब कोरेंनी ऊस पेटवून दिला होता.
तात्यासाहेब कोरे हे नाव पश्चिम महाराष्ट्रातील यशस्वी सहकार चालवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. वारणा खोऱ्यातील शेतकऱ्याच्यात खऱ्या अर्थाने सोन पिकवनारे तात्याच आहेत.
तात्यासाहेब कोरे यांचं गाव पन्हाळ्याजवळील कोडोली, तात्यासाहेब प्रगतशील शेतकरी होते. त्यावेळीही ते ऊसाची शेती करत, पण कारखाना नसल्यामुळे गुळ उत्पादनासाठी गुऱ्हाळवर ऊस पाठवावा लागत असे. त्यावेळी गुळाला चांगला दर मिळायचा म्हणून सगळी शेतकरी उसाचेच पीक घेत होते.
तात्यासाहेब कोरे यांची शेतीही 17 -18 एकर एवढी होती, तेही संपूर्ण शेतात उसाचे पीक घेत. तात्यासाहेब यांची कोडोली येथील डागमळ्यातील शेती आर्थिकदृष्ट्या संपन्न करत होती. 1949 सालीचा डागमळ्यातील हंगाम हा कोरे कुटुंबासाठी संस्मरणीय ठरला होता. कारण त्यावर्षी त्यांनी डागमळ्यातून 7000 गुळाचे रवे तयार केले होते, त्यावर्षी गुळाला चांगला भावही मिळाला होता.
एका रव्याला 35 ते 40 रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे त्यावर्षी शेतकर्यांचे चांगले उत्पन्न झाले होते.
पण 1951 हे वर्ष शेतकर्यांसाठी वाईट ठरले करण त्यावर्षी गुळाला सर्वात कमी भाव मिळाला. कोल्हापूरच्या बाजारात गुळ चुळ भरण्यासाठी पाणी झाला. त्यावर्षी गुळाच्या एका ढेपेला सव्वा रुपये ते दोन रुपये एवढाच भाव मिळाला. ज्या गुळाला 1949 या वर्षी 40 रुपये भाव मिळाला होता. त्याच गुळाला 1951 साली फक्त सव्वा रुपये भाव मिळाला होता. चांगला गुळ त्यावेळी चुन्यात मळन्याची वस्तू झाली होती. त्यामुळे बर्याच शेतकर्यांनी ऊस पेटवून दिला होता. तात्यासाहेब कोरेंनीही 18 एकरातील ऊस पेटवला होता. पण त्याच वर्षी साखरेचा दर मात्र उत्तम होता. त्यावेळी गुळाची हलाखी नि साखरेची नवलाखी होती.
संदर्भ – मी एक कार्यकर्ता (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध) तात्यासाहेब कोरे.
हे ही वाच भिडू.
- वारणेच्या मातीत विकासगंगा आणणारे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे !
- या गावातल्या तरुणांनी देशभर “बझार” उभा करून दाखवलेत.
- सांगलीच्या पूरात औरंगजेबाचा पाय मोडला होता.