टिसीएस जगातील सर्वात मोठ्ठी आयटी कंपनी झाली आहे..
गेल्यावर्षी कोरोना आणि लॉक डाऊन वगैरे संकटामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, कित्येक उद्योगधंदे देशोधडीस लागले. मात्र या सगळ्यात वर्कफ्रॉम होम करत भारतीय आयटी इंडस्ट्री मात्र एका पाठोपाठ एक उच्चांक गाठतच राहिली.
आजच टाटा समूहाच्या गळ्यातील ताईत असलेली ‘टाटा कंसल्टन्सी सर्विसेस’ अर्थात टीसीएस या कंपनीने ऐतिहासिक कामगिरी बजावत १६९.९ अब्ज डॉलर एवढं भांडवली मुल्य असणारी पहिली भारतीय कंपनी होण्याचा मान मिळवला.
फक्त इतकंच नाही तर या कामगिरीमुळे टीसीएस अमेरिकेच्या ऍक्सेंचरला पाठीमागे टाकून जगातली सर्वात मोठी आयटी कंपनी बनले.
जगभरात १०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक बाजार मूल्य असणाऱ्या फक्त ६३ कंपन्या अस्तित्वात असल्याने, ही घटना भारतीय औद्योगिक जगतात मैलाचा दगड ठरली. या घटनेने टाटा उद्योग समूहाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तोरा खोवला गेला.
चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये टीसीएसने ८७०१ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. यापूर्वी या सेगमेंट मध्ये ऍक्सेंचरचा बोलबाला होता. मात्र सोमवारी जेव्हा न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचे मार्केट ओपन झाले तेव्हा ऍक्सेंचरचे शेअर्स १.६%नी ढासळले.
हे पहिल्यांदा घडलेलं नाही. टीसीएसने यापूर्वी तीन वेळा ऍक्सेंचरला मागे टाकलंय. पण यावर्षी हि कंपनी भारतातलीच नाही तर जगातली सर्वात मोठी आयटी कंपनी बनली.
याच सेग्मेंट मधील अन्य दिग्गज कंपन्यांकडे पाहिलं तर SAP ची बाज़ार हिस्सेदारी १५६ बिलियन डॉलर, IBM ची १०५ अरब डॉलर आणि आपल्या इन्फोसिस ची ७७ अरब डॉलर आहे. तर Cognizant ४२ अरब डॉलर, विप्रो चे मार्केट व्हॅल्युएशन ३३ अरब डॉलर इतके आहे.
२०१८सालच्या जानेवारी ते मार्च या तिमाहीतील आपला निव्वळ नफा ६९०४ कोटी नोंदवल्यापासूनच टीसीएस कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळाली होती. यंदाच्या शेअर्सच्या वाढत्या किमतीमुळे दलाल स्ट्रीटवर या कंपनीची गाडी सुसाट सुटली.
या निमित्ताने टीसीएसने गेली ११ महिने भारतात एक नंबरवर राहिलेल्या रिलायंस इंडस्ट्रीज़ ला देखील मागे टाकले.
सोमवारी शेअर बाजार बंद होण्याच्या वेळी TCS चे BSE वरील बाज़ार मूल्य १२,३४,६०९.६२ कोटी तर Reliance Industries Ltd (RIL) चे १२,२९,६६१.३२ कोटी इतके राहिले. BSE वर RIL चे शेयर ५.३६ टक्क्यांनी घसरून १९३९.७० रुपयांवर बंद झाला.
मात्र भले ही TCS जगातली सगळ्यात महागडी आयटी कंपनी बनली असली तरीही ती सॉफ्टवेयर उद्योग क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या मानाने बरीच मागे आहे. मायक्रोसॉफ्टचे बाज़ार मूल्य १.७ ट्रिलियन आणि Oracleचे १७७ बिलियन डॉलर इतके आहे.
मात्र आयटी क्षेत्राचा विचार करायचा झाला तर टीसीएसची कामगिरी सगळ्या भारतीयांची कॉलर ताठ होईल अशीच आहे.
कंपनीचं बाजामुल्य अर्थात मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे नेमकं काय…?
एखाद्या कंपनीच बाजारमूल्य म्हणजे त्या कंपनीच्या बाजारात असलेल्या शेअर्सची एकूण किंमत होय. बाजारातील हे शेअर्स व्यक्ती, संस्थात्मक गुंतवणूकदार, कंपनीचे अधिकारी यांच्याकडे असतात. या सर्व घटकांकडील शेअर्सची एकत्रित किंमत म्हणजे त्या कंपनीचं बाजारमूल्य किंवा ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ होय.
कंपनीचं बाजामूल्य कसं ठरवलं जातं…?
कुठल्याही कंपनीचे भांडवली बाजारातील एकूण शेअर्स आणि त्या कंपनीच्या एका शेअरची भांडवली बाजारातील अर्थात शेअर मार्केट मधील चालू किंमत यांचा गुणाकार करून त्या कंपनीचं बाजारमूल्य ठरवलं जातं. उदारहरणार्थ, एखाद्या कंपनीचे १००० शेअर्स बाजारात असतील आणि कंपनीच्या एका शेअरची किंमत २००० असेल तर त्या कंपनीचे बाजामूल्य हे १०००×२०००= २०,००००० इतकं होईल.
टीसीएसने दोन वर्षांपूर्वीच १०० अब्ज डॉलरच्या बाजारमूल्याचा टप्पा ओलांडला होता. त्यावेळीच त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावे केले होते. त्यावर एक नजर-
- १०० अब्ज डॉलर बाजारमूल्याचा टप्पा ओलांडणारी जगातील ६४ वी कंपनी आणि पहिलीच भारतीय कंपनी ठरली होती.
- सद्यस्थितीत टीसीएसचे बाजारमूल्य पाकिस्तानच्या शेअर्स मार्केटमधील एकूण शेअर्सच्या (एकूण मूल्य ८० अब्ज डॉलर्स) मूल्यापेक्षा २५% अधिक आहे
- कंपनीचे बाजारमूल्य हे जगभरातील १२८ देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाएवढे आहे. या देशांमध्ये श्रीलंका,स्लोवाकिया, लक्झेम्बर्ग,केनिया आदी देशांचा समावेश होतो.
- भारताच्या एकूण राखीव परकीय साठ्याच्या(४२६ अब्ज डॉलर्स) एक चतुर्थांश बाजारमूल्य असणारी कंपनी म्हणून यापुढे टीसीएसकडे बघितलं जाईल.
- टीसीएसचं बाजारमूल्य हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर सर्व भारतीय कंपन्यांच्या एकत्रित बाजारमुल्याहून अधिक आहे.
हे ही वाचा भिडू.
- लॅक्मे नव्हे लक्ष्मी. नेहरुंनी सांगितलं, टाटांनी बनवलं
- पोराचं जिओसाठी कौतुक करताय, पण बाप तर भारताची माती थेट अरबांना विकत होता !!!
- भारत आणि चीनच्या युद्धामुळे रतन टाटा अविवाहित राहिले !