बिहारमध्ये पूर आलाय आणि पुरासोबत लसीची नाव पण आलीय….
बिहारमध्ये पूर आलाय पूर,
पण पुरासोबत लसीची नावं आलीय. बिहारच्या मुझफ्फरनगर प्रशासनानं भारी शक्कल लढवलीय. पुरामुळं लोकांचं कोरोनाचं लसीकरण राहू नये म्हणून आता त्यांनी ‘टीका वाली नावं’ सुरू केलीय. ज्यानं डोकं लावलंय तो भारीच हुशार दिसतोय.
तर टीका वाली नावं प्रकरण काय आहे?
बिहारच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात ‘टीका वाली नाव’ सुरू करण्यामागचं कारण आहे तिथल्या गावांत पूर आलाय. या नावेच्या माध्यमातनं जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना बाधित कटरा या भागातल्या लोकांना कोरोनाची लस दिली जातेय. पूरग्रस्त भागात १०० टक्के लसीकरणासाठी हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या नावेचं उद्घाटन सिव्हिल सर्जन डॉ. विनय कुमार शर्मा यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी या नावेमागची कल्पना जिल्ह्याचे डी. एम प्रणव कुमार यांची असल्याचं सांगितलं.
आता ही नावं जेव्हा शुक्रवारी कटरात आली तेव्हा लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. नावं बघून लोकं सुरुवातीला तर बावरली होतात. पण आता या नावेमुळं पूरग्रस्त भागातली लोक लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत. लोकांना नावेवरचं लस देण्यात येत आहे. लस असलेली नावं पुराच्या पाण्यामध्ये असलेल्या खेड्यांमध्ये पोचत आहे. आणि त्या नावेवर काम करणारे वैद्यकीय सहायक लोकांना बोलवून बोलवून लस देत आहेत.
आत्तापर्यंत लोकांनी नावेतून मदत येताना पाहिली होती पण आता त्यांना नावेवर पहिल्यांदाच लस दिसलीय.
पूरग्रस्त भागातील ५६ ग्रामपंचायतींच्या १.१९ लाख लोकांसाठी लसीकरणाची नावं
दिवसेंदिवस मुझफ्फरपूरमधील पुराची आव्हानं वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ५६ पंचायतींमधील १.१९ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. यावर डीएम प्रणव कुमार यांनी सांगितले की, पूरग्रस्त भागात त्वरित मदतची काम केली जात आहेत. ३६ सामुदायिक स्वयंपाकघर चालविण्या व्यतिरिक्त १४८ नावं मदतीसाठी तत्पर आहेत. ड्राय रेशनचे देखील लोकांमध्ये वाटप केले जात आहे.
जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पूरग्रस्तांमध्ये आतापर्यंत कोरड्या रेशनची १६०० पाकिटे वाटली आहेत. या भागात १४८ बोटी कार्यरत आहेत. या नावेच्या माध्यमातनं आरोग्य विभागाने ४२५६ हॅलोजन टॅब्लेटचे वितरण केले आहे.
कोरोनाच्या काळात अशा बिहारमध्ये सुरु असलेलं युद्ध पातळीवरच लसीकरण बघून आश्चर्यानं तोंडात बोट घालायची वेळ आलीय. म्हणजे आमच्या इथं लशीचा स्लॉट बुक होईना, आणि बिहारात लशींच्या बोटी फिरतायत. आता आपण बिहारचा जरा आदर्श घेतला पाहिजे.
हे हि वाच भिडू
- भारताचं कोवीन बनलंय ग्लोबल प्लॅटफॉर्म, ७६ देशांना आपल्या लसीकरणासाठी वापर करायचाय
- लसीकरणाच्या आकडेवारीत भारत अमेरिकेच्या पुढे असला तरी टक्केवारीत बराचं मागे आहे
- सध्या डोकं वर काढलेल्या डेल्टा प्लसची माहिती भारतीय संशोधकांना २०२० मध्येच मिळाली होती.