सगळं जुळून आलं असतं, तर पाकिस्तानविरुद्ध लालूंचा मुलगा तेजस्वी यादवही खेळताना दिसला असता
क्रिकेटचे मैदान गाजवून राजकीय मैदानात उतरणाऱ्यांची आपल्याकडे अजिबात कमी नाही. चेतन चौहान, सिद्धु, गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर ही काही चटकन तोंडावर येणारी नाव. पण आणखी एक नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव.
खर वाटत नसलं तरी हेच खरयं. तेजस्वी यादव पण क्रिकेटर होते. प्रथम श्रेणी, लिस्ट A आणि आयपीएलचे चार सिझन असं सगळं काही त्यांच्या नावावर आहे. इतकच काय तर पुर्ण वेळ क्रिकेट खेळण्यासाठी त्यांनी ९ वी मधून शाळा पण सोडलीय.
आपल्याकडे असं क्रिकेटसाठी शाळा सोडायच लांबच पण बोलून दाखवल तरी पायातल हातात येतं.
तर तेजस्वी यादव यांच क्रिकेटच करीअर सुरु होतयं शाळेपासूनच.
२००१ मध्ये लालू प्रसाद यादव बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले सबा करीम भेटण्यासाठी आले. आणि त्यांनी बिहारमधील प्रतिभावंत खेळाडूंना क्रिकेटमध्ये कसे पुढे आणायचे याची चर्चा केली.
लालूजींनी सगळं ऐकुण घेतलं, खूश पण झाले. बोलता-बोलता त्यांनी त्यांचा मुलगा तेजस्वी यादवची सबा करीम यांना ओळख करुन दिली. तेजस्वी तेव्हा १२ वर्षांचे होते.
लालूजी म्हणाले,
देखो, ये मेरा छोटा बेटा है और क्रिकेट को लेकर बहुत उतावला रहता है. थोड़ा इस पर भी ध्यान दो.
पुढे २००२ मध्ये सबा करीम, राम कुमार आणि इतर काहींनी मिळून पटना इथं एक कॅम्प लावला आणि त्यात जवळपास १०० मुलांना निवडलं. ज्यामधील एक तेजस्वी पण होता. सबा करीम म्हणतात, तेजस्वीकडे क्रिकेटचा बॅकग्राऊंड नव्हता. पण खेळण्याची तीव्र इच्छाशक्ती होती.
पुढे तेजस्वीचे प्रॉपर क्रिकेटचे ट्रेनिंग सुरु झाले. सुरुवातीला काही दिवस पटनामध्ये नेट ट्रेनिंग झालं. नंतर खुल्या मैदानावर आणि इतर खेळाडूंसोबत प्रशिक्षण दिलं गेलं. २००३ मध्ये त्यांना प्रशिक्षणासाठी दिल्लीला नेलं गेलं. तिथे नॅशनल स्टेडियमवर पुढील जवळपास ६ वर्ष प्रॅक्टिस चालू होती.
तेजस्वी सांगतात,
क्रिकेटच वेड एवढं होत की त्यासाठी पुर्ण वेळ देता यावा म्हणून मी ९वी मधून शाळा देखील सोडली. आयपीएलमध्ये आल्यावर काही काळ धोनीसारखी हेअरस्टाईल देखील ठेवून बघितली.
शेवटी प्रथम श्रेणीमध्ये निवड :
दिल्लीमधील मोठ्या प्रॅक्टिसनंतर अखेरीस नोव्हेंबर २००९ मध्ये त्यांची प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी झारखंड संघाकडून निवड झाली. यातील पहिला सामना विदर्भ विरुद्ध खेळला. ज्यात दोन्ही डावात मिळून त्यांचा टोटल स्कोर २० होता. हिच त्यांची शेवटची मॅच होती.
पुढे लिस्ट ए मध्ये ही दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये त्याने एकूण १४ धावा केल्या. तेजस्वीने ४ टी -20 सामने देखील खेळलेत. ज्यामध्ये ४ रन्स बनवल्या आहेत. तर बॉलिंगमध्ये त्यांना प्रथम श्रेणी आणि टी -२० मध्ये एकही विकेट घेता आलेला नाही. लिस्ट ए मध्ये फक्त एक विकेट घेण्याचा पराक्रम केलाय.
लिस्ट ए च्या सामन्यांमध्ये त्यांच पदार्पण १४ फेब्रुवारी २०१० मध्ये झालं तर १६ फेब्रुवारी २०१० रोजी ते आपली शेवटची मॅच खेळली. चार T-20 पण याच दरम्यानच्या.
पण थांबा लालूंच्या मुलाच क्रिकेट करिअर इथेच संपलं नाही.
२००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने त्यांना ४० लाख रुपये देवून खरेदी केलं. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी आयपीएलच्या टिममध्ये निवड झाली. त्यामुळे बाप-बेटे दोघेही जाम खूश होते. लालू त्यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री होते.
पण २००८ ला निवड झाल्यानंतर पुढील २०१२ च्या सिझनपर्यंत दिल्लीने एका ही प्लेइंग ११ मध्ये त्याला संधी दिली नाही. अखेरीस एकदा लालूंच्या संयमाचा बांध फुटलाच. ते म्हणाले,
“माझा मुलगा तेजस्वी दिल्ली संघाचा भाग आहे. परंतु केवळ इतर खेळाडूंना मैदानात पाणी घेवून जाण्यासाठी. त्यांनी अजून खेळायची संधीच दिलेली नाही.”
निवडणूकीच्या मैदानात :
पुढे २००९-१० च्या निवडणूकीमधून लालू यादव केंद्र आणि बिहार दोन्हीकडील सत्तेमधून बाहेर गेले. २०१३ मध्ये न्यायालयाच्या निकालामुळे त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व देखील गेले. तसेच निवडणूक लढविण्यावर देखील बंदी आली. यामुळे तेजस्वी यांना निवडणूकीच्या मैदानात याव लागलं.
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव राघोपूर येथून आमदार म्हणून निवडून गेले. ही त्यांची पहिली निवडणूक होती. तेव्हा नितीशकुमार आणि लालू यादव यांनी एकत्र निवडणूक लढविली. या युतीने निवडणुकीत विजय मिळविला आणि पहिल्यांदाच तेजस्वी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.
याच निवडणूकीत त्यांना आगामी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं होत.
मात्र, सत्ता टिकवता आली नाही. अवघ्या दिड वर्षांमध्येच तेजस्वींना उपमुख्यमंत्रीपद सोडावे लागले. आयआरसीटीसी जमीन घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ऑगस्ट २०१८ मध्ये जामीनही मिळाला. पण त्यामुळे १६ महिन्यांमध्येच नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत गेले. त्यानंतर ते विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले होते.
लालु यादव आता वृद्ध होत आहेत. त्यामुळे आगामी काळात तेजस्वी यांनाच वारसदार म्हणून त्यांनाच प्रोजेक्ट केलं जात आहे. त्यांचा मोठा भाऊ तेजप्रतापही राजकारणामध्ये आहे. मात्र लालूंनी संधी लहान मुलाला दिली आणि नितीश कुमार आणि भाजपची गट्टी तोड तेजस्वी यांनी आपलं सरकार आणून दाखवलं. त्यामुळे क्रिकेटमध्ये फेल गेले असले, तरी राजकारणात मात्र त्यांनी जोरदार बॅटिंग केली.
हे ही वाच भिडू
- बिहारच्या राजकारणात भूकंप करणारं बॉबी हत्याकांड अशाप्रकारे दाबण्यात आलं होतं
- अरुण जेटली यांचा एकमेव पुतळा बिहारमध्ये उभा आहे यालादेखील एक कारण आहे.
- बिहारच्या बाहुबलीने अर्णब गोस्वामीला थेट किडनॅप केलं होतं.