कारगिल युद्ध , सर्जिकल स्ट्राईक ते एयर स्ट्राईक या मागे हा शूर योद्धा आहे

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईकवर केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस पक्षाचे नेते राशिद अल्वी यांनी सरकारने पाकिस्तानमधील दहशतवादी लाँच पॅड्सवरील कारवाईचा व्हिडिओ दाखवावा असं म्हटलंय.

राशिद अल्वी म्हणाले,

“आम्हाला आमच्या सुरक्षा दलांवर विश्वास आहे पण भाजप सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही. सरकार म्हणते की त्यांच्याकडे सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ आहे, मग दिग्विजय सिंह यांनी सरकारला ते दाखवायला सांगितलं त्यात गैर काय? आम्ही पुरावा मागत नाही पण सरकारने दावा केलेला व्हिडिओ दाखवावा.”

हा झाला राजकारणाचा भाग, पण सर्जिकल स्ट्राईक हा शब्द कानावर आला आणि एक नाव डोक्यात चमकलं… ते नाव म्हणजे बीरेंद्र सिंग धनोआ. हे नाव फक्त सर्जीकल स्ट्राईक पुरतंच मर्यादित नाहीये तर, कारगिल युद्ध , सर्जिकल स्ट्राईक ते एयर स्ट्राईक या सगळ्या घटनांमध्ये हे नाव येतंच येतं.

२६ फेब्रुवारीला पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय हवाईदलाच्या १२ विमानांनी पाकव्याप्त काश्मीर मधील बालाकोट येथे असलेल्या जैश ए मोहम्मदच्या लष्करी तळावर हल्ला केला. काही दिवसापूर्वी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे हे प्रत्युत्तर होते. ही मोहिम पार पडली तेव्हाचे वायुदलप्रमुख एअरचीफ मार्शल बिरेंद्रसिंह धनोआ यांच्या नेतृत्वाखाली.

एअरचीफ मार्शल धनोआ यांच्या घरात लष्करी शिस्तीची परंपराच आहे. त्यांचे आजोबा कप्टन संतसिंह यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश रॉयल आर्मीकडून सहभाग घेतला होता. जपान विरुद्धच्या युद्धात त्यांनी केलेल्या पराक्रमाच्या कथा आजही त्यांच्या पंजाबमधल्या घरुआन गावात सांगितल्या जातात. बिरेंद्रसिंह धनोआ यांचे वडील एसएस धनोआ हे एक आयएएस अधिकारी होते. पंजाब व बिहार राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

असा हा देशसेवेचा वारसा बिरेंद्रसिंह धनोआ यांच्यापर्यंत चालत आला होता. मसुरी येथील सेंट जॉर्ज महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, राष्ट्रीय भारतीय सैनिकी महाविद्यालय येथे प्रशिक्षण घेऊन जून १९७८ मध्ये ते हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून दाखल झाले. मिग २१, सुखोई ३०, मिग २९, जग्वार अशा वेगवेगळ्या क्षमतेच्या लढाऊ विमानांच्या सारथ्यामुळे हवाई प्रशिक्षक म्हणून त्यांची खास ओळख झाली. 

१९९९ सालच्या भारत पाकिस्तान युद्धात एअरमार्शल धनोआ यांच्या अनुभवाचा वापर करण्यात आला. मर्यादित युद्धात हवाई दलाचा वापर सहसा केला जात नाही. त्यामुळे कारगिल युद्धातही तो प्रारंभी टाळण्यात आला. कारण, हे दल रणांगणात उतरल्यानंतर युद्धाचे स्वरूप बदलण्याचा धोका असतो.

कारगिल वेळी अखेरच्या टप्प्यात हा धोका पत्करून हवाई दलाने ‘सफेद सागर’ मोहिमेद्वारे भेदक माऱ्याने घुसखोरांना धडा शिकविला. या मोहिमेची जबाबदारी ज्या लढाऊ विमानांच्या तुकडीवर होती, तिचे नेतृत्व केले एअर मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ यांनी.

रात्रीच्या वेळी ताबा रेषेचे उल्लंघन न करता पर्वतीय क्षेत्रात दडून बसलेल्या घुसखोरांना हवाई हल्ल्यांद्वारे जेरीस आणण्यासाठी एक प्रकारची सर्जिकल स्ट्राईक त्यांनी केली होती. सिमला कराराचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन कारगिल युद्धात अवघड भौगोलिक परिस्थितीत भारतीय हवाई दलाने ही कामगिरी फत्ते केली आणि त्याचे श्रेय या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या  एअर मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ. या पराक्रमासाठी त्यांना युद्ध सेवा मेडल आणि वायू सेना मेडल प्रदान करण्यात आले.

३१डिसेंबर २०१६ रोजी तब्बल ३८ वर्षाच्या त्यांच्या वायूदलाच्या अनुभवानंतर त्यांची नियुक्ती वायुदलाचे प्रमुख एयरचीफ मार्शल म्हणून करण्यात आली. सर्जिकल स्ट्राईकवेळी  बीरेंद्र सिंग धनोआ यांचा भूमिका मोठी मानली जात होती. त्यांच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दलच्या गाढ्या अनुभवामुळे त्यांना सर्जिकल स्ट्राईकचे  स्पेशालीस्ट म्हणून ओळखले जाते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.