नरेंद्र मोदी यांच्या नंतर पक्षाचे नेतृत्व योगीजी सांभाळणार अशी कायम चर्चा असते
२०२४ च्या निवडणुका म्हणलं कि आत्ता नाव समोर येतं ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचे…पत्रकारांच्या कट्ट्यापासून ते गावातल्या पारापर्यंत हीच चर्चा आहे कि, मोदींनंतर कोण ???
२०२४ मध्ये मोदींना पर्याय म्हणून राहुल गांधींचे नाव जरी घेतले तरी राहुल गांधी पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकतात यावर बहुतांश विरोधी पक्षांचे नेते विश्वास ठेवायला तयार नाहीत. म्हणजेच पीएम मोदींच्या विरोधात राहुल हा पर्याय कदाचित नसू शकतात असं आपण थोडावेळासाठी विचारात घेऊ….कदाचित त्यामुळेच काँग्रेसचे बडे- बडे नेते पक्ष सोडून इतर पक्षांत जातायेत. पण राजकारणात कधी कोण बाहुबली ठरणार हे सांगता येत नाही त्यामुळे राहुल गांधी देखील मोदींना तगडं आव्हान देऊ शकतील असंही आपण विचारात घेऊ..
आता राहिला मुद्दा तिसऱ्या आघाडीचा..म्हणजेच अप्रत्यक्षपणे ममता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर त्या देखील पश्चिम बंगाल च्या निवडणुका ज्या ताकदीने लढल्या आणि जिंकल्या त्यावरून तरी त्यांनी मोदींना पर्याय म्हणून आव्हान स्वीकारण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. अन त्यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर म्हणलं तर विषयच संपला ते ऐनवेळी काहीही जादू करू शकतात….
चला आता राजकीय पतंग उडवून झाले असतील तर आपण वेगळ्या आणि सध्या प्रश्नावर वळूया…देशाला पुढील नेतृत्व कुणीतरी मिळेलच पण भाजपसाठी मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे मोदींनंतर पक्षाचे नेतृत्व कोण सांभाळणार ??
आत्ता भाजपसाठी महत्वाची निवडणूक आहे ती म्हणजे उत्तर प्रदेशातली निवडणूक, युपीच्या निवडणुकीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. नेत्यांमध्ये स्पर्धा चालू झाली कि, मी श्रेष्ठ कि तू श्रेष्ठ… प्रत्येकजण स्वतःला सर्वोत्तम, प्रामाणिक दाखवण्यात व्यस्त आहेत. मग ते पक्षाचे छोटे-मोठे नेते असोत कि, बडे -बडे नेते असोत. प्रत्येकजण मतदारांची आणि पक्ष नेतृत्वाची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यात योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. योगी देखील निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. यापूर्वी जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता योगी यांच्या नेतृत्वात राज्याच्या विविध भागातून अनेक यात्रा काढण्याची तयारी केली आहे. योगी सरकारने आपले यश आणि आपण केलेला विकास सांगण्यासाठी अन विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप १५ डिसेंबरनंतर अवध, काशी, ब्रज, गोरखपूर, कानपूर, बुंदेलखंड आणि पश्चिम भागात यात्रा काढणार आहे. या यात्रा सर्व ४०३ विधानसभा मतदारसंघात जाणार आहेत.
आता हे सांगण्याचं प्रयोजन म्हणजे, योगी हे युपीच्या राजकारणात कितीही मजबूत असोत नसोत त्यांना हि निवडणूक निवडून येणं भाग आहे…कारण पक्ष त्यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून पहाते..होय..
दिल्लीला जाणार का? पंतप्रधान होणार का? अशी प्रश्न जेंव्हा माध्यमे त्यांना करत असतात तेंव्हा नेहेमीच ते अशीच उत्तरं देत असतात कि, माझ्या अशा काहीच ‘महत्त्वाकांक्षा’ नाहीयेत.
२०२२ मध्ये होणाऱ्या युपीच्या निवडणुकांसाठी योगी यांनी आत्तापासून कंबर कसली असली तरीही त्यांच्यात आणि पक्षात काही आलबेल नसल्याची चर्चा मध्यंतरी राजकीय वर्तुळात होती. जरी युपीच्या निवडणुका योगी यांच्याच नेतृत्वाखाली भाजप लढवणार आअसलं तरी, दिल्लीतील नेतृत्व आणि योगी आदित्यनाथ यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मागे जून महिन्यात देखील उत्तर प्रदेशमध्ये सलग दोन आठवडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकींमागून बैठकी झाल्या होत्या. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या आणि भाजपच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्या दरम्यान माजी सनदी अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांना युपीच्या राजकीय मैदानात उतरवून योगि यांना मोठा धक्का दिला होता. कारण अरविंद कुमार शर्मा हे मोदींच्या अतिशय जवळचे मानले जातात.
तर काही राजकीय विश्लेषकांनी तर असाही अंदाज लावला होता कि, शर्मा यांना थेट युपीचे मुख्यमंत्री म्हणून समोर आणले जाईल.
भाजपचे तर काही नेते याची नेहेमीच चर्च करत असतात कि, “पक्षाचं केंद्रीय नेतृत्व योगी आदित्यनाथ यांना कायम जाणीव करून देत असते कि, ते कोणामुळे मुख्यमंत्री बनले आहेत तर योगी याची कायम जाणीव करून देत असतात कि, मोदींनंतर पंतप्रधानपदासाठी असो किंव्हा पक्षाच्या नेतृत्वासाठी पक्षाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही”.
योगीजींच्या समर्थकांकडून कायमच असं वातावरण निर्मिती केली जाते कि, नरेंद्र मोदींनंतर योगी आदित्यनाथ च असतील. अनेक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर देखील ‘पीएम कैसा हो, योगी जी जैसा हो’ सारख्या मोहिमा चालवल्या जातात. यापाठीमागे नक्कीच योगी आदित्यनाथ यांच्या जवळची लोकं असतात हे स्वतः भाजपचे काही नेते देखील मान्य करतात.
काही राजकीय तज्ज्ञ याला योगींचा ‘उदय’ मानत आहेत. त्यामागचे कारण असे सांगितले जात आहे की, ९० च्या दशकात जेंव्हा नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत राजकीय प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि आता पंतप्रधान आहेत.
दुसरीकडे, योगींच्या नेतृत्वाखाली यूपीमध्ये सर्वांना एकत्र राहायचे आहे, असा स्पष्ट संदेश उत्तर प्रदेशातील संघटना आणि भाजप नेत्यांना देण्यात आला आहे. विकासाच्या बाबतीतही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा रेकॉर्ड चांगला दिसून येतो.
केंद्रातील मोदी सरकार आणि यूपीचे योगी सरकार खांद्याला खांदा लावून विकास करतायेत म्हणजेच योगिजी मोदींच्या ताकदीचे आहेत असं चित्र निर्माण केलं गेलं. तसेच मागासलेल्या उत्तर प्रदेशची ओळख सोडून हे राज्य सक्षम आणि सक्षम उत्तर प्रदेश म्हणून पुढे आले आहे, असे योगी सरकारला जवळून ओळखणाऱ्यांचे मत आहे.
एकूणच विकासाचे प्रमाण बघितले तर साडेचार वर्षांहून अधिक काळात राष्ट्रीय स्तरावर एक नवा सक्षम आणि सक्षम उत्तर प्रदेश उदयास आला आहे तोही योगीजींमुळे असं बोललं जातंय कारण मोदींशी हे सुसंगत जातं कारण त्यांनी देखील गुजरात विकासाचा प्रोजेक्ट दाखवून पुढे गेले….हि सगळी चर्चा करण्याचा अट्टहास हाच कि, योगी पुढे जाऊन मोदींना पर्याय ठरले तर कोणत्याच भक्तांना आश्चर्य वाटू नये इतकंच !