ही दहा पुस्तके तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जेलमध्ये जायला लागेल…
पुस्तकांमध्ये काय आहे. साधा प्रश्न सुरवातीलाच पडू शकतो. पण भिडू लोकांनो दिसत तस नसत. पुस्तकांमध्ये डोकं बिघडवून जगाला हिंदोळे देण्याची ताकद असते. काही पुस्तक तर अशी आहेत जी लोकांची माथी भडकवायची कामे करतात. ज्यांमुळे देशातलं वातावरण बिघडू शकते. राडे वगैरे नाही तर डायरेक्ट अशा पुस्तकांमुळे देशाच्या एकात्मतेला धोका होवू शकतो.
सरकार काय करत तर अशा पुस्तकांवर बंदी आणत. चुकून एखाद्या व्यक्तिने बंदी घालण्यात आलेली पुस्तके जवळ बाळगली तर त्यावर गुन्हा नोंद होतो. काही पुस्तकांच्या बाबतीत हि गोष्ट सौम्य असू शकते पण काही पुस्तके तुमचे कनेक्शन थेट नक्षलवादी आणि दहशतवाद्यांसोबत आहेत हे सिद्ध करू शकतात.
बर हे आत्ताच का तर आत्ताचा करंट मुद्दा असा आहे की,
भिमा कोरेगाव प्रकरणात आरोपी असणाऱ्या वरनॉन गोनसॉल्वेज याला जस्टिस सारंग कोतवाल यांनी प्रश्न केला की,
तुम्ही तुमच्या घरी वॉर अॅण्ड पीस हे आपत्तीजनक पुस्तक कोणत्या कारणामुळे ठेवलं होतं याच स्पष्टीकरण द्या.
वॉर अॅण्ड पीस या पुस्तकाच नाव ऐकताच सोशल मिडीयात धुमाकूळ घालण्यात आला. लिओ टॉलस्टॉइचं हे पुस्तक अनेकजणांकडे असत, यात आपत्तीजनक काय आहे म्हणून प्रश्न विचारण्यात आले. नंतर स्पष्ट झालं की ज्या वॉर अॅण्ड पीस पुस्तकाची चर्चा चालू होती ते लियो टॉलस्टायचं नव्हतं तर ते बिस्वजीत रॉय यांच वॉर अॅण्ड पीस इन जंगलमहल : पीपल स्टेट आणि माओइस्ट् होतं.
थोडक्यात काय तर अशी काही पुस्तके आहेत ती तुम्हाला जेलवारी घडवू शकतात. अशी कोणती पुस्तके आहेत. ती कशामुळे वादग्रस्त आहेत. यांची हि यादी.
तुम्हाला चुकून कोणी हे पुस्तकरूपी जेलवारीची भेट दिली असेल तर पुढे मॅटर वाढायला नको म्हणून यादी देत आहोत. वाचून घ्या.
१) फेस ऑफ मदर इंडिया : कॅथरिन मेयो.
मदर इंडिया वेगळ पुस्तक आणि फेस ऑफ मदर इंडिया वेगळ. हे फेस ऑफ मदर इंडिया बॅन आहे. का तर हे पुस्तक भारतात स्वातंत्र चळवळ जोर पकडत होती त्यावेळी लिहण्यात आलं. त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि भारतीय पुरूष यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण करण्यात आलं त्यानंतर या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. भारतात हे पुस्तक बॅन असलं तरी परदेशांमध्ये हे पुस्तक सहज मिळू शकत. मात्र परदेशातून हे पुस्तक तुम्ही भारतात आणण्याचा विचार केलात तर गाठ एअरपोर्टवर पडेल इतकं नक्की.
२) अंगारे : सज्जाद जहर, अहमद अली, रशिद जहां, महमूद जफर.
हे पुस्तक तस तुमच्याकडे नसणार आहे. कारण या पुस्तकाच्या फक्त पाच प्रति शिल्लक राहू शकल्या. बाकीच्या सर्व प्रती पोलीसांनी जाळून टाकल्या. अस काय होतं या पुस्तकात तर या पुस्तकात ९ छोटछोट्या लघुकथा होत्या. मुस्लीम समाज आणि मुस्लीम समाजात असणाऱ्या धार्मिक कट्टरतेवर त्या भाष्य करणाऱ्या होत्या.
इतकच नाही तर धार्मिक कट्टरतेविरोधात बंड करण्यास शिकवणारी भाषा त्यामध्ये होती. अगदी छोटं असणाऱ्या या पुस्तकामुळे उत्तर भारतातील मुस्लीम संतप्त झाले. त्यानंतर हे पुस्तक बॅन करण्यात आले. हि घटना होती साधारण इसवी सन १९३२ ची.
३) द ट्रू फूरकॉन : अल सफी, अल महदी.
१९९९ मध्ये हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आलं. यात काय लिहलं होतं तर ख्रिश्चन धर्म आणि मुस्लीम धर्म यांच्यातील गोष्टी एकत्र करून लिहलं होतं. मुस्लीम समाजाचा आरोप होता की यात मुस्लीम समाजाची चेष्टा करण्यात आली आहे तसेच मुस्लीम समाजाला ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करुन घेण्यासाठी हे लिहण्यात आलं आहे. झालं यावर बंदी घालण्यात आली.
४) लेडी चैटलिर्ज लवर : डीएच लॅरिंस.
एक लग्न झालेल्या महिलेचा नवरा कंबरेच्या खाली पॅरेलीसीस होतो. त्यानंतर ती विवाहबाह्य संबध ठेवते. हे पुस्तक आलं होतं १९२८ साली. अश्लिलतेच्या नावाखाली ब्रिटीशांनी या पुस्तकावर बंदी घातली. पुढे भारत स्वतंत्र झाला तरी देखील या पुस्तकावरची बंदी कायम होती. १९६४ साली हे पुस्तक विकणाऱ्या रंजीत उदेशी यांच्यावर केस करण्यात आली होती. त्यावेळी देखील हे पुस्तक अजूनही स्वीकारण्यासारखे नाही असच सांगण्यात आलं होतं.
५) नाईन अवर्स टू राम: स्टेनली वोलपोर्ट.
नथुराम गोडसेबद्दल या पुस्तकात लिखाण करण्यात आले आहे. या पुस्तकात म. गांधी यांच्या हत्येबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. लेखकाच्या मते ज्या दिवशी म. गांधीची हत्या झाली त्या दिवशी त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यांना संरक्षण देण्यात आलं नव्हतं. आणि हा व्यापक कटाचा भाग होता. यावर भारतात बंदी घालण्यात आलीच सोबत या पुस्तकावर जो सिनेमा बनवण्यात आला त्यावर पण बंदी घालण्यात आली.
६) रंगीला रसूल लेखक: पंडित चमूपतीएमए पब्लिकेशन.
आर्य समाज आणि मुस्लीम समाज यांच्यामध्ये टोकाचे मतभेद सुरू झाले होते. इसवी सन १९२० च्या सुमारास पंजाबमध्ये एक पोस्टर लावण्यात आलं ज्यावर देवी सिता यास वेश्येच्या रुपात दाखवण्यात आलं होतं. त्याला विरोध म्हणून हे पुस्तक लिहण्यात आलं ज्यामध्ये महमंद पैगबंर यांच्या अधिक पत्नी असण्याबद्दल आणि चारित्र्याबद्दल लिहण्यात आलं.
७) केप्टिव्ह कश्मीर : अजीज बेग.
या पुस्तकात काश्मिर आणि भारताच्या संबधावर भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये भारताच्या अन्यायकारी भुमिकेबद्दल वादग्रस्त लिखाण करण्यात आलं आहे. हे पुस्तक फुटिरतावादी व्यक्तींना उत्तेजित करत म्हणून पुस्तकावर बंदी घालण्यात आली.
८) हिंदू हेवन लेखक : मेक्स वायली.
भारतात ख्रिश्चन मिशनरी येवून काय काम करतात याबद्दल या पुस्तकात लिहण्यात आलं. लेखकाच्या मते मिशनरीच खूपच चांगल काम करत होत्या. या पुस्तकातून ख्रिश्चन धर्म खूप मोठ्ठा असून हिंदू धर्माबद्दल अपमानकारक भाष्य करण्यात आल्याच सांगण्यात आलं. म्हणूनच या पुस्तकावर बंदी घालण्यात आली.
९) अनआर्म्ड व्हिक्ट्री : बर्नाड रसेल.
क्युबा देशाच्या पहिल्या मिसाइल क्रायसिसवर असणाऱ्या या पुस्तकात १९६२ च्या भारत चीन युद्धाचे दाखले देवून भारतावर टिका करण्यात आली. त्यामुळे या पुस्तकावर बंदी घालण्यात आली.
१०) आयशा : कर्ट फ्रिस्चर
आयशा अर्थात महमंद पैगंबरांच्या पत्नीवर हे पुस्तक आहे. अस सांगण्यात येत की पैगंबराची ती सर्वात आवडती पत्नी होती. पण यामध्ये टिका करण्यात आल्याने पुस्तकावर वाद झाला आणि पुस्तकावर बंदी घालण्यात आली. हि झाली टॉपची दहा नावं, अजूनही खूपसारी पुस्तक बॅन आहेत. त्यामुळं कधी एखाद पुस्तक सापडलच तर अगोदर गुगल करा आणि मग स्वीकार करा.
हे हि वाच भिडू.
- नेहरू, वाजपेयी की मोदी सर्वात जास्त पुस्तके कुणी लिहली ?
- दरवर्षी महाराष्ट्र विधानभवनातील पुस्तकं हजार मैलांची सफर करतात !!
- हवा एकट्या कामसुत्र पुस्तकाची झाली, दम तर या पाच पुस्तकात देखील होता !