90 च्या दशकातील आशिक लोकांचा हा लवगुरु १० वर्षे हॉटेलात गाणी गाऊन पोट भरत होता ….
गावाकडे जर चुकून कधी चक्कर टाकलाच आणि शेती मातीच्या गप्पा निघाल्यावर किंवा फिरण्याच्या कारणाने वावरात गेलाचं तर नांगरणी करण्याऱ्या ट्रॅक्टरवर भीड में तन्हाई में प्यास की गेहराई में, दर्द में रुसवाई में मुझे तुम याद आते हो… हे गाणं बरेचदा तुम्ही ऐकलं असेल किंवा हमे तुमसे हुआ है प्यार, आखीर तुम्हे आना है, जरा देर लगेगी आणि अशी असंख्य दर्दी,रोमँटिक गाणी ऐकत असाल तर तुम्ही कट्टर 90 चे आशिक आहात याचा तो खणखणीत पुरावा आहे. तो आवाज प्रत्येकाच्या काळजाला भिडतो तो गायक म्हणजे उदित नारायण.
उदित नारायण म्हणल्यावर थेट रोमँटिक गाण्यांचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो त्यात भरीस भर म्हणून जर तुम्ही 90 च्या दशकातले आशिक असाल तर उदित नारायण तुमच्या प्रेमाचा देवदूत होता.
रात्रीचा लॉंग रूटचा रस्ता असुदे, लग्नाचा बस्ता असू दे,लग्नाची कॅसेट असुदे, पोरगी सोडून गेली म्हणून बारमध्ये दारू पीत असुदे, पोरगी पटली म्हणून खुश असुदे, एखादा मंगल प्रसंग घडल्यावर नाचायचं असू दे या सगळ्या गोष्टींवर एकमेव उपाय म्हणून उदित नारायणचे गाणे, सगळीकडे त्याच्या रोमँटिक आवाजाने साथ दिली आणि त्या त्या घटनेचा सुवर्णकाळ प्रत्येक रसिक ऑडियन्सच्या काळजात कोरून ठेवलाय.
नीट लक्ष देऊन म्हणा किंवा जर तुम्ही उदित नारायणचे कट्टर फॅन असाल तर त्यांनी गायलेले सिच्युएशनल गाणे ठळकपणे लक्षात राहतात त्याचीच एक थोडक्यात झलक.
उदित नारायण यांचा जन्म एका नेपाळी कुटूंबात झाला. घरची परिस्थिती यथातथाच होती. पण उदित नारायणला अगदी लहानपणीच आपल्या गाण्याच्या टॅलेंटची ओळख झाली. पोट भरण्यासाठी त्याने जवळपास १० वर्षे हॉटेल मध्ये गाणी गायली.
१९७० च्या दशकात त्याला पहिल्यांदा नेपाळी रेडिओवर गाण्याचा चान्स मिळाला. त्याचा आवाज फक्त नेपाळचा नाही तर सीमेपलीकडे बिहार मध्ये देखील ओळखला जाऊ लागला. भोजपुरी सिनेमासाठी त्याला ऑर येऊ लागल्या. अशाच एका भोजपुरी सिनेमासाठी गाणे गट असताना त्याची ओळख संगीतकार आनंद मिलिंद यांच्याशी झाली. त्यांनी या पोरातलं टॅलेंट ओळखलं.
त्याला आपल्या कयामत से कयामत तक या नव्या सिनेमात गाणं गायला दिलं. ते गाणं होतं,
पहेला नशा पहेला खुमा
मुंबईत आला तेव्हा संगीत दिग्दर्शकांचे उंबरे झिजवत होता पण कयामत से कयामत तकने उदितला बॉलिवूडमध्ये कायमचा हिट केला.
उदित नारायणच्या गाण्याचा आलम असा होता की होस्टेलवर मजाहाजा करणाऱ्या पोराला पापा केहते है बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा हे गाणं ताळ्यावर आणायचं, ‘तेरी उंगली पकड के चला म्हणून आईच्या कुशीची ऊब उदित नारायणच्या आवाजात होती. प्रेम प्रकरणात मुझे निंद ना आये, मुझे चेन न आये असो किंवा पेहला नशा पेहला खुमार हे तर पर्मनंट गाणे होते.
एखाद्या पोरीच्या सौंदर्याचं कौतुक करण्यासाठी कितना प्यारा तुझे रब ने बनाया हे उदित नारायणपेक्षा गोड पद्धतीने कोणीच सांगू शकत नाही.
हे तर काहीच नाही गावाकडच्या लग्नात नवरीच्या पाठवणी वेळी एका दर्दी रगेल आशिकने उदित नारायण तिला आवडायचा म्हणून तिच्याच लग्नात परदेसी परदेसी जाना नहीं म्हणून बेंजो पार्टीवर वाजवलं होतं, फुलो सा चेहरा तेरा, जीस घर में तुम्हारी शादी हो, चांद छुपा बादल में, क्यू की इतना प्यार तुमसे , तेरे नाम हमने किया है , जो भी कसमे खायी थी हमने, मुझे हक है, दिल ने ए कहा है दिल से, तुम दिल की धडकन में, मै यहां हुं यहा हुं यहा, फिर भी दिल है हिंदुस्थानी अशी कित्येक गाणी उदित नारायणने आपल्या आवाजाने अजरामर करून टाकली.
उदित नारायणची रोमँटिक गाणी जितकी गाजली तितकीच दर्दी गाणी सुद्धा गाजली. धडकन, लगान, राझ, कयामत से कयामत तक, करण अर्जुन, कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, तेरे नाम, राजा हिंदुस्थानी, मोहरा, अकेले हम अकेले तुम, क्यू की अशा अनेक सिनेमांसाठी उदित नारायण ओळखला गेला. चेहऱ्यावर कायम निरागस स्माईल आणि दमदार आवाज यामुळे उदित नारायण हा अभिजित भट्टाचार्य,सोनू निगम,कुमार सानू यांच्या तुलनेत सरसच होता.
भले आज लोकं वाद घालतात की कुमार सानू भारी का उदित नारायण भारी पण तुलना करण्यापेक्षा त्यांचा फॅन बेस जास्त महत्वाचा राहिला.
अलीकडच्या काळात भलेही त्याची गाणी जास्त येत नाहीत व रियालिटी शो मध्ये जेव्हा तो जातो तेव्हा त्या रियालिटी शोचा टीआरपी मार्केटमध्ये टॉपला असतो. उदित नारायणचा आवाज हा भजनी गीतांमध्ये दैवी मानला जातो, बॉलिवूडची बाहेरजगात आवाजाच्या बाबतीत ओळख करून द्यायची झाल्यास उदित नारायण हे नाव कायम वरच्या रांगेत असेल.